Saturday, May 2, 2026
Google search engine
Home Blog Page 17

वणी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)ची नवीन कार्यकारिणी जाहीर, राजू वांढरे तालुकाध्यक्ष, तर प्रदीप खोब्रागडे सचिवपदी नियुक्त

0

News Today 

वणी (प्रतिनिधी) : वणी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)ने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  पार्टीच्या जिल्हाध्यक्षा वर्षाताई निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटन बळकट करण्यासाठी नवीन तालुका कार्यकारिणी जाहीर केली आहे. आज, दिनांक २७ रोजी दुपारी २ वाजता वणी येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.

या बैठकीस विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष दिलीप भोयर अध्यक्षस्थानी होते, तर सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश संघटन सचिव विजय नगराळे प्रमुख उपस्थितीत होते.

बैठकीदरम्यान तालुकाध्यक्षपदी राजू बापुराव वांढरे, तर सचिवपदी प्रदीप खोब्रागडे यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचप्रमाणे, महेंद्र चांदोरे व प्यारेलाल मेश्राम यांची तालुका उपाध्यक्ष म्हणून, संतोष रोगे यांची कोषाध्यक्ष म्हणून व सुरेंद्र झाडे यांची सहसचिव म्हणून निवड करण्यात आली.

या वेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा औपचारिक पक्ष प्रवेश करून त्यांचे स्वागत करण्यात आले. माजी तालुकाध्यक्ष प्रवीण खारकर यांनी स्वखुशीने आपला राजीनामा देत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

बैठकीस शहाराध्यक्ष विनोद ठेंगणे, युवा शाखेचे तालुकाध्यक्ष सूर्यवीर चिकटे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य रामदास पखाले, मंगेश गोरे, अंकुश ठेंगणे, किशोर ठेंगणे, अमोल राऊत, यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नियुक्ती कार्यक्रमानंतर तालुक्यातील विविध स्थानिक समस्या, विकास आराखडे तसेच आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची रणनीती यावर सविस्तर चर्चा झाली. पक्ष संघटन बळकट करण्यासाठी व्यापक सदस्य नोंदणी मोहिमेसह नवे कार्यकर्ते जोडण्याचा संकल्पही या वेळी करण्यात आला.

या बैठकीनंतर वणी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद गट) अधिक उत्साही व सज्ज दिसत असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्ष मजबूत पायाभूत रचनेसोबत मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

मोबाईल सेटिंग्जमध्ये अनधिकृत बदल – नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

0

News Today 

वणी, दि. २५ ऑगस्ट २०२५ :
मोबाईल सेटिंग्जमध्ये कोणत्याही मानवी हस्तक्षेपाविना परवानगीशिवाय बदल होणे हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे नागरिकांच्या डिजिटल सुरक्षिततेवर तसेच वैयक्तिक माहितीच्या गुप्ततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संदर्भात संभाजी ब्रिगेडतर्फे प्रशासनाला निवेदन देत सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २२ ऑगस्ट २०२५ रोजी, शुक्रवार सकाळी ९ ते ११ या वेळेत त्यांच्या मोबाईलमध्ये कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय मोबाईल सेटिंग्ज आपोआप बदलल्या. ही बाब केवळ त्यांच्यापुरती मर्यादित नसून देशभरातील तब्बल ८० ते ९० टक्के मोबाईल वापरकर्त्यांच्या डायल पॅडमध्ये परवानगीशिवाय बदल झाल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले.

या अनधिकृत बदलामुळे मोबाईल वापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहितीची गुप्तता, डिजिटल व्यवहारांची सुरक्षितता तसेच इलेक्ट्रॉनिक साधनांच्या विश्वसनीयतेवर गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी भीती धोबे यांनी व्यक्त केली.

या संदर्भात मा. तहसीलदार, वणी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच जिल्हा माहिती तंत्रज्ञान अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून त्यामध्ये पुढील मागण्या मांडण्यात आल्या आहेत –

  • मोबाईल सेटिंग्जमध्ये झालेल्या अनधिकृत बदलांची सखोल चौकशी करावी.

  • जबाबदार मोबाईल कंपन्या, सर्व्हर अथवा अॅप्लिकेशन्सचा तांत्रिक अहवाल सार्वजनिक करावा.

  • सामान्य नागरिकांच्या मोबाईल व माहिती सुरक्षिततेसाठी ठोस मार्गदर्शक तत्त्वे व उपाययोजना लागू कराव्यात.

  • इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) सहित सर्व शासकीय इलेक्ट्रॉनिक साधनांची स्वतंत्र तपासणी समितीमार्फत सुरक्षा तपासणी करण्यात यावी.

सदर घटनेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून शासनाने तातडीने या प्रकरणी कार्यवाही करून नागरिकांना विश्वास द्यावा, अशी ठाम मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

या प्रसंगी आशिष रिंगोले, दत्ताभाऊ डोहे, वसंतभाऊ थेटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी वणी तालुक्यात राष्ट्रवादीची बुधवारी महत्वाची बैठक

0

News Today वणी (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) वणी तालुक्याची महत्वाची बैठक बुधवार, दि. २७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी बरोबर १२ वाजता शासकीय विश्राम गृह येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शहराध्यक्ष विनोद ठेंगणे यांनी केले आहे.

बैठकीस प्रमुख अतिथी म्हणून मा. रज्जाकभाई पठाण (राज्य संघटन सचिव) तसेच मा. विजयजी नगराळे (राज्य प्रतिनिधी सामाजिक न्याय विभाग) हे मार्गदर्शन करणार आहेत. तर या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर हे राहणार आहेत.

या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसंदर्भात महत्वाची चर्चा होणार असून, तालुक्यातील कार्यकारिणीची रचना देखील निश्चित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वणी तालुक्यातील विविध स्थानिक समस्या – शेतकऱ्यांचे वीज व पाणी प्रश्न, अपुऱ्या सिंचन सुविधा, रस्त्यांची दुरवस्था, बेरोजगारी, अपुरे आरोग्य सुविधा, तसेच शालेय विद्यार्थ्यांना होणाऱ्या अडचणी – या संदर्भातही चर्चा होणार आहे. या समस्यांवर ठोस भूमिका घेऊन, सरकारकडे पाठपुरावा करण्यासोबतच आवश्यकता भासल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्णय या बैठकीत घेतला जाणार आहे.

यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. शहराध्यक्ष विनोद ठेंगणे यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहून बैठकीला यशस्वी करून संघटनेला बळकटी द्यावी, असे आवाहन केले आहे.

वणी येथे 7 सप्टें. रोजी म. रा. किसान सभेच्या वतीने भव्य राज्यव्यापी कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकरी परिषद

0

News Today 

वणी — महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने वणी येथे 7 सप्टें. ला दु.12 वाजता शेतकरी मंदीर येथे राज्यव्यापी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परीषदेला मार्गदर्शक म्हणुन किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष काॅ.राजन क्षिरसागर (परभणी), प्रसिद्ध अर्तज्ञथ डाॅ.श्रिनीवास खांदेवाले(नागपूर),शेतकरी नेते काॅ.तुकाराम भस्मे(अमरावती), राज्याध्यक्ष अॅड.हिरालाल परदेशी (धुळे), राज्यसचिव काॅ.अशोक साेनारकर(अमरावती) आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहे. परिषदेसाठी सर्व शेतकऱ्यांना क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या लढाऊ परंपरेने एकत्र येण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

या परिषदेचे मुख्य मुद्दे–1)स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार किमान हमी भावाचा कायदा करावा.
2)कापूस व सोयाबीन प्रक्रिया उद्योग सुरू करणे आणि शेतकऱ्यांना उत्पादनात हिस्सेदारी देणे.
3)आयात-निर्यात धोरण शेतकरी हिताच्या दृष्टीने ठरवणे.
4)पीक विमा कंपनी सरकारी असावी व नियम स्थानिक नैसर्गिक परिस्थिती पाहूनच ठरवावे.
5)सरकारी खरेदी केंद्रे वेळेत व पूर्ण क्षमतेने सुरू करणे, खुल्या बाजारातील लूट रोखणे.


6)जंगली जनावरांनी केलेल्या नुकसानीची तातडीने भरपाई करण्याचा कायदा करण्यात यावा.
‌ ही परिषद केवळ मागण्यांची यादी नसून शेतकरी हक्कासाठी ठाम संघर्षाची सुरुवात आहे. सर्व प्रगतिशील, लढाऊ, पुरोगामी विचारसरणीचे शेतकरी व कार्यकर्त्यांनी हजेरी लावून शेतकरी चळवळ मजबूत करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य किसान सभा यवतमाळ जिल्हा कौन्सिलतर्फे काॅ.अनिल हेपट,अनिल घाटे,मोरेश्वर कुंटलवार,गणेश कळसकर,बंडु गोलर,वासुदेव गोहणे,रवि गोरे,गणेश शिटलवार,पंढरी मोहीतकर,पांडुरंग ठावरी,राकेश खामणकर,अथर्व निवडींग,सौ.छाया गावंडे,सुरेखा हेपट,प्रा.धनंजय आंबटकर,गुलाबराव उमरतकर,दिपक माहुरे,दिवाकर नागपुरे,संजय भालेराव,प्रा.प्रविण बंसोड,विजय ठाकरे,ऋषी उलमाले,दिलीप महाजन,अॅड.अरुण जवके,अमोल गौरशेट्टीवार,पि.जी.गावंडे,प्रदीप नगराळे, लक्ष्मणराव खंडारे आदींनी केले आहे.

मारेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार उमेश बेसरकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

0

News Today 

वणी :- मारेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार पोलिस निरीक्षक उमेश बेसरकर (वय 55 वर्षे) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण पोलिस दलासह नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

उमेश बेसरकर यांची बदली गेल्या वर्षी पुसद येथून होऊन ते मारेगाव येथे कार्यरत झाले होते. आपल्या शांत, मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांच्या मनात स्थान मिळवू शकले. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ते सदैव सक्त आणि तत्पर होते. आज तारीख २३ रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास त्यांच्या छातीत दाटून आले आणि त्यांना वणी येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता चिकित्सकांनी त्यांना मृत घोषित केले. 

त्यांच्या निधनामुळे मारेगावसह यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी त्यांच्या कुटुंबियांचे दुःखात सहभागी होत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उमेश बेसरकर यांच्या पश्चात पत्नी, मुले असा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नेरड पू. येथे शेतकऱ्यांचा पोळा सण उत्साहात संपन्न

0

वणी :- तालुक्यातील नेरड पू. आज ता. २२ रोजी  शुक्रवार शेतकऱ्यांच्या मित्र असलेल्या बैलांचा सन पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच शेतकरी बांधवांमध्ये बैल सजविण्याची लगबग सुरू होती. बैलांना आंघोळ घालून रंगीत झगमगत्या सजावटीचे कपडे, मखमली झुल, गोंडे, घंटा व कड्या घालून त्यांची आकर्षक सजावट करण्यात आली.

संध्याकाळी गावातून सर्व  बैल जोड्या गावाबाहेरील हनुमान मंदिराच्या प्रांगणात एकत्रित आल्या व नंतर मिरवणूक काढण्यात आली. या वेळी गावकरी  “हर बोला हर हर हर हर महादेव” अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून टाकत होते. पदावली भजनाचा देखील सुंदर कार्यक्रम झाला. महिलांनी पारंपरिक पद्धतीने बैलांची ओवाळणी केली.

संपूर्ण गावात या निमित्ताने आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकऱ्यांचा खरा मित्र असलेल्या बैलांचा सन्मान करत पोळा सण पारंपरिक उत्साहात साजरा झाल्याचे समाधान ग्रामस्थांनी व्यक्त केले. 

वणीत इसमावर चाकू हल्ला, तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

0

News Today 

वणी :- येथील पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या पटवारी कोणलीतील जीवन सातघरे या तरुणाविरुद्ध भांडण करून मारहाण व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 21 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी पटवारी कॉलनीत घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रशांत गिरीधर पुसाम (वय 32, रा. पटवारी कॉलनी वणी यांच्यासोबत वाद घालून आरोपी जीवन भीमराव सातघरे शिवीगाळ करत धमक्या दिल्या. त्यानंतर आरोपीने फिर्यादीवर चाकू हल्ला करून दुखापत केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या घटनेची नोंद फिर्यादीने रात्री उशिरा वणी पोलीस ठाण्यात करून दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

दाखल गुन्हे असे :

कलम 118(1) : शांतता भंग करणे / भांडण, कलम 152(2) : गुन्हेगारी विश्वासघात / धमकी देणेz कलम 351(1) : हल्ला / मारहाण, कलम 352 : स्वेच्छेने दुखापत करणे, कलम 351(2) : गंभीर इजा करण्याचा प्रयत्न

पोलिस निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल मारोती पंडलिक पाटील यांच्याकडे सोपविला असल्याची माहिती आहे.

मोकाट जनावरांच्या समस्येवर मनसेचे ‘ढोरकी आंदोलन’ शहराध्यक्ष अंकुश बोढे यांचा अनोखा गुराखी अवतार; प्रशासनाची नमती भूमिका

0

News Today 

वणी (प्रतिनिधी):
शहरातील मोकाट जनावरे, त्यातून होणारे अपघात आणि नागरिकांच्या वाढत्या हालअपेष्टा या गंभीर समस्येकडे वारंवार निवेदनं देऊनही दुर्लक्ष करणाऱ्या नगर परिषद प्रशासनाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनोखे आंदोलन छेडले. वणी शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी थेट गुराख्याचा पोशाख परिधान करून ‘ढोरकी’ अवतार घेतला आणि कार्यकर्त्यांसह शहरातील मोकाट जनावरे हाकत ढोल-ताशांच्या गजरात नगर परिषदेच्या आवारात नेऊन सोडली. या हटके आंदोलनामुळे प्रशासनात प्रचंड गोंधळ उडाला तर दुसरीकडे शहरभरात याची जोरदार चर्चा रंगली आहे.

