Friday, May 1, 2026
Google search engine
Home Blog Page 10

३१,६२८ कोटींचं मदत पॅकेज फसवणूक! महायुती सरकार शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळतंय” — राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) गटाचे वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांचा सरकारवर हल्लाबोल

0

News Today 

मंगेश गोरे (प्रतिनिधी)
वणी : – राज्यातील शेतकरी अतिवृष्टीच्या संकटातून सावरायच्या आधीच, महायुती सरकारने केलेल्या “३१,६२८ कोटींच्या मदतीची” घोषणा ही केवळ कागदोपत्री नौटंकी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाचे वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांनी केला आहे. “ही मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखी आहे,” असा घणाघात करत त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले.

🌧️ अतिवृष्टीने उद्ध्वस्त शेती
जून ते सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे शेतजमीन, पिके, जनावरे, विहिरी आणि घरे उद्ध्वस्त झाली. मात्र, सरकारची घोषित मदत “फक्त घोषणा” राहिली असून, यवतमाळ जिल्ह्यातील वणी, झरी जामणी आणि मारेगाव तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

📉 “मदत” की मजाक?
कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर फक्त ₹१८,५००, तेही १००% नुकसान झालेल्यांसाठीच! (जिरायती पिकांचा प्रत्यक्ष खर्च ₹७०-₹८५ हजार प्रति हेक्टर असल्याने ही मदत केवळ २५% इतकीच)
बागायती शेतकऱ्यांसाठी ₹३२,५०० प्रति हेक्टर, पण ३

हेक्टरची मर्यादा — मोठे शेतकरी वंचित.
पिकविमा योजनेअंतर्गत ४५ लाख शेतकऱ्यांना मदतीची घोषणा — परंतु प्रत्यक्षात निधी मिळेल का, याबाबत शंका.
विहिरी, घरे, जनावरे यांची नुकसानभरपाई हास्यास्पद — ₹३०,००० विहिरीसाठी, ₹५,००० घरासाठी, तर पूर्णपणे उद्ध्वस्त घरासाठी फक्त ₹१.३० लाख!

🌾 रब्बी हंगाम धोक्यात!
भोयर यांनी इशारा दिला की खरीपातील नुकसान अजून भरून निघालेले नाही आणि रब्बी पिकांसाठी ठोस योजना नाही. “खत-बियाण्यांसाठी जाहीर केलेले ₹१०,००० अपुरे आहेत; शेतकरी पुन्हा कर्जाच्या दलदलीत अडकणार,” असे ते म्हणाले.

📍 ‘सर्वे’ नावाचा खेळ:
यवतमाळ जिल्ह्यात केवळ ५०% नुकसान सर्वे पूर्ण झाले असून, वणी विधानसभा क्षेत्रात अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. “कागदावरचे सर्वे, फोटोवरचे सर्वे — प्रत्यक्ष नुकसानाचं वास्तव सरकारला कळतच नाही,” असा आरोप भोयर यांनी केला.

💬 दिलीप भोयर यांचा सवाल:
“सरकार शेतकऱ्यांना खरोखर आधार देतंय की फसवतंय? ३१,६२८ कोटींचं पॅकेज मोठं वाटतं, पण अटी-शर्तींनी ते निष्प्रभ झालं आहे. ही मदत म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखी आहे. सरकारने खऱ्या अर्थाने आधार द्यावा, दिखावा नव्हे!”

📢 दिलीप भोयर यांच्या प्रमुख मागण्या:
प्रति हेक्टर किमान ₹ ५०,००० मदत, आणि मर्यादा ५ हेक्टरपर्यंत वाढवावी.
यवतमाळसह सर्व जिल्ह्यांत १००% नुकसान सर्वे तातडीने पूर्ण करावा.
कर्जमाफी, बी-बियाणे सबसिडी आणि रब्बी हंगामासाठी विशेष योजना राबवावी.
शेतकऱ्यांसाठी मनोवैज्ञानिक आधार केंद्रे सुरू करावीत.

