Friday, July 17, 2026
Google search engine
Homeवणीग्रामपंचायत नांदेपेरा येथील विकासकामांची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित

ग्रामपंचायत नांदेपेरा येथील विकासकामांची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित

  1. News Today 

वणी : ग्रामपंचायत नांदेपेरा, ता. वणी येथील सन 2022 पासून आजपर्यंत झालेल्या विविध विकासकामांमध्ये अनियमितता, आर्थिक गैरव्यवहार व निधी अपहार झाल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक (मनरेगा), यवतमाळ यांनी स्वतंत्र व निष्पक्ष चौकशीचे आदेश दिले आहेत.

वणी तालुक्यातील नांदेपेरा ग्रामस्थांनी विकासकामात झालेल्या अपहार प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्या संदर्भात थातूरमातूर चौकशी करण्यात आली होती. परंतु त्या चौकशीने ग्रामस्थ समाधानी झाले नसल्याने गावातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश शेंडे, राकेश खामणकर, सुभाष झाडे, प्रकाश चिकटे, एकनाथ सिडाम,सचिन चिकटे,कृणाल खामनकर व अन्य नागरिकांनी वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने आमदार संजय देरकर यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र दिले होते.

वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार  संजय निळकंठराव देरकर यांनी या संदर्भात केलेल्या पाठपुराव्यानंतर प्रकरणाची नोंद घेण्यात आली. यापूर्वी करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशी अहवालाचे अवलोकन केल्यानंतर अनेक गंभीर मुद्द्यांवर सखोल व वस्तुनिष्ठ चौकशी झालेली नसल्याचे निदर्शनास आले. तसेच अनेक आरोपांबाबत स्पष्ट निष्कर्ष नोंदविण्यात आले नसल्याने तक्रारींचे समाधानकारक निराकरण झालेले दिसून आले नाही.

यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि सर्वंकष चौकशी करण्यासाठी तहसीलदार, मारेगाव यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय चौकशी समिती गठित केली आहे. समितीमध्ये विविध विभागांतील तांत्रिक व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला असून ग्रामपंचायत नांदेपेरा येथे सन 2022 पासून राबविण्यात आलेल्या सर्व विकासकामांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे.

सदर समितीला विकासकामांची गुणवत्ता, मंजूर निधीचा वापर, कामांची अंमलबजावणी, आर्थिक व्यवहार आणि तक्रारीतील प्रत्येक मुद्द्याची तपासणी करून 15 दिवसांच्या आत स्वयंस्पष्ट निष्कर्षांसह सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या निर्णयामुळे ग्रामपंचायत स्तरावरील विकासकामांमध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि जनतेचा विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. चौकशी अहवालानंतर दोषींवर आवश्यक ती कारवाई करण्यात येण्याची शक्यता असून या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter