Friday, May 1, 2026
Google search engine
Home Blog Page 11

अतिवृष्टीच्या मदतीत सरकारने केला शेतकऱ्यांचा विश्वासघात– राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप भोयर यांची टीका

0

News Today 

वणी (प्रतिनिधी): राज्य सरकारने अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी मदत देताना पूर्वीची तीन हेक्टर मर्यादा कमी करून दोन हेक्टर केली आहे, हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांचा सरळसरळ विश्वासघात असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांनी व्यक्त केले.

सरकारने जाहीरपणे ३२ हजार कोटींच्या मदतीचा गाजावाजा करत ग्रामीण भागात आशेचे गाजर दाखविले, मात्र प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचणारी मदत ही अत्यंत किरकोळ आणि अपुरी असल्याचे भोयर म्हणाले. त्यांनी स्पष्ट केले की, ‘‘राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याऐवजी त्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. एकीकडे कर्जमुक्तीचे आश्वासन देत शेतकऱ्यांचे सहानुभूतीने हात धरण्याचे नाटक केले जाते, तर दुसरीकडे मदत योजनेत मर्यादा कमी करून त्यांचा विश्वास हरवला जात आहे.

’मर्यादा कमी, दिलासा नाही 

सप्टेंबर 2025 मधील अतिवृष्टीनंतर घोषित केलेल्या नव्या शासन निर्णयानुसार लाभ फक्त दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत मर्यादित करण्यात आला आहे. यामुळे बहुसंख्य शेतकरी एकूण अपेक्षित निधीच्या तृतीयांश भागावरच थांबले आहेत. शेतकरी नेमके याच मदतीवर पुढच्या खरीप हंगामाची तयारी करतात; त्यामुळे ही मर्यादेत कपात त्यांच्या उत्पादन चक्रावर व भांडवल व्यवस्थेवर गंभीर परिणाम करणारी ठरू शकते, असे दिलीप भोयर यांनी सांगितले.

‘‘गाजराच्या मदतीने दिशाभूल’’

भोयर यांनी पुढे सांगितले की, ‘‘सरकारने ३२ हजार कोटींचे आकडे मांडून जनतेला दिलासा दिल्यासारखे दाखवले, पण हा आकडा संपूर्ण राज्याच्या प्रमाणात आहे. प्रत्यक्षात प्रति शेतकरी मिळणारी रक्कम ही अगदी मोजकी आहे. त्यामुळे ही मदत ‘मिडिया शो’ ठरली आहे; खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या जखमांवर फक्त मीठ चोळण्याचे काम सरकार करत आहे.

वणी विभागातील शेतकऱ्यांत संतापाची लाट 

वणी व आसपासच्या तालुक्यांतील शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पीकहानी सोसली आहे. भूमी ओबडधोबड झाल्याने पुढील हंगामासाठीची तयारी थांबलेली आहे. मात्र दोन हेक्टरच्या कठोर मर्यादेमुळे हजारो शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत. भोयर यांनी सांगितले की, ‘‘सरकार कागदावर मदत दाखवत आहे; पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात काहीच पोहोचत नाही. हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या विश्वासाचा घात आहे.

’’राष्ट्रवादी (शरद पवार गट) ची आग्रही भूमिका

 वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांनी पुढील विधानात जाहीर केले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) या अन्यायकारक निर्णयाविरोधात राज्यभर आवाज उठवणार असून, तीन हेक्टर मर्यादेची पुनर्स्थापना व पुनर्प्राप्त मदत तत्काळ मिळावी, असा ठराव मागणीसह सरकारसमोर ठेवला जाईल.भोयर यांनी चेतावणी दिली की, ‘‘शेतकरी हा महाराष्ट्राचा कणा आहे. सरकारने हा कणा दुर्लक्षित केला, तर हा आवाज केवळ वणीपुरता मर्यादित राहणार नाही; तो संपूर्ण राज्यभर गुंजेल.

’’शेवटी”

राज्य सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी आश्वासनांचा पुरवा घेऊन गेल्यासारखा ठरत आहे. ग्रामीण विदर्भात नाराजीची हवा निर्माण झाली असून, शरदचंद्र पवार गट या मुद्यावर आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वणी परिसरात दिलीप भोयर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा आक्रोश आता राजकीय हक्काच्या लढाईत रूपांतरित होताना दिसत आहे.

दिलीप भोयर

     शेतकऱ्यांना मिळणारी प्रत्यक्ष मदत तपासा

अतिवृष्टी मदतीच्या राज्य शासनाच्या ताज्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना प्रति हेक्टर खालीलप्रमाणे मदतीची रक्कम देण्यात येत आहे:कोरडवाहू पिकांसाठी प्रति हेक्टर ₹18,500हंगामी बागायती पिकांसाठी प्रति हेक्टर ₹27,000कायमस्वरूपी बागायती पिकांसाठी प्रति हेक्टर ₹32,000याशिवाय शासनाने प्रति हेक्टर ₹10,000 ची अतिरिक्त मदत जाहीर केली आहे, जी उत्पादन खर्च आणि रब्बी हंगामासाठीचा आधार म्हणून दिली जात आहे. परंतु या मदतीची पात्रता आता 2 हेक्टर पर्यंत मर्यादित केली आहे, जी पूर्वी 3 हेक्टर होती.सरकारकडून जाहीर केलेल्या ₹32 हजार कोटींच्या मदतीतून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात संबंधित रकमेची थेट नोंदणी होणार आहे. मात्र मर्यादा घटल्यामुळे एकूण मदतीत प्रत्यक्ष घट होणार आहे, विशेषतः ज्यांच्याकडे 2 हेक्टराहून अधिक शेतजमीन आहे त्यांना गंभीर वित्तीय नुकसान होण्याचा धोका आहे.सरकारने मदत रक्कम दर प्रति हेक्टर तितकीच ठेवली आहे पण पात्रतामध्ये घट झाल्यामुळे प्रत्यक्ष मिळणारी मदत कमी झाली आहे, ज्यामुळे शेतकरी वर्गाच्या आर्थिक स्थैर्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तसेच दिवाळीचा सण सुरू झाला परंतु मदतीसाठी मात्र अजूनही विलंब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. 

दिलीप भोयर

वणी विधानसभा अध्यक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)

https://www.instagram.com/reel/DP9bS2HD0x9/?igsh=MWJyem05bXg2OW85ZQ==

“आई” राजूची बेल झाली, आता काळजी करू नकोस, असे शब्द कानी पडताच, मनसे नेते राजू उंबरकर यांचे मातृहृदय थांबलं

0

 

*सूटबुद्धीने रचला डाव आईच्या काळजाने घेतला घाव*

News Today

दिलीप भोयर 

वणी :- सत्तेचा अहंकार आणि सूडबुद्धीचा ज्वालामुखी जेव्हा फुटतो, तेव्हा निर्दोष जीव त्यात होरपळतात — आणि अशाच एका मातृहृदयाने काल तारीख १६ रोजी आपला शेवटचा श्वास घेतला. मनसे नेते राजू उंबरकर यांच्यावर सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. आपल्या लेकरावर झालेल्या अन्यायाचं ओझं सहन न झाल्याने आईचं हृदय थांबलं — “राजुला जामीन मिळाला” हे शब्द ऐकताच ती कायमची शांत झाली. 

सत्तेचा सूड, अन्यायाचा डोंगर

स्थानिकांच्या मते, चंद्रपुरातील सत्तेतील विद्यमान आमदार व माजी मंत्री असलेल्या एका कंत्राटदार नात लगाने खंडणीचा आरोप करीत तक्रार दाखल केली असता सत्ताधारी पक्षाच्या वणीतील  एका माजी आमदाराने याच संधीचा फायदा घेत सूडबुद्धीमुळे राजू उंबरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कोणतेही ठोस पुरावे नसतानाही गंभीर गुन्हे नोंदनावासाठी आपली पत पणाला लावली होती. 
राजू उंबरकर हे पंधरा दिवसांपासून भूमिगत होते; आणि त्याच काळात त्यांच्या आईची प्रकृती चिंतेने दिवसेंदिवस ढासळत चालली होती. ती म्हणायची — “माझं लेकरं निर्दोष आहे… पण सत्ताधाऱ्यांनी त्याला गुन्हेगार ठरवलं.”