“मोठ्या घोषणांपेक्षा प्रामाणिक अंमलबजावणी महत्त्वाची आहे. अन्यथा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे हे संकट अधिक भीषण होईल आणि येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या आणखी आत्महत्या वाढतील अशी चिंता देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गट, वणी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष दिलीप भोयर, यांनी व्यक्त केली. 

 

महाराष्ट्र राज्य किसान सभेचा 28 ऑक्टोबरला नागपूर येथे महाएल्गार मोर्चा – वणी क्षेत्रातून हजारो शेतकरी सहभागी होणार – काॅ. अनिल हेपट

0

News Today 

वणी – शेतकऱ्यांना पीकविमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळत नसताना, सरकार मात्र या कंपन्यांना 1 हेक्टर सोयाबीनसाठी ₹16,500 इतके अनुदान देत आहे. त्याचवेळी शेतकऱ्यांना आपत्तीग्रस्त मदत केवळ ₹8,500 इतकी, तीही नगण्य नुकसानीवर, दिली जाते. तसेच पीककर्ज पुनर्गठनाच्या घोषणेमुळे शेतकरी आणखी कर्जबाजारी होत आहेत.

या अन्यायाविरोधात महाराष्ट्र राज्य किसान सभा आता गप्प बसणार नाही, असा इशारा काॅ. अनिल हेपट यांनी दिला आहे. 28 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे लाखो शेतकरी शासनाविरोधात एल्गार पुकारणार आहेत.

या आंदोलनात वणी विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काॅ. अनिल हेपट, अनिल घाटे, मोरेश्वर कूंटलवार, रवी गोरे, पंढरी मोहीतकार, गणेश कळसकर, प्रविण आडे, गुलाबराव उमरतकर, द्वारका ईमडवार, मनोहर पचारे, विनायक नन्नोरे, गुणवंत डुकरे, अनंत कदम, गोपाल काळे, रामभाऊ दाभेकर, मारोतराव ईमडवार, रामकृष्ण महल्ले, अनुराधा उटाणे, विजया पावडे, राजे तेलतुंबडे, अॅड. गजानन पखाले आदींनी केले आहे.

रॉकाप कामगार आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी किशोर गोंलावार यांची नियुक्ती,

0

News Today 

झरी-जामणी (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) यांच्या कामगार आघाडीच्या झरी-जामणी तालुकाध्यक्षपदी मुकुटबन येथील किशोर अंकुलु गोंलावार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती जिल्हाध्यक्षा वर्षाताई निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वणी विधानसभेचे अध्यक्ष दिलीप भोयर यांचे नेतृत्वात पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष (कामगार आघाडी) आबिद हुसेन यांच्या स्वाक्षरीने प्रदेश संघटन सचिव रज्जाक पठाण यांचे हस्ते करण्यात आली. या प्रसंगी वणी शहराध्यक्ष विनोद ठेंगणे यांच्यासह अनेक कामगार उपस्थित होते.

किशोर गोंलावार यांनी आपल्या नियुक्तीबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार मानत सांगितले की, पक्षाची विचारधारा झरी-जामणी तालुक्यातील प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवून संघटन अधिक बळकट करण्याचे कार्य ते प्रामाणिकपणे करतील. 

तर दिलीप भोयर यांनी या नियुक्तीबाबत बोलताना म्हटले की, गोंलावार यांच्या कार्यतत्परतेचा, समाजसेवेतील सहभागाचा आणि पक्षनिष्ठेचा गौरव म्हणून ही जबाबदारी देण्यात आली आहे.

त्या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी नवीन तालुकाध्यक्षांचे पक्षाचा दुपट्टा देऊन अभिनंदन केले आणि भविष्यात पक्षाच्या धोरणांना बळकटी देण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

बी. एस. इस्पात कंपनीसमोर कामगारांचे आमरण उपोषणाची चेतावणी, प्रकल्पग्रस्तांना डावलून बाहेरच्यांना रोजगार देणे कंपनीला भोवणार

0

News Today 

झरी-जामणी – बी. एस. इस्पात कंपनी, मांगली मार्की खुली खदानमधील जुन्या स्थानिक ३९ कामगारांना पुन्हा कामावर घेण्यात यावे आणि त्यांचा थकित भविष्य निर्वाह निधी (सी.आर.पी.एफ.) त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा, या दोन प्रमुख मागण्यांसाठी कामगारांनी कंपनी प्रशासनाला निवेदन दिले आहे.

