News Today
पांढरकवडा :- इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्ट्स ऑफ इंडियामार्फत घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल अभ्यासक्रमाच्या फाउंडेशन, इंटरमिडिएट आणि अंतिम परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला.
या निकालात यवतमाळ जिल्ह्याचे नाव अभिमानाने उजळवणारा विद्यार्थी म्हणजे ताडउमरी (ता. पांढरकवडा) येथील वैभव सुनील गवळी आर्थिक अडचणींशी झुंज देत, अढळ इच्छाशक्तीच्या बळावर त्याने चार्टर्ड अकाउंटंटच्या अंतिम परीक्षेत यश मिळवले आहे.

गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वैभवने लहानपणीच संघर्षाचे चटके अनुभवले. वडील सुनील गवळी शेतकरी असून मर्यादित उत्पन्नात त्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी दिवस रात्र मेहनत घेतली. घरातील सर्वांनी त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्याला शिक्षणासाठी आवश्यक प्रोत्साहन दिले.
या आधारावर वैभवने शिक्षणाला जीवनाचे ध्येय मानले.वैभवचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण पांढरकवडा येथे झाले, तर चार्टर्ड अकाउंटंट अभ्यासक्रम त्याने नागपूर येथे पूर्ण केला. त्याच्या म्हणण्यानुसार, “प्रतिकूल परिस्थिती माणसाला घडवते. नियमित अभ्यास, शिस्त आणि आत्मविश्वास हेच यशाचे खरे सूत्र आहे.
” वैभवने आपल्या यशाचे श्रेय आपल्या पालकांना, आजी-आजोबांना, काका-काकूंना, शिक्षकांना आणि मित्रपरिवाराला दिले.या यशामुळे ताडउमरी गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. गावकरी, शिक्षक, मित्रपरिवार आणि विविध सामाजिक संघटनांनी वैभव व त्याच्या कुटुंबाचे अभिनंदन केले.
शेतकरी समाजातून असे यश मिळवणारा वैभव अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.यवतमाळ जिल्ह्यातील सात विद्यार्थी अंतिम परीक्षेत यंदा यशस्वी ठरले असून तीन विद्यार्थी फाउंडेशन परीक्षेत उत्तीर्ण झाले.
त्यापैकी वैभव गवळीचे नाव विशेष उल्लेखनीय ठरले आहे. ग्रामीण भागातील जिद्दी आणि अभ्यासू तरुणांच्या यशकथांमधील वैभवची कहाणी ही पुढील पिढीला प्रेरणा देणारी आहे.