न्याय मिळाला… पण आई गेली

मोठे भाऊ प्रवीण उंबरकर यांनी नागपूर खंडपीठात न्यायासाठी अर्ज दाखल केला आणि अखेर न्यायालयानं दुपारी राजू यांना जामीन मंजूर केला.
आईला ही आनंदवार्ता देण्यासाठी त्यांनी फोन लावला —

“आई, राजुला बेल मिळाली!”
पण नियतीनं क्रूर खेळी केली… तो शब्द ऐकताच आईचे हृदय थांबले. बघता बघता श्रीमती सुंदराबाई मधुकर उंबरकर यांनी जगाचा निरोप घेतला. 

गावात शोक, मनात संताप

वणी आणि आसपासच्या भागात शोककळा पसरली आहे. नागरिकांत संताप आणि असहायतेचं वातावरण आहे. एका गावकऱ्याने संतापाने म्हटलं —

“सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना गुन्ह्यांच्या खोट्या साखळ्यांमध्ये अडकवून लोकशाही गळा घोटण्याचं काम सुरू केलं आहे.”

उबाठा गटालाही सत्तेचा फटका

मनसे प्रमाणेच शिवसेना (उबाठा) गटातील पदाधिकारी व  कार्यकर्त्यांवरही दबाव आणत, राज्यात अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ घोषित करावा व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी केवळ या मागणीला घेऊन वणी शहरात सत्तापक्षातील आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके या मंत्र्याचा ताफा रोखून त्यांना काळे झेंडे दाखवल्याच्या कारणावरून गंभीर स्वरूपाचे  गुन्हे नोंदवल्या गेले. आणि त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला. अशीच घटना राज्यातील एका जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे सोबती घडली परतू त्यांनी कोणतेही गुन्हे नोंदविले नाही.  मग एकाच सत्तेतील असलेल्या मंत्र्यांचे एकच घडलेली घटना असताना कायदे वेगवेगळे कसे ?  “सरकार विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखवणं ही लोकशाहीची विटंबना आहे. हा सूडबुद्धीचा खेळ थांबवायलाच हवा.” अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 

अशीच सूडबुद्धी आणि भ्रष्टाचाराच्या आरोप करीत सत्ता पक्षातील एका दिग्गज नेत्याने नुकतेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. 

“आई गेली, पण तिचं स्वप्न जिवंत आहे…”

“आई गेली, पण तिच्या डोळ्यांत न्यायाचं स्वप्न होतं. ते स्वप्न पूर्ण केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. अशी                   राजू उंबरकर यांनी प्रतिक्रिया दिली. 

एका वृद्ध शेतकऱ्याने हळव्या शब्दांत म्हटलं 

“लोकशाहीत सत्तेचा हा विळखा असह्य आहे. पण जनता जागृत आहे — आता अन्याय गप्प बसवू शकणार नाही.”


आजचा दिवस — मातृत्वाचं प्रतीक, पण एका लेकरासाठी शोकदिवस

आज नियतीनं आणखी एक हृदयद्रावक विरोधाभास दाखवला आहे. आज वसुबारस, म्हणजेच आई आणि लेकराच्या प्रेमाचं वंदन करणारा दिवस. या दिवशी गायी–वासराचं पूजन करून मातृत्वाचा सन्मान केला जातो. पण याच दिवशी राजू उंबरकर आपल्या आईच्या पार्थिवावर अंत्यविधी करत आहेत.

एकीकडे संपूर्ण समाज आई–मुलाच्या नात्याचं पूजन करत असताना, दुसरीकडे एका लेकरानं आपल्या आईचं पार्थिव डोळ्यांतून अश्रू ओघळवत निरोप दिला. वसुबारसच्या या मातृपूजनाच्या पवित्र दिवशी, मातृहृदय हरवलेल्या त्या लेकरासाठी हा दिवस आयुष्यभराचं दुःख बनून राहिला आहे.

