News Today
यवतमाळ, दि. १४ जुलै : आम आदमी पार्टी, यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ रद्द करावी आणि पंजाबमधील आम आदमी पार्टी सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, विधानसभा निवडणुकीपूर्वी जनतेच्या तीव्र विरोधामुळे स्मार्ट मीटरच्या सक्तीला स्थगिती देण्यात आली होती. मात्र, निवडणुकीनंतर पुन्हा स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती सुरू करण्यात आली असून वीजदरातही वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे.
निवेदनानुसार, स्मार्ट मीटरमधील रिचार्जची रक्कम संपताच वीजपुरवठा तात्काळ खंडित होतो. यवतमाळसह विदर्भातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना वेळेवर रिचार्ज करता न आल्यास किंवा स्मार्टफोनच्या अभावामुळे गंभीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच स्मार्ट मीटरमुळे प्रत्यक्ष वीज वापराच्या तुलनेत अधिक बिल येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने केल्या जात असल्याचाही उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.
आम आदमी पार्टीने शासनाकडे दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी स्मार्ट मीटर सक्तीला देण्यात आलेली स्थगिती कायम ठेवून निवडणुकीनंतर जारी करण्यात आलेला सक्तीचा आदेश तात्काळ रद्द करावा. तसेच वाढती महागाई आणि सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन पंजाबमधील आम आदमी पार्टी सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय तातडीने घ्यावा.
यावेळी वसंतराव ढोके, मोबीन शेख, प्रशांत देवकते, विलास वाडे, अविनाश धनेवार, ॲड. मनीष माहुलकर, धनपाल नाईक, आकाश चमेडिया, शुभम चांदेकर, निलेश नांदूरकर, प्रतीक्षा रहांगडाले, भारती पिसाळकर, उषा श्रीरामे, विनोद रोकडे तसेच आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


