News Today
चंद्रपूर, दि. ८ जुलै : अड्याळ टेकडी ही कर्मयोगी संत तुकाराम दादा गीताचार्य यांच्या तपश्चर्येने पावन झालेली, हजारो सेवकांच्या श्रमदानातून उभी राहिलेली आणि समाजसेवा, अध्यात्म व संस्कारांचे केंद्र असलेली पवित्र भूमी आहे. या स्थळाचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची नैतिक व सामाजिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन अड्याळ टेकडीचे संचालक सुबोधदादा यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केले.
अड्याळ टेकडीसंदर्भातील प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने अंतिम न्यायालयीन निर्णय होईपर्यंत सर्वांनी न्यायालयीन प्रक्रियेचा सन्मान राखावा, तसेच मालकी किंवा ताब्याचा आभास निर्माण करणाऱ्या कोणत्याही कृती टाळाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. न्यायप्रक्रियेवर विश्वास ठेवत शांतता आणि कायद्याचे पालन करणे हीच लोकशाहीची खरी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना संविधान, कायदा आणि जनतेप्रती असलेली जबाबदारी निष्पक्षपणे पार पाडण्याचे आवाहन केले. “पदे आणि सत्ता तात्पुरती असतात; मात्र जनतेचा विश्वास, न्यायाची भूमिका आणि इतिहासातील नोंद कायमस्वरूपी असते. त्यामुळे कोणत्याही दबावाला बळी न पडता सत्य, न्याय आणि पारदर्शकतेच्या बाजूने उभे राहणे ही काळाची गरज आहे,” असे ते म्हणाले.
११ व १२ जुलै २०२६ रोजी अड्याळ टेकडी येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि संविधानिक मार्गाने जनतेने आपली भूमिका मांडावी, असे आवाहन करताना त्यांनी स्पष्ट केले की, हा संघर्ष कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध नसून संतपरंपरेचा सन्मान, न्याय आणि जनतेच्या स्वाभिमानाच्या रक्षणासाठी आहे.
“आम्ही कायदा हातात घेणार नाही, हिंसेचा मार्ग स्वीकारणार नाही; मात्र अन्यायाविरुद्ध लोकशाही मार्गाने ठामपणे उभे राहू. जनतेचा आवाज दाबता येऊ शकतो, पण संपवता येत नाही. सत्याला विलंब होऊ शकतो; परंतु त्याचा पराभव कधीच होत नाही,” असेही सुबोधदादा यांनी ठामपणे सांगितले.
या पत्रकार परिषदेला अविनाश आंबेकर, वासुदेव चोंडके, अपर्णाताई चिडे, बबनराव आणमुळवार, संजय आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते.