आज तिच्या जाण्यानं केवळ एक आई नाही, तर मातृत्वाचं प्रतीक हरपलं आहे — आणि समाजाने हे लक्षात ठेवावं की न्यायासाठी झगडणाऱ्या प्रत्येक लेकरामागे अशीच एखादी आई उभी असते, जी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या मुलावर विश्वास ठेवते. 🌼


ही केवळ एका आईची कथा नाही — हा अन्यायाविरुद्ध उठणाऱ्या प्रत्येक आवाजाचा, आणि त्या आवाजाला बळ देणाऱ्या मातृशक्तीचा सन्मान आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजूभाऊ उंबरकर यांच्या मातोश्रींचे निधन

0

वणी, दि. १६ ऑक्टोबर २०२५

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते राजूभाऊ उंबरकर यांच्या मातोश्री सौ. सुनंदाबाई मधुकरराव उंबरकर रा. वणी यांचे आज (१६ ऑक्टोबर २०२५) दुपारी बारा वाजता अल्पशा आजाराने आकस्मिक निधन झाले. त्या वयाच्या ७६व्या वर्षी होत्या. त्यांच्या निधनाने उंबरकर कुटुंबावर शोककळा पसरली असून वणी परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

सुनंदाबाई उंबरकर या अत्यंत धार्मिक, प्रेमळ व समाजकार्यात सक्रिय होत्या. त्यांच्या सौजन्यपूर्ण स्वभावामुळे परिसरात त्यांना ‘सुनंदाताई’ म्हणून ओळखले जात असे. कुटुंबीयांसोबतच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान लक्षणीय होते.

त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे व नातलगांचा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने उंबरकर कुटुंब तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांत शोककळा पसरली आहे.

स्थानिक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून, राजूभाऊ उंबरकर यांना विविध स्तरांतून सांत्वनपर संदेश मिळत आहेत.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि परिवारास या दुःखाचा सामना करण्याची शक्ती देवो, हीच सर्वांची प्रार्थना. 🙏

भावपूर्ण श्रद्धांजली…! 💐

वणी विधानसभा क्षेत्रात स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी महाविकास आघाडीला पोषक वातावरण,  सर्व घटक पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येण्याची गरज

0

News Today

प्रतिनिधी – वणीस्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांकडे वणी विधानसभा क्षेत्राचे लक्ष लागले आहे. काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीला सध्या जनतेचा स्पष्ट पाठिंबा मिळत असल्याची राजकीय चर्चा आहे. वातावरण आघाडीला पोषक असूनही, औपचारिक बैठक अद्याप झाली नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी सर्व घटक पक्षातील नेत्यांनी लवकरच एकत्रित येण्याची गरज निर्माण झाली आहे.

पूर्वीच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये आघाडीच्या एकजुटीचा फायदा काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि  शिवसेना (उबाठा) आमदार संजय देरकर यांच्या विजयानं स्पष्टपणे दिसून आला होता. त्या यशाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकत्रित लढा दिल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये आहे.

वणी विभागात एकूण ९ जिल्हा परिषद क्षेत्रे आणि १८ पंचायत समिती गण आहेत. यामध्ये वणी तालुक्यात ५ जिल्हा परिषद व १० पंचायत समिती क्षेत्रे, तर मारेगाव आणि झरीजामणी तालुक्यांत प्रत्येकी २ जिल्हा परिषद व ४ पंचायत समिती गणांचा समावेश आहे. त्यामुळे या भागातील सत्ता समीकरणे ठरविण्यात हीच निवडणूक निर्णायक ठरणार आहे.

दरम्यान, शेतकरी वर्गात वाढत्या असंतोषामुळे राजकीय समीकरणे आणखी बदलताना दिसत आहेत. अपुऱ्या दरांमुळे आणि शासकीय निर्णयांमुळे अस्वस्थ झालेल्या ग्रामीण मतदारवर्गात “शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारला धडा शिकवायचा” अशी भावना वाढीस लागली आहे.

त्याचा थेट लाभ महाविकास आघाडीला होऊ शकतो, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.सध्या तिन्ही घटक पक्षांचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी अंतर्गत चर्चेत व्यस्त आहेत.