पार्श्वभूमी : अपघातांची मालिका व नागरिकांची त्रस्त अवस्था

गेल्या काही महिन्यांपासून वणी शहरात रस्त्यांवर मोकाट जनावरांचा सुळसुळाट झालेला आहे.

मुख्य रस्त्यांवर गायी-वासरं, बैल यांची वर्दळ सुरू असल्याने वाहतूक विस्कळीत होते.

अनेक लहानमोठे अपघात घडून नागरिक जखमी झाले आहेत.

या विषयावर मनसेकडून वारंवार निवेदनं, पत्रव्यवहार करण्यात आला.

मात्र प्रशासनाने समस्या सोडविण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल न उचलल्याने अखेर मनसेने संघर्षाचा मार्ग स्वीकारला.

आंदोलनाचा थरार : गुराखी अवतार, ढोल-ताशांचा गजर आणि घोषणाबाजी

२१ ऑगस्ट रोजी सकाळी शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी पारंपरिक गुराखी पोशाख घातला. त्यांच्या सोबत तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी फौज होती.

रस्त्यावरील मोकाट जनावरे एकत्र करून ढोल-ताशांच्या तालावर ते नगर परिषदेच्या दिशेने निघाले.

अचानक जनावरांचा कळप व मागे घोषणा देणारे कार्यकर्ते पाहून अधिकारी व कर्मचारी अचंबित झाले.

नगर परिषद आवारात पोहोचताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध नोंदवला.

प्रशासनाची प्रतिक्रिया : मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन

या अनपेक्षित आंदोलनामुळे दबावाखाली आलेल्या मुख्याधिकारी सचिन गाडे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.
त्यांनी आश्वासन दिले की –

शहरातील उपलब्ध गोशाळांची व कोंडवाड्यांची क्षमता तपासून,

पुढील पाच दिवसांत मोकाट जनावरे तिथे स्थलांतरित केली जातील.

या लेखी आश्वासनानंतर मनसेने आंदोलन मागे घेतले.

मनसेची चेतावणी : पुढे जनावरे, कुत्रे व डुकरे थेट दालनात!

आंदोलनानंतर शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी इशारा दिला –

“नगर परिषदेने आजवर आमच्या पत्रांना केराची टोपली दाखवली. जर पाच दिवसांत ठोस कारवाई झाली नाही, तर पुढच्यावेळी शहरातील मोकाट जनावरे, कुत्रे आणि डुकरे थेट मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात आणून सोडू.”

उपस्थिती व जनचर्चा

या आंदोलनात तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार, धीरज पिदुरकर, शंकर पिंपळकर, मयुर गेडाम, मयुर घाटोळे, गोविंदराव थेरे, रमेश पेचे, लक्की सोमकुंवर, जुबेर खान, योगेश ताडम, हिरा गोहोकार, अहमद रंगरेज, अक्षय बोकडे, गौरव पुराणकर, सूरज पळसकर, वैभव पुराणकर, कृष्णा नीमसटकर, मनिषा नवघरे, हर्षल दांडेकर, कन्हैया पोद्दार, साहिल येरने, सूरज कोंढे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

निष्कर्ष

मनसेच्या या ‘ढोरकी आंदोलनामुळे’ प्रशासनासोबत संपूर्ण शहराचे लक्ष वेधले गेले आहे. आता प्रत्यक्षात नगर परिषद पुढील पाच दिवसांत काय कारवाई करते याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

वणी-विरकुंड बसफेरी सुरू करण्याची मनसेची मागणी

0

News Today 

वणी / प्रतिनिधी –
वणी ते विरकुंड अशी स्वतंत्र बससेवा सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आगार व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सध्याची बससेवा अपुरी पडत असल्याने विद्यार्थी आणि ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असल्याचा मुद्दा निवेदनात मांडण्यात आला आहे.

सध्या वणी ते बोर्डा अशी बससेवा सुरू आहे. मात्र, ही बस बोर्डा येथून परत येताना विरकुंड गावापर्यंत पोहोचल्यावर पूर्ण भरलेली असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना बसमध्ये चढता येत नाही. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असून, गावकऱ्यांनाही प्रवासासाठी अडचणी येत आहेत.