वणी विधानसभाक्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गटा) चे अध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृत्वाखाली तर प्रदेश संघटन सचिव रज्जाक पठाण , कामगार सेलचे तालुकाध्यक्ष किशोर गोंलावार वणी शहराध्यक्ष विनोद ठेंगणे यांच्या उपस्थितीत हे निवेदन कंपनीचे खान प्रबंधक यांना देण्यात आले. निवेदनात नमूद केले आहे की, बी. एस. इस्पात कंपनी मागील दीड वर्षांपासून बंद होती. 

त्या काळात स्थानिक कामगारांचा सी. आर.पी.एफ. निधी अद्याप जमा करण्यात आलेला नाही, तसेच कंपनी पुन्हा सुरू झाल्यानंतरही जुन्या प्रकल्पग्रस्त कामगारांना कामावर न घेता बाहेरील कामगारांना प्राधान्य दिले जात आहे.

दिलीप भोयर यांनी निवेदनात इशारा देत म्हटले आहे की, कंपनी प्रशासनाने पंधरा दिवसांच्या आत या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर येत्या १० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता पासून कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर सर्व कामगार आमरण उपोषणास बसतील. 

या आंदोलनादरम्यान कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास कंपनी प्रशासन जबाबदार राहील, असेही नमूद करण्यात आले आहे.या निवेदनाची प्रत आमदार संजय देरकर, उपविभागीय अधिकारी केळापूर, तहसीलदार झरी-जामणी आणि पोलिस निरीक्षक मुकुटबन यांना देण्यात आली आहे.

तेजापूरात युवा शेतकऱ्याची आत्महत्येची धक्कादायक घटना, अतिवृष्टी, कर्जबाजारीपणा आणि शासनाच्या फसव्या मदतीमुळे मंगेश पिंपळकर यांचा मृत्यू

0

News Today

वणी – तालुक्यातील तेजापूर गावातील ३० वर्षीय युवा शेतकरी मंगेश संजय पिंपळकर यांनी आर्थिक आणि मानसिक तणावाला कंटाळून गुरुवारी (ता. २३ ऑक्टोबर) संध्याकाळी विष प्राशन करून आपले जीवन संपवले. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मंगेश पिंपळकर यांच्या मालकीची सुमारे चार एकर शेती असून गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यावर कर्जाचा मोठा भार होता. यावर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि पिकांचे मोठे नुकसान यामुळे त्यांच्या उत्पन्नात मोठी घट येणार असल्याची शक्यता निर्माण झाली.

दरम्यान, सरकारकडून मदतीच्या विविध घोषणा झाल्या तरी प्रत्यक्षात त्या मदतीचे काहीच लाभ शेतकऱ्यांच्या हातात पोहोचले नाहीत. त्यामुळे मंगेश यांच्या मनात प्रचंड नैराश्य निर्माण झाले होते.गुरुवारी सायंकाळी सुमारे सहा वाजताच्या सुमारास, त्यांनी आपल्या घरात विषारी द्रव्य प्राशन केले.

प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तत्काळ कायर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारांसाठी त्यांना वणीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

मात्र डॉक्टरांनी प्रयत्न करूनही त्यांना मृत घोषित केले.मंगेश यांच्या पश्चात पत्नी, एक लहान मुलगी, तसेच वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण तेजापूर गावात शोककळा पसरली आहे.

स्थानिक शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी शासनाकडे पीडित कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत आणि स्थायी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.गावातील नागरिकांचे म्हणणे आहे की, “सरकारने वेळेत आणि प्रत्यक्ष मदत न दिल्यामुळेच या तरुण शेतकऱ्याला टोकाचा निर्णय घ्यावा लागला”. या घटनेनंतर प्रशासन आणि कृषी विभागाने तत्काळ वस्तुस्थितीचा तपास करून योग्य ती मदत करणे अत्यावश्यक असल्याचे मत सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

 

फसव्या आश्वासनांचा निषेध; चटणी-भाकर खाऊन आंदोलकांनी पेटवला अन्यायाचा दिवा, वणीत शिदोरी आंदोलनामुळे शेतकऱ्यांमध्ये सहानुभूतीची लाट

0

News Today

वणी, प्रतिनिधी –
शेतकऱ्यांच्या दुःखावर फसव्या आश्वासनांचा मलमपट्टीचा प्रयत्न करणाऱ्या भाजप शासनाविरुद्ध वणीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने काळी दिवाळी आंदोलन छेडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यासमोर भररस्त्यावर आमदार संजय देरकरांनी कार्यकर्त्यांसह चटणी-भाकर खाऊन शेतकऱ्यांच्या वेदनांना साद दिली आणि शासनाच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध व्यक्त केला.

यवतमाळ जिल्ह्यातील वणी, झरी आणि मारेगाव तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतीची रक्कम मिळेल, असे आश्वासन दिले होते. मात्र, दिवाळीचे दिवस उंबरठ्यावर आले तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात पैशांचा एकही थेंब पडला नाही.

यामुळे संतप्त शेतकरीवर्ग शासनाविषयी प्रचंड नाराज आहे.त्याच पार्श्वभूमीवर वणीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आंदोलन उभारले गेले. काळे कपडे परिधान करून काळी दिवाळी साजरी करत कार्यकर्त्यांनी “शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या”, “हैक्टरी ५० हजार अनुदान द्या”, आणि “फसवे शासन हद्दपार करा” अशा जोरदार घोषणा दिल्या. शासन निर्णयांच्या प्रती जाळून आंदोलनकर्त्यांनी अन्यायाचा दिवा पेटवत शासनाच्या धोरणांचा विरोध केला.

आमदार संजय देरकर यांच्यासह जिल्हाप्रमुख संजय निखाडे, उपजिल्हाप्रमुख दीपक कोकास, शरद ठाकरे, सुनील कातकडे, सुधीर थेरे, गणपत लेडांगे, संतोष कुचनकर, प्रकाश कराड, दिलीप काकडे, प्रमोद भगत, भगवान मोहिते, प्रेमानंद धानोरकर, कुंदन टोंगे, आणि अनेक पदाधिकारी व शिवसैनिक या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेत “सरसकट कर्जमाफी आणि हेक्टरी ५० हजार रुपये अनुदानाची तातडीने अंमलबजावणी व्हावी,” अशी मागणी आमदार देरकर यांनी केली. त्यांनी सरकारवर टीका करत म्हटले की, “शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने ही केवळ धूळफेक आहे; या खोट्या घोषणांनी दिवाळीचे दिवे विझवले आहेत.

”या काळ्या दिवाळी आंदोलनाने वणी परिसरात एक संवेदनशील वातावरण निर्माण केले आहे. दिवाळीच्या प्रकाशातही असमानतेचा अंधार अधोरेखित करत शिवसैनिकांनी पेटवलेला “अन्यायाचा दिवा” आज शेतकऱ्यांच्या संघर्षाचे प्रतीक ठरला आहे.

 

वणीतील खाजगी कंपन्यांत ८०% स्थानिकांना रोजगार द्या; कामगारांना धमकावाल तर खबरदार  — कॉ. अनिल हेपट

0

News Today 

वणी :-  वणी विधानसभा मतदारसंघातील खासगी कोळसा, सिमेंट आणि इतर उद्योगांमध्ये 80% स्थानिक युवकांना नोकरी देण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) तर्फे जोरदारपणे करण्यात आली आहे.

या मागणीसाठी स्थानिक भूमीहिन शेतकरी व युवकांनी कॉ. अनिल हेपट यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत आंदोलन सुरू केले असून, या आंदोलनाला दिवाळीसारख्या सणाच्या काळातही मोठा जनसमर्थन मिळत आहे.

भाकपने बेलोरा-निलजई परिसरातील जिएनआर व साईडएक्स कंपन्यांमध्ये शेती गमावलेल्या भूमीपुत्रांना रोजगार देण्याची वारंवार मागणी केली होती.

मात्र कंपन्यांनी दिलेले आश्वासन न पाळल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला. याच पार्श्वभूमीवर १६ ऑक्टोबर रोजी ठिया आंदोलन, १७ ऑक्टोबर रोजी रस्ता रोको, तसेच १८ व १९ ऑक्टोबर रोजी कामबंद आंदोलन करण्यात आले.भाकपने शासनाच्या १८ नोव्हेंबर २००८ च्या आदेशाचा दाखला देत सांगितले की, स्थानिक युवकांना ८०% प्राधान्याने रोजगार देणे कंपन्यांना बंधनकारक आहे. तरीदेखील वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) निलजई प्रकल्पासह ठेकेदार कंपन्या हा नियम पाळत नाहीत, असा आरोप करण्यात आला आहे.

कॉ. अनिल हेपट यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर टीका करत स्पष्ट इशारा दिला की, आंदोलनकर्त्यांना धमकावण्याचा किंवा दडपशाहीचा प्रयत्न झाल्यास भाकपचे लाल सैनिक योग्य पद्धतीने उत्तर देतील. “कंपन्यांनी मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा गुन्हे दाखल करा; पण आमचा लढा थांबवणार नाही,” असे ठाम वक्तव्य त्यांनी केले.दरम्यान, साईडएक्स कंपनीकडून आंदोलन दडपण्यासाठी स्थानिकांना धमकावण्याचा प्रकार समोर आल्याचा गंभीर आरोप उभा राहिला आहे.

“कंपनीच्या दबावामुळे परिसरातील शांतता आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासन मात्र मौन बाळगत आहे,” असा संताप आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.कॉ. अनिल हेपट, कॉ. अनिल घाटे, कॉ. मोरेश्वर कुंटलवार आणि कॉ. अथर्व निवडींग यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले हे आंदोलन “स्थानिकांना रोजगार द्या, बाहेरच्यांचा हस्तक्षेप थांबवा” या घोषणांनी ऊर्जित आहे.

भाकपने स्पष्ट इशारा दिला आहे की, स्थानिक युवकांना न्याय मिळेपर्यंत आणि बेकायदेशीर ठेक्यांवर कारवाई होईपर्यंत हा संघर्ष अखंड सुरू राहील.

वणी शहरात ‘बंदी’ असूनही सुगंधित तंबाखूचा मोकळा कारोबार! अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन — पोलीस आणि एफ.डी.ए. विभाग करतात तरी काय?

0

News Today 

वणी (प्रतिनिधी) :
महाराष्ट्र शासनाने अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ आणि अन्न सुरक्षा नियम २०११ अंतर्गत सुगंधित तंबाखू, गुटखा आणि तंबाखू मिश्रित पान मसाल्यांवर कठोर बंदी लागू केली असतानाही, वणी शहरात या घातक पदार्थांचा व्यापार बेधडक सुरू असल्याचे वास्तव समोर आले आहे.

जुन्या बसस्टॉपजवळील एका कृषी केंद्रासमोरील दुकानात सुगंधित तंबाखूचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याची माहिती स्थानिक सूत्रांकडून मिळाली आहे. ही तंबाखू शहरात विविध छोट्या किराणा दुकांनांतून आणि पानठेल्यांमधून ग्राहकांपर्यंत पोहोचवली जात असल्याचेही समजते.

अन्न सुरक्षा अधिनियमाच्या कलम 26(2)(i) व नियम 2.3.4 नुसार तंबाखू आणि निकोटीनयुक्त कोणत्याही पदार्थाचे अन्नपदार्थ म्हणून उत्पादन किंवा विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. तरीदेखील, काही व्यापारी आणि पुरवठादार प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फायदा घेत हे पदार्थ खुलेआम विक्रीस ठेवत आहेत.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एका नागरिकाने संताप व्यक्त करत सांगितले,

“राज्य सरकारने लोकांच्या आरोग्यासाठी हा कायदा केला. पण शहरात गुटखा आणि सुगंधित तंबाखू सहज उपलब्ध आहे. पोलीस आणि एफ.डी.ए. विभाग दोघेही डोळेझाक करत आहेत.”

या अगोदरही महादेव नगरातील एका आरोपीवर गुटखा तस्करीचा गुन्हा दाखल होऊन तो कोठडीत गेला होता, परंतु काही काळातच तो पुन्हा या बेकायदेशीर धंद्यात सक्रिय झाल्याची माहिती समोर आली आहे. यावरून प्रशासनाची कारवाई केवळ “कागदोपत्री” असल्याचे स्पष्ट होते.

अन्न व औषध प्रशासन (FDA) विभाग आणि स्थानिक पोलीस यांना कायद्यानुसार अशा तंबाखू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करून माल जप्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु अशा प्रकारच्या छाप्यांची नोंद मागील काही महिन्यांत नाही.

नागरिकांनी आता “प्रशासनाने जागे होऊन तातडीने कारवाई करावी, अन्यथा आम्ही आंदोलनाचा मार्ग अवलंबू” असा इशारा दिला आहे.

राज्य सरकारने लागू केलेल्या बंदीच्या अधिसूचनेनुसार, सुगंधित तंबाखू विक्रीचा गुन्हा केल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि मोठा दंड होऊ शकतो. तरीदेखील वणीतील काही विक्रेत्यांना या कायद्याची पर्वा नसल्याचे चित्र दिसत आहे.

शहरातील तरुण पिढीच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या तंबाखू माफियांवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे, अशी एकमुखी मागणी वणीकरांकडून होत आहे.

लिंकिंगद्वारे खत खरेदीची सक्ती — कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडच्या जिल्हा प्रतिनिधीवर गुन्हा दाखल

0

News Today 
वणी (प्रतिनिधी): शेतकरी अस्मानी व दुष्काळी संकटात सापडलेले असताना खत खरेदीसाठी जबरदस्तीचा प्रकार समोर आला आहे. कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड या खत कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधी भूपेंद्र पाल सिंग (रा. यवतमाळ) यांच्यावर लिंकिंगद्वारे खते खरेदीची सक्ती केल्याप्रकरणी पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई झरी-जामणी तालुक्यातील कृषी विक्रेत्यांच्या तक्रारीनंतर करण्यात आली. स्थानिक कृषी निविष्ठा विक्रेत्यांना अनुदानित युरिया, डीएपी सोबत कंपनीची इतर खते खरेदी करण्यास सक्ती करण्यात येत असल्याची बाब उघड झाली होती. यवतमाळ जिल्हा कृषी साहित्य उत्पादक आणि विक्रेता असोसिएशनने या प्रकरणी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले होते.

त्यानंतर झरी तालुका कृषी अधिकारी घनश्याम वसंत बहिरम यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून पाटण पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी भूपेंद्र पाल सिंग हे कृषी विक्रेत्यांना युरिया किंवा डीएपी खत देताना इतर खते लिंक करून खरेदी करण्याची सक्ती करत होते. काही विक्रेत्यांनी नकार दिल्यास त्यांना विना-लिंकिंग खते देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचेही नमूद आहे.

या तक्रारीवरून पाटण पोलिसांनी अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या कलम 3(2) चे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 7 नुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पाटण पोलिसांकडून सुरू आहे.

कृषी विभागाकडून अशा प्रकारच्या सक्तीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला असून शेतकऱ्यांमध्ये या कारवाईनंतर समाधानाचे वातावरण आहे.