औपचारिक बैठक काही दिवसांत होण्याची शक्यता असून, ती झाल्यानंतर उमेदवारांच्या निवडीबाबत एकमत साधले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.जनतेमध्ये निर्माण झालेला उत्साह आणि विरोधकांविरोधातील असंतोष लक्षात घेता, एकत्रित लढा दिल्यास या भागात महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

आठ दिवसापासून बेपत्ता असलेल्या इसमाचा अखेर मृतदेहच आढळला

0

     मृत्यदेह उचलताना पोलिस कर्मचारी दीपक ताटे 

News Today 

वणी :- तालुक्यातील मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीतील दहेगाव येथे घडलेल्या धक्कादायक घटनेत आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कामगाराचा मृतदेह आज सकाळी शेतात आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मृताचे नाव देवेंद्र विठ्ठल पेदाम (वय 40 वर्षे, रा. गायडोंगरी, ता. सावली, जि. चंद्रपूर) असे असून तो दहेगाव येथील शेतमालक प्रवीण युवराज नगराळे यांच्या शेतात मजूर म्हणून काम करत होता. देवेंद्र पेदाम हा 11 ऑक्टोबरपासून घरून बाहेर पडून बेपत्ता झाला होता. कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो सापडला नव्हता.

आज दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारास 11 वाजता, नगराळे यांच्या शेतातील कपाशीच्या झाडांमध्ये एक मृतदेह पडलेला असल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. घटनास्थळी तत्काळ मुकुटबन पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रवीण हिरे, तसेच हेड कॉन्स्टेबल दीपक ताटे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

या तपासात संदीप तिजारे, रवी इसनकर आणि अन्य पोलिस कर्मचारी सहकार्य करीत आहेत. प्राथमिक तपासानुसार मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, देवेंद्र पेदाम यांच्या मृत्यूमुळे गायडोंगरी व दहेगाव परिसरात शोककळा पसरली असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

गडचिरोली पोलिसांचे ऐतिहासिक यश — माओवादी चळवळीला मोठा धक्का, ६१ माओवादींचे आत्मसमर्पण

0

गडचिरोली, दि. १५ ऑक्टोबर २०२५ 

News Today जगदीश वेण्णम 
गडचिरोली :- जिल्ह्यातील माओवादी चळवळीला गडचिरोली पोलिसांनी दिलेला हा जबरदस्त धक्का राज्याच्या इतिहासातील अभूतपूर्व यश मानला जात आहे. पोलिस विभागाच्या दृढ निश्चय, सातत्यपूर्ण गुप्तवार्ता आणि कठोर परिश्रमामुळे पोलीत ब्युरो सदस्य आणि केंद्रीय समिती सदस्य भुपती ऊर्फ सोनूसह तब्बल ६१ माओवादी सदस्यांनी आत्मसमर्पण करून लोकशाहीच्या प्रवाहात प्रवेश केला.

या आत्मसमर्पितांकडे ५४ अग्निशस्त्रे होती, जी पोलिसांच्या कार्यक्षम आणि नियोजित कारवाईचे उत्तम उदाहरण आहे. गडचिरोली पोलिस आणि CRPF यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे २०२५ मध्येच आतापर्यंत १०१ माओवादी आत्मसमर्पण झाले असून, २००५ पासून आजपर्यंत ७२२ माओवादींनी हिंसेचा मार्ग सोडला आहे.


🔹 पोलिस दलाचे शौर्य आणि जबाबदारीचे उदाहरण

गडचिरोली पोलिसांनी अत्यंत संवेदनशील, पण निर्धारपूर्वक धोरण राबवून अनेक वर्षांपासून हिंसेच्या गर्तेत असलेल्या माओवादी कार्यकर्त्यांना शांततेच्या मार्गावर आणले. पोलिसांच्या या प्रयत्नांना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनीही मोठा गौरव देत, गडचिरोली पोलिस दलाला १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले.


🔹 आत्मसमर्पितांसाठी पुनर्वसन निधी — पोलिसांची मानवतावादी भूमिका

शासनाच्या एस.आर.ई. (SRE) निधीतून आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना ३ कोटी ०१ लाख ५५ हजार रुपयांचे पुनर्वसन सहाय्य देण्यात आले. हे पुनर्वसन धोरण पोलिसांच्या “कायदा आणि करुणा” या दुहेरी तत्त्वज्ञानाचे प्रतीक ठरले आहे. पोलिस फक्त शस्त्राने नव्हे, तर विश्वासाने आणि संवादाने शांती प्रस्थापित करत आहेत, हे पुन्हा अधोरेखित झाले.


🔹 मुख्यमंत्री फडणवीस : “पोलिसांच्या धाडसामुळेच गडचिरोली बदलत आहे”

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रसंगी म्हटले,

“गडचिरोली पोलिस दलाने कठीण परिस्थितीत काम करून आज इतिहास घडवला आहे. माओवादी चळवळ संपुष्टात येण्याच्या उंबरठ्यावर आहे. हिंसेचा त्याग करून शांततेचा मार्ग स्वीकारणाऱ्या आत्मसमर्पितांचे स्वागत आहे, परंतु या यशामागे पोलिस दलाची निष्ठा, संयम आणि तळमळ आहे.”


🔹 उपस्थित मान्यवर आणि पोलिसांचा गौरव

या ऐतिहासिक सोहळ्यास गडचिरोली पोलिस मुख्यालयातील शहीद पांडू आलाम सभागृहात आमदार, वरिष्ठ पोलीस अधिकारी, CRPF चे प्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी गडचिरोली पोलिसांच्या अथक परिश्रमांचे मनःपूर्वक कौतुक केले.


🔹 पोलिसांचे ध्येय — “शांत गडचिरोली, समृद्ध गडचिरोली”

गडचिरोली पोलिस दलाने गेल्या काही वर्षांत केवळ सुरक्षा नव्हे, तर सामाजिक विश्वास पुनर्स्थापित करण्याची जबाबदारीही उत्तमरीत्या निभावली आहे. आजचा दिवस हा त्या प्रयत्नांचा परिपाक आहे. पोलिसांनी दाखवलेला धैर्य, कर्तव्यनिष्ठा आणि मानवतावाद यामुळे गडचिरोलीत शांततेचा नवा अध्याय सुरू झाला आहे.

वणी शहरात राजकीय भूकंप — भाजपचे दिग्गज नेते विजय चोरडिया यांचा शिंदे गटात प्रवेश; भाजपचा वाजला खुळखुळा

0

News Today

दिलीप भोयर

वणी (प्रतिनिधी): वणी शहराच्या राजकारणात आज एक मोठी उलथापालथ झाली आहे. भाजपचे ज्येष्ठ व प्रभावशाली नेते, समाजसेवक आणि दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे विजय चोरडिया यांनी भाजपला “जय श्रीराम” ठोकत “जय महाराष्ट्र” म्हणून शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला. हा प्रवेश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत झाला. माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा प्रवेश झाल्याची माहिती आहे. 

चोरडिया यांनी शिंदे गटाचा झेंडा हातात घेत “जय महाराष्ट्र!” च्या घोषणांनी वातावरण दणाणून टाकले. त्यांच्या प्रवेशामुळे वणी शहरातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. स्थानिक राजकारणात शिंदे गटाची पकड अधिक मजबूत होत असून भाजपच्या गोटात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.

विजय चोरडिया हे वणी शहरात सामाजिक, शैक्षणिक आणि जनकल्याणकारी उपक्रमांमुळे अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांच्या दानशूर वृत्तीमुळे सर्वपक्षीय संबंध चांगले असल्याचेही पाहायला मिळते. गेल्या काही वर्षांत त्यांच्या नेतृत्वामुळे भाजपला वणी परिसरात मजबूत पायाभरणी मिळाली होती. मात्र, पक्षातील सततचा उपेक्षाभाव आणि  एका (मामा) माजी आमदाराकडून होणारा अपमान यामुळे त्यांनी अखेर भाजप सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

शिंदे गटात प्रवेशानंतर बोलताना चोरडिया म्हणाले, “वणीच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी आता एकत्र येण्याची वेळ आली आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विकासाची नवी गती मिळेल, असा मला विश्वास आहे.”

