Saturday, May 2, 2026
Google search engine
Home Blog Page 18

अगोदर वोट चोरी आणि आता मर्जीतील जिल्हा परिषदेच्या वॉर्ड फॉर्मिंग आखण्यासाठी दबाव : सत्ताधारी मंत्र्यांच्या कॉलची महसूल विभागात जोरदार चर्चा,

0

News Today  दिलीप भोयर 

नागपूर :- संपूर्ण देशभरात ‘वोट चोरी’च्या आरोपांनी राजकीय वातावरण तापलेले असताना, मर्जीतील जिल्हा परिषदेच्या वॉर्ड फॉर्मिंग तयार करण्यासाठी राजकीय  हस्तक्षेपाच्या चर्चेने या मुद्द्याला आणखी धार दिली आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता हरवते आहे का, असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सुप्रीम कोर्टाचा आदेश आणि निवडणुकीला वेग
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला गती मिळाली असून, त्यानुसार जिल्हा परिषदेची सर्कल घोषणा लवकरच होणार आहे. यासोबतच मतदार याद्या तयार करण्याचे कामही सुरू झाले आहे. मात्र, याच प्रक्रियेत सत्ताधारी पक्ष आपल्या ताब्यात स्थानिक स्वराज्य संस्था याव्यात यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्कलमध्ये आपापल्या मर्जीची गावे टाकून घोषणा होण्यासाठी निवडणूक विभागावर दबाव टाकत असल्याची सूत्रांची माहिती समोर आली आहे.

भाजपाई दबावाची चर्चा
सूत्रांच्या माहितीनुसार, सत्तेत असलेल्या भाजप नेत्यांकडून जिल्हा परिषदेच्या वॉर्ड व सर्कल रचनेत आपले राजकीय गणित साधण्यासाठी हस्तक्षेप केला जात आहे. सीमा आखणी, सर्कल व गावे समाविष्ट करण्याच्या हालचालींमध्ये काही प्रभावशाली नेत्यांचा हात असल्याचे बोलले जात आहे.

 तहसीलदाराचा विरोध आणि चौकशी
या प्रक्रियेत प्रशासनातील काही अधिकारी निष्पक्षतेसाठी ठाम उभे राहत असल्याची माहिती आहे. नागपूर येथील एका मंत्र्याने राज्यातील एका तहसीलदाराला कॉल करून हस्तक्षेप केला असता या सदर तहसीलदाराने हस्तक्षेपाला विरोध दर्शवला असता, त्यांच्यावर चौकशी लावण्यात आल्याचे समजते. यामुळे सरकारी यंत्रणेत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सत्ताधाऱ्यांच्या दबावाला विरोध केल्यास कारवाई होण्याची शक्यता वाढल्याचे दिसते.

देशव्यापी संदर्भाशी जोडलेली घटना
गेल्या काही महिन्यांत देशभरात निवडणूक प्रक्रियेतील गैरव्यवहार, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवरील शंका आणि मतदार यादीतील फेरफार यामुळे “वोट चोरी” हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशा पार्श्वभूमीवर मर्जीतील जिल्हा परिषदेच्या सर्कल व वॉर्ड फॉर्मिंगमध्ये होणारा हस्तक्षेप आणि विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यांवर घेतली जाणारी कारवाई हा केवळ स्थानिक प्रश्न न राहता राष्ट्रीय चिंता बनला आहे.

विरोधकांचा आक्रमक सूर
विरोधकांनी प्रशासनावर हल्लाबोल करताना म्हटले की, “लोकशाही ही सत्ताधाऱ्यांच्या इच्छेनुसार वाकवली जाऊ नये. वॉर्ड व सर्कल फॉर्मिंगसारख्या मूलभूत प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप म्हणजे मतदारांचा विश्वासघात आहे. आता तर निष्पक्ष अधिकारीही दाबले जात आहेत.” त्यांनी या प्रकरणावर न्यायालयीन हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

 लोकशाहीची कसोटी
निवडणूक आयोग आणि प्रशासनाची निष्पक्षता हाच लोकशाहीचा कणा आहे. मात्र, अशा प्रकारच्या हालचालींमुळे शासनयंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या प्रभावाखाली काम करतेय का, याबाबत गंभीर शंका उपस्थित होत आहे. परिणामी, लोकशाहीवरील विश्वास डळमळीत होण्याचा धोका अधिकच वाढला आहे.

 

पितळी कलाकृती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा आर. एस. गवई बहुद्देशीय संस्थेचा उपक्रम

0

News Today

यवतमाळ : स्मृतीशेष आर. एस. गवई बहुद्देशीय संस्थेमार्फत सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवले जात असून, यामध्ये शिक्षण, क्रीडा, तसेच धार्मिक-सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यास विशेष प्राधान्य दिले जात आहे.

संस्थेमार्फत बालआश्रम व शाळा दत्तक घेणे, विद्यार्थ्यांसाठी क्रीडा-साहित्य उपलब्ध करून देणे यासह लहानशा गावात बुद्धविहार उभारणी व धार्मिक स्थळांच्या संवर्धनाचे काम करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून संस्थेने विविध पितळी मूर्ती व कलाकृती सर्वसामान्यांपर्यंत उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

यामध्ये – छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, हंस मूर्ती, हत्तींची जोडी, तथागत गौतम बुद्धांच्या मूर्ती, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पितळी स्मारक अशा विविध आकर्षक व कलात्मक वस्तूंचा समावेश आहे.

या कलाकृतींच्या माध्यमातून पिढ्यान्पिढ्यांच्या परंपरेत असलेली पितळी कलाविश्वाची परंपरा जपून ठेवणे, तसेच सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात या कलाकृती उपलब्ध करून देणे हा संस्थेचा उद्देश असल्याचे संस्थेच्या संचालिका काजल ताई गवई यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी व खरेदीसाठी 📞 9307926564 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

*‘तहसीलदार खुर्चीवर बसून गातो म्हणून निलंबन, Dysp बेकायदेशीर लाथ घालतो त्याचे समर्थन !, जातीयवादी सरकारवर महाराष्ट्रात सवालांचा भडका’

0

News Today

लातूर :
रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात यांनी केवळ खुर्चीवर बसून गाणे म्हटले, म्हणून शासनाने त्यांना वीजेच्या वेगाने निलंबित केले. किरकोळ कारणावर घेतलेला हा निर्णय संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला हादरवून टाकणारा ठरला आहे.

पण दुसरीकडे, जालना जिल्ह्यातील उपविभागीय पोलिस अधिकारी (SDPO) अनंत कुलकर्णी यांनी उपोषणकर्त्याच्या कमरेत, तेही त्याच्या पाल्यासमोर, फिल्मी स्टाईलने लाथ घालून थेट पोलिस अधिनियमाची पायमल्ली केली. हा प्रकार संपूर्ण जनतेच्या डोळ्यांसमोर घडला तरी, सरकारने त्या अधिकाऱ्यावर आजवर कोणतीही कारवाई केली नाही.

या दोन घटनांमुळे सरकारवर तीव्र टीका होत असून, प्रशासनाच्या कारवाईत दुटप्पीपणा व पक्षपात ठळकपणे दिसत असल्याचा आरोप जनतेतून होत आहे.

जनतेत संतापाची लाट

‘एका गाण्यावर निलंबन आणि एका लाथेखाली मौन, हा कसला न्याय?’ असा सवाल सर्वसामान्य नागरिक करत आहेत. तहसीलदारावर तात्काळ निलंबनाची तलवार चालते, पण एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने लोकशाहीच्या मुलभूत अधिकारांचा भंग करूनही सरकार त्याच्यावर गप्प बसते, यामुळे जातीयवादी कारभाराचा वास येतो, असे मत व्यक्त केले जात आहे.

सरकारच्या भूमिकेवर संशय

या घटनांवरून शासनाची भूमिका न्याय्य की अन्याय्य, हा प्रश्न समाजमनाला सतावतो आहे. कारवाई करताना जातीय भेदभाव केला जातो का, याविषयीही चर्चा रंगत असून, सरकारच्या निष्क्रियतेविरोधात लोकांमध्ये रोष वाढला आहे.

जनतेची मागणी

तहसीलदारावर झपाट्याने कारवाई करणारे सरकार, पोलिस अधिकाऱ्याच्या बेकायदेशीर कृत्यावर मात्र का गप्प आहे? दोन्ही प्रकरणात समान न्याय व्हावा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे.

टोकाचा सवाल

तहसीलदार खुर्चीवर बसून गातो म्हणून निलंबन!
पण पोलिस उपोषणकर्त्याला, तेही त्याच्या लहानग्या मुलासमोर, फिल्मी स्टाईलने लाथ घालतो तरी कारवाई नाही!

हे कसले राज्यकारभार? हा कसला न्याय?

एका किरकोळ कारणावर एका अधिकाऱ्याचे करिअर उध्वस्त करायचे आणि दुसरा अधिकारी थेट लोकशाहीची पायमल्ली करूनही त्याच्यावर साधी चौकशीसुद्धा बसवायची नाही? हे नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत का फक्त निवडकांसाठीच?

यातून स्पष्ट संदेश जातो की, सरकार कारवाई करताना न्याय, कायदा आणि शिस्त या गोष्टींकडे न पाहता फक्त जात-पात आणि राजकीय सोय पाहते. एकाच घटनाक्रमात दोन वेगवेगळे मापदंड वापरणे म्हणजे जनतेचा विश्वासघातच होय.

यवतमाळमध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद – शैलेश भाऊ करिहार यांचा उपक्रम ठरला आदर्श

0

News Today 

यवतमाळ (प्रतिनिधी) :
स्वातंत्र्य दिनाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त यवतमाळ शहरात सामाजिक कार्यकर्ता शैलेश भाऊ करिहार यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला युवक-युवतींसह महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक वर्षांपासून १५ ऑगस्ट या दिवशी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्याची परंपरा शैलेश भाऊ करिहार यांनी जपली असून, यावर्षी देखील हा उपक्रम सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारा ठरला.

रक्तदान शिबिरामध्ये शहरातील अनेक युवक-युवतींसह महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. विशेष म्हणजे महिला वर्गानेही मोठ्या संख्येने रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी बजावली.

कार्यक्रमास नंददीप फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप भाऊ शिंदे, निस्वार्थ सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत लांबट, महिला जिल्हा अध्यक्ष चेतनाताई राऊत, यवतमाळ येथील नामांकित स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अंजली गवारले, तसेच अनेक ज्येष्ठ समाजसेवक, समाजसेविका व रुग्णसेवकांची उपस्थिती होती.

या शिबिरात मोठ्या प्रमाणावर रक्तसाठा उपलब्ध झाल्याने अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत होणार आहे. शैलेश भाऊ करिहार यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “स्वातंत्र्य दिन हा फक्त ध्वजारोहण करून साजरा करण्याचा दिवस नाही, तर समाजासाठी काहीतरी करण्याची संधी आहे. रक्तदान केल्याने एखाद्याला नवजीवन मिळतं, त्याहून मोठं राष्ट्रसेवा दुसरी नाही.”

या उपक्रमामुळे युवकांमध्ये समाजकारणाची नवी जाणीव निर्माण झाली असून, दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील या रक्तदान शिबिराने यवतमाळमध्ये आदर्श निर्माण केला आहे.

एका DSP च्या गैरवर्तनाने महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा मल्लिन केली, जालन्यात आंदोलकास लाथ मारणे भोवणार ; जन सुरक्षा कायद्याच्या पार्श्वभूमीवर संताप

0

News Today

दिलीप भोयर

जालना:- स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी जालन्यात घडलेल्या एका घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषण स्थळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांना भेटण्यासाठी गेलेल्या कुटुंबातील आंदोलकाला पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी फिल्मी शैलीत लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिक व विरोधी पक्षांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेने महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा खालावली असून, एका DSP ने पोलिसांची प्रतिमा मातीत मिळवली आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

घटनेचा तपशील

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक दिवसांपासून उपोषण सुरू असलेल्या कुटुंबाने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आलेल्या पालकमंत्र्यांना आपली व्यथा सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र या वेळी उपस्थित पोलीस दलाने त्यांना रोखले. गोंधळाच्या पार्श्वभूमीवर DySP कुलकर्णी यांनी आंदोलकाच्या कमरेवर लाथ घातली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरताच प्रशासनावरील विश्वासाला तडा गेल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

कायदेशीर गुंतागुंत

कायदेतज्ज्ञांच्या मते, हे कृत्य भारतीय दंड संहितेच्या कलम 323 (स्वेच्छेने इजा करणे) व कलम 352 (मारहाण) यांत मोडते. लोकशाही मार्गाने आंदोलन करणे हा घटनात्मक अधिकार असताना, पोलिसांनी हिंसक वर्तन करणे म्हणजे मानवी हक्कांचे उल्लंघन असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जिल्हा प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

जन सुरक्षा कायदा आणि वाद

अशा पार्श्वभूमीवर अलीकडेच राज्य सरकारने आणलेला जन सुरक्षा कायदा २०२४ पुन्हा चर्चेत आला आहे. या कायद्यात सरकारला कोणतीही संघटना बेकायदेशीर घोषित करण्याचा अधिकार आहे. या कायद्यातील गुन्हे संज्ञेय व अजामिनपात्र ठेवलेले आहेत. मात्र, DySP सारख्या पोलीस अधिकाऱ्यांना या कायद्यात कोणतेही विशेष संरक्षण किंवा सूट (immunity) देण्यात आलेली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी गैरवर्तन केल्यास त्यांच्यावर परंपरागत कायदेच लागू होतात.