या समस्येवर तोडगा म्हणून, वणी ते विरकुंड अशी नवीन बस फेरी सुरू करण्याची मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी केली आहे. यामुळे प्रवाशांचा त्रास कमी होऊन त्यांना सुरक्षित आणि वेळेवर प्रवास करता येईल, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी निवेदन देताना विलन बोदाडकर, सूरज काकडे, प्रवीण कळसकर, धीरज बगवा, विनोद वैद्य,हिरा गोहोकार यांच्या सह सरपंचा वर्षा मडावी, अमोल पारखी, रवी पारखी, राकेश परचाके, शंतनु बावणे सोहेल शेख यांच्यासह शालेय विद्यार्थी, महिला आदी उपस्थित होते. आगार व्यवस्थापकांनी या मागणीचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी अपेक्षा मनसेने व्यक्त केली आहे.

ग्रामगीताचार्य नारायणराव मांडवकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग

0

News Today 

वणी : स्वातंत्र्य दिनानिमित्त तसेच ग्रामगीताचार्य नारायणराव मांडवकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील खंडोबा-वाघोबा देवस्थान सभागृह येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

स्पर्धेत शालेय गट (वर्ग ६ ते १०) यांना “लोकमाता अहिल्याराणी होळकर यांचे लोककल्याणकारी कार्य” हा विषय देण्यात आला होता, तर खुल्या गटासाठी “OBC (VJ, NT, SBC) च्या उज्ज्वल भवितव्यासाठी जातनिहाय जनगणना आजची गरज” हा विषय ठेवण्यात आला होता. या दोन्ही गटांत मिळून एकूण ४६ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे उद्घाटन समाजसेविका सौ. निलिमाताई काळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्रा. बाळासाहेब राजूरकर होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये संजय खाडे (संचालक, कापूस उत्पादक पणन महासंघ, मुंबई), प्रदीप बोनगीरवार (अध्यक्ष, सुशगंगा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, वणी), आशिष खुलसंगे (अध्यक्ष, वसंत जिनिंग, वणी), रमेश बुच्चे (सेवानिवृत्त प्राचार्य), धनराज भोंगळे (माजी नगरसेवक) आणि भैयाजी पिंपळकर यांचा समावेश होता.

संजय खाडे यांनी आपल्या भाषणात तरुणांना प्रेरित करताना सांगितले की, “वक्तृत्व ही केवळ कला नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. तरुणांनी आपल्या विचारांना निर्भयपणे मांडले पाहिजे.”

स्पर्धेतील परीक्षक म्हणून नामदेवराव जेनेकर, प्रा. विजय बोबडे आणि लक्ष्मण इद्दे यांनी काम पाहिले. स्पर्धकांच्या परखड व सखोल विचारांनी परीक्षक व उपस्थित श्रोते भारावून गेले.

विजेत्यांमध्ये शालेय गटातून तरफीया शेख हिने प्रथम क्रमांक पटकावला. मनस्वी घोनमोडे व पूर्वी देशमुख यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. खुल्या गटातून प्रेम जरपोतवार प्रथम, जगदीश भगत द्वितीय तर हर्षल साळवे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. विजेत्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्रे आणि सन्मानचिन्हे प्रदान करून गौरविण्यात आले.

कार्यक्रमात ओबीसी समाजरत्न पुरस्कार प्रा. दिलीप मालेकार यांना तर ओबीसी समाजभूषण पुरस्कार नामदेवराव जेनेकर आणि किशोर ओचावर यांना प्रदान करण्यात आले.

मनोगतात बोलताना ग्रामगीताचार्य नारायणराव मांडवकर यांनी वक्तृत्व स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “वक्तृत्व ही केवळ बोलण्याची कला नसून, समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे आणि स्वतःला प्रभावीपणे व्यक्त करण्याचे साधन आहे. स्पर्धा, कार्यशाळा आणि नियमित सरावाने हे कौशल्य आत्मसात करता येते.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रघुनाथ कांडरकर यांनी केले. संचालन योगिता विरुटकर व विलास शेरकी यांनी तर स्वागतगीत अशोक चौधरी यांनी सादर केले.

आयोजन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय, महाराजा यशवंतराव होळकर सार्वजनिक वाचनालय, श्री गुरुदेव सेवा मंडळ, सावर्ला तसेच OBC (VJ/NT/SBC) जातनिहाय जनगणना समिती, वणी-झरी-मारेगाव यांनी संयुक्तपणे केले होते. आयोजकांनी पुढील वर्षीही ही स्पर्धा घेण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेंद्र बुच्चे यांनी आभार मानले.