दिप उत्सवाच्या पर्वात आम्ही मिठाई विकत घेतो की कॅन्सर, बनावट मिठाईचा गोडवा देतोय आजारांना आमंत्रण,  सणासुदीच्या गोडधोड बाजारात रसायनांचा सडा 

0

News Today

प्रतिनिधी
वणी:- दिवाळीचा सण उजाडला की बाजारपेठेत फरसाण, लाडू, बर्फी, चकली, चिवडा, पेढे अशा गोडधोड पदार्थांची रेलचेल वाढते. मात्र या गोडधोड वातावरणातही एक कडू वास्तव समोर आले आहे — बनावट मिठाई आणि फरसाण मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत. आकर्षक रंग, कमी दर आणि चवदारपणा दाखवण्यासाठी व्यापाऱ्यांकडून धोकादायक रासायनिक पदार्थांचा वापर होत असल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे नागरिकांनी आपला उत्सव साजरा करीत असताना आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा कन्सर सारख्या गंभीर आजाराला सामोरे जाण्याची शक्यता वाढली आहे. 

✴️ “चमकदार मिठाई, आत मात्र विषारी रंग”

गुलाबी, पिवळी, हिरवी अशा चमचमीत मिठाया ग्राहकांना आकर्षित करत आहेत. परंतु या मिठाईत मेटॅनिल यलो, रोडामाइन बी, मेलाकाइट ग्रीन सारखे औद्योगिक रंग वापरले जातात. हे रंग पचनसंस्थेस हानी पोहोचवतात आणि दीर्घकाळ सेवन केल्यास कॅन्सरचाही धोका वाढतो.

✴️ “दूधात डिटर्जंट, खव्यात यूरिया!”

स्वस्तात जास्त उत्पादन मिळवण्यासाठी काही मिठाई विक्रेते कृत्रिम दूध व खवा तयार करतात. यात डिटर्जंट, यूरिया, रिफाइंड ऑइल व स्टार्च मिसळले जातात. अशा मिठाईचे सेवन केल्याने मूत्रपिंड आणि यकृताचे आजार वाढतात.

✴️ “गोडपणात लपलेले साखरविरहित विष”

साखरेऐवजी काही ठिकाणी सॅक्रीन, सायक्लामेट यांसारखे कृत्रिम गोडवा देणारे पदार्थ वापरले जातात. हे पदार्थ स्वस्त आणि टिकाऊ असले तरी आरोग्यास घातक ठरतात. यामुळे हार्मोनल बदल, अ‍ॅलर्जी आणि कर्करोगाचा धोका निर्माण होतो.

✴️ “फरसाणात जुने तेल आणि बेकिंग पावडर”

फरसाण, चकली, शंकरपाळे तयार करताना वारंवार वापरलेले तेल वापरले जाते. हे तेल ‘ट्रान्स-फॅट’ वाढवते आणि हृदयविकार निर्माण करते. शिवाय काही ठिकाणी अॅल्युमिनियमयुक्त बेकिंग पावडर वापरली जाते, जी पचनसंस्थेवर ताण आणते.

⚠️ आरोग्य तज्ज्ञांचा इशारा

आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, “ग्राहकांनी अत्यंत आकर्षक रंगाच्या मिठाईंपासून सावध राहावे. स्वस्त दरात मिळणारी मिठाई सुरक्षित असेलच असे नाही. रासायनिक पदार्थांची चव क्षणिक असते, पण त्याचे दुष्परिणाम दीर्घकाल टिकतात.”

📦 ग्राहकांसाठी ‘वणी न्यूज टुडे’ची सावधान सूचना

🔹 प्रमाणित व ओळखीतल्या दुकानातूनच मिठाई खरेदी करा.
🔹 नैसर्गिक रंग-वास असलेले पदार्थच घ्या.
🔹 स्वस्त आकर्षणाऐवजी गुणवत्तेकडे लक्ष द्या.
🔹 शक्यतो घरगुती मिठाई आणि फरसाण तयार करा.

💬 शेवटचा शब्द

दिवाळीचा आनंद गोडधोडाशिवाय अपूर्ण असतो. मात्र बनावट गोडधोडांनी तो आनंद कडू होऊ नये. खऱ्या अर्थाने “गोड” दिवाळी साजरी करायची असेल, तर सजग व्हा, सुरक्षित राहा आणि आरोग्याचा खरा गोडवा जपा!