Saturday, June 27, 2026
Google search engine
Homeवणीआदरणीय जनार्दनजी बोथे गुरुजी, पद्मश्रीचा मान मोठा की इतरांच्या संपत्तीवरील मोह?

आदरणीय जनार्दनजी बोथे गुरुजी, पद्मश्रीचा मान मोठा की इतरांच्या संपत्तीवरील मोह?

      श्रीगुरुदेवाच्या प्रत्येक उपसकांना जाहीर खुलपत्र

सस्नेह जय गुरुदेव

आदरणीय जनार्दनजी बोथे गुरुजी,
भारत सरकारने आपल्याला पद्मश्री हा सर्वोच्च नागरी सन्मान बहाल करून आपल्या कार्याचा गौरव केला आहे. हा सन्मान केवळ व्यक्तीचा नसून त्यासोबत नैतिक जबाबदारीही येते. त्यामुळे समाजाला आपल्याकडून न्याय, पारदर्शकता आणि सत्यनिष्ठेची अपेक्षा आहे.
मात्र, पंढरपूर येथील ग्रामगीता तत्त्वज्ञान दर्शन मंदिर या मालमत्तेबाबत निर्माण झालेली परिस्थिती अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. संबंधित मालमत्ता ही भू-वैकुंठ समितीची असल्याचा दावा असताना, ती अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाची असल्याचे चित्र उभे केले जात असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे गुरुदेवप्रेमी आणि सर्वसामान्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

जर या मालमत्तेवर गुरुदेव सेवा मंडळाचा कायदेशीर हक्क असेल, तर तो समाजासमोर अधिकृत कागदपत्रांसह स्पष्ट करावा. परंतु तसा हक्क नसताना मालकीचा दावा किंवा आभास निर्माण होत असेल, तर ते नैतिकदृष्ट्या योग्य ठरत नाही.
या विषयावर न्यायालयीन वाद निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत समाजात सलोखा निर्माण करण्याऐवजी संघर्ष वाढेल अशी कोणतीही भूमिका टाळली पाहिजे. आपण पद्मश्री पुरस्काराने सन्मानित व्यक्ती आहात; त्यामुळे इतरांच्या संपत्तीबाबत कोणताही संशय निर्माण होणार नाही, अशी भूमिका घेणे अधिक अपेक्षित आहे.

न्यायालयीन वाद म्हणजे केवळ कायदेशीर लढाई नसते; तो समाजाच्या आर्थिक शक्तीचाही चुराडा असतो. सर्वसामान्य नागरिकांनी धर्मकार्यासाठी, समाजहितासाठी आणि विकासासाठी श्रद्धेने दिलेला निधी हा न्यायालयीन खटल्यांमध्ये खर्च होणे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. हा पैसा समाजहितासाठी वापरला जाण्याऐवजी आपापली मालमत्ता सिद्ध करण्यासाठी आणि वाचविण्यासाठी खर्च होत असेल, तर त्याचा सर्वांनाच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

शासनाने बहाल केलेल्या पद्मश्री पुरस्कारामुळे आज आपली उंची अत्यंत मोठी झाली आहे. कोणतीही मिळकत, कोणतीही मालमत्ता किंवा कोणताही भौतिक लाभ या सन्मानाशी तुलना करू शकत नाही. परंतु जर इतरांच्या मिळकतीवर हक्क मिळविण्याच्या मोहात प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि त्यात अपयश आले, तर समाजात निर्माण झालेली उंची किती खाली येऊ शकते, याचाही विचार व्हायला हवा.

आज आपल्या पद्मश्रीमुळे श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्याला नक्कीच नवी गती आणि नवी प्रतिष्ठा लाभणार आहे. परंतु कोणत्याही कार्याची खरी ताकद केवळ गतीत नसते; ती स्वच्छ नीती, पारदर्शकता आणि नैतिकतेत असते. म्हणूनच या गतीसोबत आपली नीतीही तितकीच स्वच्छ आणि निःस्वार्थ असणे आवश्यक आहे.

बघा गुरुजी असे फलक लावणे आम्हाला तरी योग्य वाटते का?

 

पंढरपूर येथील ग्रामगीता तत्त्वज्ञान दर्शन मंदिर असो, मोझरी येथील गुरुकुल आश्रम असो अथवा अड्याळ टेकडीचा प्रश्न असो — या सर्व ठिकाणी आपापसातील वाद समाजासमोर येत आहेत. गुरुदेवांच्या नावाने कार्य करणाऱ्या संस्थांमध्ये संघर्ष नव्हे, तर समन्वय आणि सहकार्य दिसणे हीच समाजाची अपेक्षा आहे.

आज प्रश्न केवळ एका मंदिराचा किंवा एका संस्थेचा नाही. प्रश्न आहे गुरुदेवांच्या विचारांचा, समाजातील विश्वासाचा आणि नैतिकतेचा. आपण या संपूर्ण प्रकरणावर स्पष्ट व सार्वजनिक भूमिका जाहीर करून समाजातील संभ्रम दूर करावा, हीच गुरुदेवप्रेमींची अपेक्षा आहे.

पद्मश्रीचा सन्मान समाजाला जोडण्यासाठी असतो, वाद वाढवण्यासाठी नाही. आपण सत्य, न्याय आणि पारदर्शकतेची बाजू घ्याल, अशी अपेक्षा व्यक्त करीत आहोत.

गुरुजी, शेवटी आपण सर्वांनाच हा मोह-माया सोडून ईश्वरचरणी लीन व्हायचे आहे. मग संपत्ती, मालकी आणि वाद यांच्या मोहात पडून आपल्या प्रतिष्ठेला धक्का का लावायचा? आपण आपल्या पद्मश्री सन्मानाची उंची जपावी, गुरुदेवांच्या विचारांना न्याय द्यावा आणि सर्व संस्थांना सोबत घेऊन समाजहिताचे कार्य करावे, हीच नम्र विनंती.

जय गुरुदेव
दिलीप रामदासजी भोयर
सचिव
ग्रामगीता तत्त्वज्ञान दर्शन मंदिर, भू-वैकुंठ समिती, पंढरपूर

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter