युवक व महिला संमेलनाने गाजवला दिवस
News Today
गुरुकुंज मोझरी प्रतिनिधी – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७व्या पुण्यतिथीनिमित्त श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल, गुरुकुंज मोझरी येथे आयोजित पालखी पदयात्रा शिबिरात युवक व महिलांसाठी विविध विचारप्रवर्तक सत्रांचे आयोजन करण्यात आले. दिवसभर चाललेल्या या सत्रांनी युवक-युवती आणि महिलांच्या सहभागामुळे मोझरी नगरीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.संघटनशक्तीवर युवकांचे आत्मचिंतनपहिल्या सत्रात “संघटनशक्ती” या विषयावर सुरेश देसाई, भारत भुसकडे, मनोज चौबे, पुरुषोत्तम थुटे आणि मुकुंद पुणसे यांनी मार्गदर्शन केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ‘ग्रामगीता’ ग्रंथातील “संघटनशक्ती” अध्यायाचा संदर्भ देत वक्त्यांनी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी युवकांनी एकत्रित होऊन कार्य करण्याचे आवाहन केले. युवकांनी समाजातील सकारात्मक बदलासाठी संघटित प्रयत्नांची गरज असल्याचे मत सर्वांनी मांडले.
या सत्राचे सूत्रसंचालन गुरुकुलचे संपर्कप्रमुख आणि युवा व्याख्याते तुलसीदास झुंजुरकार यांनी केले.महिलांसाठी प्रेरणादायी सत्रयानंतर महिलांसाठी आयोजित विशेष सत्राने वातावरण भारावले. या महिला संमेलनात सुश्री रेखाताई बुराडे, सौ. बेबीताई काकडे, कविताताई येनोरकर, निर्मलाताई खडतकर आणि सौ. सुवर्णाताई पिंपळकर यांनी स्त्रीशक्तीचा गौरव करत प्रभावी विचार मांडले.
“महिलोन्नती” या ‘ग्रामगीता’ अध्यायातील तत्वज्ञानाचा उल्लेख करत वक्त्यांनी समाजातील महिलांच्या भूमिकेचा आणि त्यांच्या आत्मभानाचा गौरव केला.कीर्तनकार जयश्रीताई गावतुरे यांनी आपल्या कीर्तनातून सांगितले की, “पूर्वी चूल-मूल यापुरत्या चौकटीत राहणारी महिला आज शिक्षण, समाजकार्य, विज्ञान आणि अंतराळ संशोधनापर्यंत झेपावली आहे.” सत्राचे प्रास्ताविक छायाताई मानव यांनी केले.
ग्रामीण स्वयंरोजगारावर चर्चाशिबिरातील आणखी एका सत्रात “ग्रामीण भागात स्वयंरोजगाराच्या संधी कशा निर्माण करता येतील” या विषयावर साक्षीताई पवार, रोशन ठाकरे, समीर कोरे, विकास बोरवार, प्रशांत सुरोशे आणि प्रमोद बोराळकर यांनी विचार मांडले. या सत्रात ग्रामविकासासाठी स्थानिक साधनसंपत्तीचा प्रभावी वापर, सूक्ष्मउद्योगांची संधी आणि उद्योजकतेला चालना यावर चर्चा झाली. सूत्रसंचालन अमर वानखडे यांनी केले.
ध्यानातून आत्मसंवादाचे दर्शनदरम्यान, गुरुकुंज मोझरीत सुरू असलेल्या ग्रामगीता तत्त्वज्ञान आचार महायज्ञ व पालखी पदयात्रा शिबिराच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात सामुदायिक ध्यानाने झाली. “ध्यान” या विषयावर चिंतन व्यक्त करताना आत्मनुसंधान अड्याळ टेकडीचे संचालक सुबोध दादा म्हणाले, “ध्यान ही फक्त आसनप्रक्रिया नसून आत्म्याशी संवाद साधण्याची दिव्य साधना आहे.
ती माणसाला अंतःकरणाशी जोडते आणि मनावर ताबा मिळवण्याचे खरे अध्यात्म शिकवते.” त्यांनी पुढे आवर्जून सांगितले की, “जेव्हा मन स्थिर होते तेव्हाच विचार शुद्ध होतात आणि आत्मा समाधानी होतो.”गुरुकुंज मोझरी येथे देवभूमीप्राय वातावरणात सुरू असलेल्या या विविध उपक्रमांमुळे तुकडोजी महाराजांच्या विचारांचा आणि ग्रामगीतेच्या तत्त्वज्ञानाचा सुगंध समाजमनात दरवळत आहे.