राजकीय वर्तुळात या हालचालीने खळबळ उडाली असून, येत्या नगरपरिषद निवडणुकीत शिंदे गटाचा दावा अधिक बळकट होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या वणी शहरात चर्चेचा एकच विषय आहे —
“भाजपचा खुळखुळा वाजला, शिंदे गटाचा जयघोष झाला!” या घडामोडीनंतर वणीचे राजकारण नव्या दिशेने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

श्री संत खेमराज बाबा यांच्या प्रकट दिनाला होणार विश्व प्रसिद्ध बनारस काशीच्या भव्य गंगा आरतीचे दर्शन

0

पंधराव्या प्रकट दिन सोहळ्या निमित्य
विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
____________________________
विशेष आकर्षण हरिपाठाने
दुमदुमणार पिंपरी (कायर) नगरी
____________________________

News Today 

वणी:-  श्री संत खेमराज महाराज यांचा पंधरावा प्रगट दिनाचे औचित साधून दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री संत खेमराज महाराज यांचा पंधरावा प्रगट दिन सोहळा दि. १७ ऑक्टोंबर २०२५ रोज शुक्रवारला साजरा करण्यात येणार आहे.

या प्रकट दिन सोहळ्याला दूरवरून भावीक भक्त पिंपरी (कायरला) दाखल होणार आहे. श्री संत खेमराज महाराज यांचे दर्शन आणि आशिर्वादाचा लाभ यावेळी भाविक भक्तांना घेता येणार आहे.

श्री संत खेमराज महाराज यांनी अनेकांना व्यसनापासून दूर केले अनेकांचे सुखी संसार करण्यास “महाराष्ट्र रत्न पुरस्कृत” श्री संत खेमराज महाराज यांचे योगदान आहे. त्यांच्या या योगदानाची जाणीव व त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन अनेक जण या दिनाला दिवाळी सारखा हा प्रकट दिन उत्सव साजरा करतात .

या दिनी ग्रामवासी घरापुढे रांगोळी काढून, चहा पाण्याची, नाश्त्याची व्यवस्था करून, श्री संत खेमराज महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करतात त्यांचे औक्षवण करतात श्री संत खेमराज महाराज यांच्या दर्शनाने भाविक भक्त सुखावून जातात, त्यांची आरती ओवाळतात. श्री संत खेमराज महाराज की जय असा जयघोष करीत त्यांना वंदन करतात.

श्री संत खेमराज महाराज यांच्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त
दिनांक १६ ऑक्टोबर रोज गुरुवारला होमहवन व महारुद्राभिशेक
सद्‌गुरु श्री खेमराज महाराज यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
वृंदावन काशीचे पंडीत यांच्या उपस्थितीत वरोऱ्याचे सुरपाम महाराज यांचे किर्तन होणार असून त्यानंतर घुगरी काल्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक १७ ऑक्टोंबर रोज शुक्रवारला
सकाळी ८. वाजून १६ मिनिटांनी भव्यशोभा यात्रा व सद्गुरु श्री जगन्नाथ बाबा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या पालखी सोहळ्यात विशेष आकर्षण हरिपाठ उपस्थिताचे लक्ष वेधणार असून यात हरिपाठ मंडळ परसोनी, वेगाव, डोंगरगाव, झरपट, सोमनाळा, नवेगाव यांचा समावेश राहणार आहे.

सकाळी १० वाजून १६ मिनिटाने भव्य रक्त दान शिबीराला प्रारंभ होणार आहे या रक्तदान शिबिरा करिता सामान्य रुग्णालय रक्त पेढी विभाग चंद्रपूर तसेच संजयभाऊ निखाडे (शिंदोला) यांचे सहकार्य लाभणार आहे.

दुपारी १२ वाजून १६ मिनिटांनी
कथा व्यास – पूज्य श्री शिवांशूजी महाराज (वृंदावन काशी)
यांच्या प्रवचनाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर मंगेश व सुवर्णा बेलेकार यांचे कडून घुगरी काला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

दुपारी १ वाजून १६ मिनिटांनी विश्व प्रसिद्ध बनारस काशीच्या भव्य गंगा आरतीचे दर्शन उपस्थित भावी भक्तांना होणार आहे. या आरतीसाठी काशीतील ६ पंडित या ठिकाणी दाखल होणार असून या पंडितांच्या हस्ते गंगा आरती संपन्न होईल.

बाहेर गावातील पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविक भक्तांनी तसेच भजनी मंडळाने 17 ऑक्टोबरला सकाळी ठीक ८ वाजता सद्गुरु जगन्नाथ महाराज नंदीगड संस्थान पिंपरीला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर गजानन पावडे यांनी केले आहे.

वणी पंचायत समितीच्या आरक्षणाची सोडत संपन्न; १० गणांसाठी जागावाटप जाहीर

0

News Today 

वणी (प्रतिनिधी) : वणी पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत आज तारीख १३ रोजी दुपारी १२ वाजता महसूल भवन येथे वणी येथील निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नितीन कुमार हिंगोळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सोडतीत एकूण १० गणांकरिता जागावाटप निश्चित करण्यात आले असून त्यापैकी ५ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यातील सभापतींच्या आरक्षणाची सोडत यवतमाळ येथे काल तारीख ११ रोजी संपन्न झाली असता अनुसूचित जमातीसाठी महिला राखील आहे.

एकूण १,५१,४०९ लोकसंख्येच्या वणी पंचायत समिती अंतर्गत १० गणांमध्ये पुढीलप्रमाणे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे —

खुला प्रवर्ग (एकूण ५ जागा):
१. चिखलगाव – सर्वसाधारण महिला
२. नांदेपेरा – सर्वसाधारण (पुरुष/महिला)
३. वेल्हाळा (वसाहत) – सर्वसाधारण (पुरुष/महिला)
४. शिरपूर – सर्वसाधारण महिला
५. वागदरा – सर्वसाधारण महिला

अनुसूचित जमाती (ST) – २ जागा:
१. कायर – महिला
२. घोंसा – पुरुष/महिला

अनुसूचित जाती (SC) – १ जागा:
राजूर – पुरुष/महिला

नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC/नामप्र) – २ जागा:
१. तरोडा – पुरुष/महिला
२. शिंदोला – महिला

सोडतीदरम्यान निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या सोबत सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार निखिल धूळघर आणि पंचायत समिती वणीचे गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर , विवेक पांडे आदी उपस्थित होते.

आरक्षणाची सोडत “मंथन” या पाच वर्षीय बालकाच्या हस्ते पार पडली. बालकाने उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत बॉक्समधून चिट्ठ्या काढून आरक्षण ठरविले.

यावेळी सर्व गणनिहाय मतदार याद्या प्रकाशित करण्यात आल्या असून, नागरिकांना त्या तपासून आक्षेप नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आजच आक्षेप नोंदविण्याची अंतिम तारीख असल्याचे निवडणूक अधिकारी यांनी स्पष्ट केले.

वणी पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ही सोडत प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पडल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

यवतमाळ चे पॅराविधी स्वयंसेवक. ऍड. वासुदेव विधाते यांची राष्ट्रीय परिषदेसाठी निवड

0

News Today 

वणी :- यवतमाळ जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत पॅरा विधी स्वयंसेवक ऍड. वासुदेव लक्ष्मण विधाते यांची ८ व ९ नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथील आयोजित राष्ट्रीय परिषदेसाठी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी म्हणून राज्य पातळीवर निवड करण्यात आली आहे.

वासुदेव विधाते यांच्या उत्कृष्ट कामामुळे त्यांचे नाव या राष्ट्रीय परिषदेसाठी नामनिर्देशित केले

होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांनी या नामांकनाची दखल घेऊन राज्याच्या वतीने परिषदेला हजर राहण्यासाठी त्यांची निवड केली आहे.

‘विधी सेवा वितरण यंत्रणा बळकट करणे’ या विषयावर ऑडिटोरियम हॉल,

अॅडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग कॉम्प्लेक्स, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, नवी दिल्ली येथे सदर परिषद पार पडणार असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव दीपक दाभाडे यांनी वासुदेव विधाते यांना पत्राद्वारे कळविली आहे. या यशाचे प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि सचिवांनी कौतुक केले आहे.