Thursday, June 18, 2026
Google search engine
Homeवणीशासनाची बंदी झुगारून खडकी येथे HTBT कापूस लागवड; तंत्रज्ञान स्वातंत्र्य मेळाव्यात शेतकरी...

शासनाची बंदी झुगारून खडकी येथे HTBT कापूस लागवड; तंत्रज्ञान स्वातंत्र्य मेळाव्यात शेतकरी संघटनेचा एल्गार

राळेगाव, प्रतिनिधी : केंद्र शासनाने यंदाही तणनाशक-प्रतिरोधक HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कापूस बियाण्याच्या लागवडीला परवानगी न दिल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेत राळेगाव तालुक्यातील खडकी येथे प्रतिबंधित HTBT कापूस बियाण्याची प्रतिकात्मक लागवड केली. १७ जून रोजी आयोजित “तंत्रज्ञान स्वातंत्र्य मेळावा”मध्ये शासनाच्या धोरणांवर तीव्र टीका करत शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

शेतकरी संघटनेच्या मते, २००८ पासून तणनाशक-प्रतिरोधक HTBT तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध होण्याची अपेक्षा होती. मात्र अद्याप या तंत्रज्ञानाला अधिकृत मान्यता मिळालेली नसल्याने शेतकरी आधुनिक कृषी तंत्रज्ञानापासून वंचित राहत आहेत. शासनाने नवीन तंत्रज्ञानावरील निर्बंध हटवून शेतकऱ्यांना विविध पर्याय उपलब्ध करून द्यावेत, अशी संघटनेची भूमिका आहे.

या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून १० जून रोजी गुजरात सीमेवरील नंदुरबार येथे सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर आंदोलनाच्या पुढील टप्प्यात खडकी येथील शेतकरी राजेंद्र झोटिंग यांच्या शेतात शासनाची बंदी झुगारून HTBT बियाण्याची लागवड करण्यात आली. तसेच तुपटाकळी परिसरात सुमारे ५ हजार हेक्टर क्षेत्रावर या बियाण्याची लागवड झाल्याचा दावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

मेळाव्यात वक्त्यांनी कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर शासनाने घातलेल्या निर्बंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शेतकऱ्यांना कोणते बियाणे वापरायचे याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असावे, असे मत व्यक्त करण्यात आले. देशाला कृषी उत्पादनात आत्मनिर्भर बनविण्यासाठी आणि आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा स्वीकार आवश्यक असल्याचेही वक्त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप होते. यावेळी अनिल घनवट, प्रज्ञाताई बापट, सीमाताई नरोडे, विजय निवल, मिलिंद दामले, दीपक आनंदवार, ललित बहाळे आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

वक्त्यांनी आपल्या भाषणात शेतकरी हा देशाचा अन्नदाता असून त्याच्या आर्थिक उन्नतीशिवाय राष्ट्राची खरी प्रगती शक्य नसल्याचे प्रतिपादन केले. तसेच शेतीसमोरील विविध आव्हानांवर मात करण्यासाठी संघटित लढ्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावेळी संघटनेत नव्याने प्रवेश केलेल्या युवा शेतकऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.

या कार्यक्रमाला गजानन पारखी, सतीश देशमुख, चंद्रशेखर देशमुख, दशरथ पाटील, आशिष मुसळे, हिम्मतराव देशमुख, बबनराव चौधरी, अक्षय महाजन, गिरीष तुरके, मोहनराव चौधरी, गोपाल भोयर, किशोर झोटिंग, निलेश डवरे, दशरथ काळे, भास्कर पाटील, गजानन कोल्हे, विठ्ठल खोंडे यांच्यासह अकोला, बुलढाणा, नांदेड, वाशीम, चंद्रपूर आदी जिल्ह्यांतील पदाधिकारी, महिला व युवा आघाडीचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस विभागाकडून PSI सुखदेव अवधूत भोरकडे यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राजेंद्र झोटिंग यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमाची सांगता वज्रमूठ बांधून शेतकरी एकतेची शपथ घेत स्नेहभोजनाने करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter