दिलीप भोयर
News Today
वणी शहरातील “नमो उद्यान” प्रकल्पाच्या फलकावरून निर्माण झालेला वाद अधिकच तीव्र झाला असून, या प्रकरणाने आता राजकीय आणि सामाजिक रंग धारण केला आहे. राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या या उद्यानाच्या फलकावर विद्यमान आमदार संजय देरकर यांचे नाव नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी माजी आमदार बोदकुरवार वणी शहरासह परिसरातील विकास कामात हस्तक्षेप घालून सत्तेचा माज दाखवत अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे जनतेत प्रचंड चर्चेला ऊत येत असून घाणेरड्या राजकारणाची परंपरा उभी होत असल्याची टीका देखील उमटत आहे.
शासनाच्या प्रोटोकॉलनुसार शासनाच्या विकास कामावरील अशा फलकावर विद्यमान आमदार संजय देरकर नाव असणे अपेक्षित असताना, माजी आमदार बोदकुरवार यांचे व भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे नाव समाविष्ट करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. यामागे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकण्यात आल्याचा आरोपही पुढे येत आहे.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना (उबठा) गटाचे आमदार संजय देरकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी नमो उद्यानाचा फलक तयार करून त्यांचे उद्धाटन परस्पर केल्याने भाजपाच्या फलकाचा केवळ देखावा निर्माण झाला आहे. या फलकावर नगराध्यक्ष यांचे नाव व फोटो असल्याने त्या विशिष्ट समाजाच्या महिला नगराध्यक्षांचा अपमान झाल्याचा आरोप विरोधी गटाकडून करण्यात येत असला तरी कोणतीही जातीवाचक घटना घडली नाही. असे असताना केवळ राजकारण करीत जातीय वादाला समोर करून भाजप आपले राजकारण घडवित असल्याचे आरोप जनतेतून केल्या जात आहे.
मात्र, याच दरम्यान मागील ११ एप्रिल रोजी राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले व विद्येची देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावर करण्यात आले होते तेव्हा शिलालेखावर शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या नगराध्यक्षा विद्याताई आत्राम यांचे नाव वगळले तेव्हा नगराध्यक्षा व त्यांच्या व समाजाचा अपमान चक्क भाजपा कडूनच झाला नाही का ? असा शहरात एक महत्त्वाचा सवालही उपस्थित केला जात आहे. केवळ एका विशिष्ट समाजाचे नाव समोर करून राजकारण तापविणाऱ्या भाजपची सर्वत्र चेष्टा उडवल्या जात आहे.

महिलांच्या उन्नतीसाठी आयुष्य वाहिलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरणावेळी शिलालेखावर नगराध्यक्षांचे नाव वगळण्यात आले होते. त्या वेळी हा प्रकार जातीयवाद मानला गेला नाही, मग आता नमो उद्यानाच्या फलकाच्या प्रकरणातच जातीयवादाचा मुद्दा पुढे का आणला जात आहे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
“आपल्या चुका दुर्लक्षित करून इतरांवर आरोप करणे योग्य आहे का?” असा सवालही समाजमाध्यमांवर चर्चेत आहे. या सर्व घडामोडींमुळे वणी शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरूच आहे.
सध्या या वादाकडे नागरिकांसह प्रशासनाचेही लक्ष लागले असून, पुढील कारवाई काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