राजकीय प्रतिक्रिया

काँग्रेसने या कायद्याला “आधुनिक रौलट कायदा” संबोधले असून सरकार जनतेच्या हक्कांवर गदा आणत असल्याचा आरोप केला आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत या कायद्याला “असंवैधानिक” म्हटले. सामाजिक कार्यकर्त्यांनी जालना प्रकरणाचा दाखला देत प्रश्न उपस्थित केला की, “जन सुरक्षा कायदा नागरिकांसाठी आहे की सरकार व पोलीस यंत्रणेसाठी?”

पुढील कारवाईकडे लक्ष

जालना येथील ही घटना पोलिसांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. राज्य सरकार आता DySP अनंत कुलकर्णी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दरम्यान, जन सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीत नागरिकांच्या हक्कांवर कुठलाही आघात होणार नाही, याची हमी सरकार देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नेरड (पू.) ग्रामसभा तापलेल्या वातावरणात; गावकऱ्यांचा पदाधिकाऱ्यांना जाब

0

News Today

नेरड (पू.) येथे शनिवारी पार पडलेली ग्रामसभा तब्बल पाच तास चालली आणि वातावरण तापलेलेच राहिले. सरपंच कार्तिकाताई कुचनकर अध्यक्षस्थानी होत्या तर उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक उपस्थित होते.

गावकऱ्यांनी घरकुल यादी, वॉटर फिल्टर प्रकल्प, गावातील रस्ते, सामान्य फंड, १५वा वित्त आयोग निधी तसेच विविध जमा-खर्चाचा हिशोब या मुद्द्यांवर सरळसरळ प्रश्न विचारून पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना जाब विचारला.

भाऊराव चीने, विठ्ठल ठावरी, गणपत आमने, मनोज ठावरी, प्यारेलाल मेश्राम, दिलीप भोयर, देवराव ताजने, बबन ठावरी, दिनेश कुचणकर, संजय लेडांगे , बंडू झाडे, अतुल पिदुरकर, संतोष झाडे, मारोती झाडे, यांसारख्या अनेक नागरिकांनी खर्चातील तफावतीं केलेल्या कामासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली.

काही आर्थिक तफावती निदर्शनास आल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी खर्चाचा तपशील सादर करून खुलासा दिला, ज्यामुळे नागरिकांचा काही अंशी संताप निवळला.

विशेष म्हणजे, गेल्या पाच वर्षांत प्रथमच ग्रामसभा पूर्ण कोरमसह पार पडली. यावेळी गावातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवला, ज्यामुळे ग्रामसभेला ऐतिहासिक स्वरूप लाभले.

ईव्हीएम व बोगस मतदार : लोकशाहीवरील दुहेरी घाव

0

News Today         

दिलीप भोयर 

भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी ताकद म्हणजे जनतेचा मताधिकार. परंतु जर हा मताधिकार चोरीला जात असेल, मग तो बोगस मतदार याद्या असोत किंवा ईव्हीएम मशिनद्वारे मतदान फेरफार असो – हा थेट लोकशाहीवरचा हल्ला आहे.

अलीकडे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी बोगस मतदार यादी हा मुद्दा जोरदारपणे पुढे आणला आहे. त्यांनी दाखवून दिलं की, मतदार याद्यांमध्ये हजारो-लाखो बोगस नावे समाविष्ट केली गेली आहेत. यामुळे काही लोकांकडून, ज्यांचा मतदार म्हणून अस्तित्वच नाही, तेथून मतदान दाखवून निकालाचा प्रवाह बदलणे शक्य होते. हा प्रकार निश्चितच गंभीर आहे.

परंतु खरी आणि खोलवर घातक असलेली समस्या म्हणजे ईव्हीएम मशिनद्वारे होणारी मतचोरी.
ईव्हीएम हे इलेक्ट्रॉनिक यंत्र असल्याने त्याच्या सॉफ्टवेअरमध्ये जर कुणी संगणकीय प्रोग्रामद्वारे फेरफार केली, तर मत मोजणीची दिशा पूर्णपणे बदलता येते. यातील धोक्याचे मूळ कारण म्हणजे –

  • ईव्हीएममधील सॉफ्टवेअर पूर्णपणे जनतेच्या नजरेआड असते.

  • एकदा प्रोग्राम सेट केला की, मतदानाच्या दिवशी बटन कोणतेही दाबले तरी मते ठरावीक पक्षालाच जाऊ शकतात.

  • या फेरफारचे कुठलाही ठोस पुरावा लोकांसमोर उघड करणे जवळजवळ अशक्य असते.

