News Today
यवतमाळ:- वणी शहरातील पंचशील नगर परिसरात ८ डिसेंबर २०२५ रोजी उघडकीस आलेल्या सुगंधित तंबाखू तस्करी प्रकरणात आता गंभीर वळण लागले असून, पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरच संशयाची छाया निर्माण झाली आहे. या प्रकरणात तपास अधिकाऱ्याच्या संशयास्पद कार्यप्रणालीविरोधात युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य सुभाष शेंडे यांनी थेट पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सादर करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
८ डिसेंबर रोजी पंचशील नगर येथील जागरूक नागरिकांनी ‘११२’ या आपत्कालीन क्रमांकावर तंबाखूची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून सुगंधित तंबाखूची मोठी खेप जप्त केली. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता अन्न व औषध प्रशासनाने (FDA) देखील कठोर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मात्र, या कारवाईनंतर तपास ज्या पद्धतीने पुढे जात आहे, त्यावरून पोलिसांचे तंबाखू माफियांशी संगनमत असल्याचा आरोप होत आहे. गुन्ह्यात प्रत्यक्ष वापरलेले वाहन (क्रमांक MH-24-BL-7051), त्याचा चालक व मालक यांची संपूर्ण माहिती उपलब्ध असतानाही तब्बल एक महिना उलटूनही सदर वाहन जप्त करण्यात आलेले नाही. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्ष साक्षीदार उपलब्ध असतानाही ही दिरंगाई होत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
अजिंक्य शेंडे यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, वाहन जप्त न केल्यामुळे तस्करीमागील आर्थिक साखळी व मुख्य सूत्रधार उघड होण्यास अडथळा निर्माण होत आहे. ही बाब केवळ प्रशासकीय दुर्लक्ष नसून आरोपींना वाचवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचा संशय बळावत आहे. तपास अधिकाऱ्याची संथ आणि उदासीन भूमिका पाहता शहरात बेकायदेशीर धंद्यांना पोलीस संरक्षण मिळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
युवासेनेच्या वतीने करण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये, संबंधित वाहन तात्काळ जप्त करून मालक व चालकावर कठोर कारवाई करणे, FDA ने नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार तंबाखू मागवणाऱ्या मुख्य आरोपीला त्वरित अटक करणे, तसेच तपासात दिरंगाई करणाऱ्या तपास अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करणे यांचा समावेश आहे.
जर येत्या ४८ तासांत ठोस कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. जनतेचा पोलिसांवरील विश्वास टिकवण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या प्रकरणाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, पोलीस प्रशासन पुढील काळात काय भूमिका घेते, याकडे नागरिक आणि सामाजिक संघटनांचे लक्ष केंद्रित झाले आहे. यावेळी युवासेना समन्वयक आयुष ठाकरे, सुरेश शेंडे उपस्थित होते.