निवडणूक आयोगाची जबाबदारी आणि धोका

मतदान प्रक्रिया ही पूर्णतः निःपक्ष आणि पारदर्शक पद्धतीने राबविणे ही निवडणूक आयोगाची घटनात्मक जबाबदारी आहे. पण जर निवडणूक आयोग स्वतः सरकारचे हस्तक बनला, तर हा धोका दुपटीने वाढतो. कारण आयोगाच्या वरच्या पातळीवरच जर प्रामाणिकपणाचा अभाव असेल, तर निवडणूक प्रक्रियेत घडणाऱ्या कोणत्याही गैरप्रकारावर कारवाई होण्याची शक्यता नगण्य राहते.
सरकारच्या दबावाखालील किंवा सरकारच्या फायद्यासाठी काम करणारा आयोग म्हणजे लोकशाहीच्या किल्ल्याचा दरवाजा आतूनच उघडून देणे होय.

अशा वेळी, बोगस मतदार याद्यांविरोधात आंदोलन जितके गरजेचे आहे, तितकेच ईव्हीएमच्या विरोधातही लढा उभारणे अत्यावश्यक आहे.
हे फक्त पक्षीय राजकारण नाही – तर भारताच्या भविष्यासाठीचा लढा आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, पडताळणीसाठी खुली आणि हॅक-प्रूफ होईपर्यंत, प्रत्येक नागरिकाने आवाज उठवणे हीच खरी देशभक्ती ठरेल.

लोकशाही वाचवायची असेल, तर मतदानातील प्रत्येक मताची खरी किंमत राखणे, ईव्हीएमची पूर्ण पारदर्शकता सुनिश्चित करणे आणि निवडणूक आयोगाची स्वायत्तता व प्रामाणिकता टिकवणे – हा पुढचा मोठा जनआंदोलनाचा मार्ग ठरला पाहिजे.

 संपादकीय विश्लेषण

वणीत कोल वाशरीज कामगारांचे आमरण उपोषण सहाव्या दिवशी सुरू – प्रकृती बिघडली, पुढील १२ तासांत निर्णयाची मागणी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठिंबा 

0

News Today
वणी प्रतिनिधी – कार्तिकेय कोल वाशरीज प्रा. लि., कळमना (खुर्द) येथील कामगारांचे आमरण उपोषण आज सहाव्या दिवशी धगधगत असून, उपोषणकर्त्यांची प्रकृती गंभीर होत चालली आहे. मागण्या मान्य न झाल्यास परिस्थिती चिघळण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

कामगारांची ठाम भूमिका –

रोटेशन पद्धतीने १८ दिवसांचे वेतन व काम हमखास द्यावे.

थकीत रक्कम तात्काळ अदा करावी व प्रत्येक कामगाराला ‘वन टाइम सेटलमेंट’ म्हणून १० लाख रुपये द्यावेत.

कंपनी बंद पडल्यास पुन्हा सुरू होताना जुनेच कामगार प्राधान्याने नेमावेत, याची लेखी हमी द्यावी.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरदचंद्र पवार) आंदोलनाला पाठिंबा दर्शविला असून, पक्षाचे प्रदेश सचिव रज्जाक पठाण , विजय नगराळे आणि वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर, तालुकाध्यक्ष प्रवीण खारकर, शहराध्यक्ष विनोद ठेंगणे , यांनी उपोषणस्थळी भेट देऊन कामगारांचे म्हणणे ऐकले व एकजूट व्यक्त केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण खानझोडे, ग्राम पंचायत सदस्य राहुल क्षिरसागर उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी उपोषणस्थळी तिरंगा फडकवला जाणार आहे. मात्र, उपोषणकर्त्यांची प्रकृती सतत खालावत असल्याने पुढील १२ तासांत शासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी ठाम मागणी कामगारांनी केली आहे. अन्यथा संघर्ष उग्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

वणीतील हॉटेल उद्योजक तथा कट्टर शिवसैनिक मोन्टू वाधवानी यांचे दुःखद निधन

0

News Today

वणी – वणीतील सुप्रसिद्ध हॉटेल उद्योजक आणि समाजप्रिय व्यक्तिमत्त्व दिलीप उर्फ मोन्टू वाधवानी (वय 56) यांचे दीर्घ आजाराने शनिवार, 9 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता हैदराबाद येथे उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. मागील चार महिन्यांपासून त्यांच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र प्रकृती खालावत गेल्याने अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मोन्टू वाधवानी हे सिंधी कॉलनीतील “मोन्टू का धाबा” या लोकप्रिय रेस्टॉरन्टचे संचालक होते. त्यांच्या रुचकर जेवणासाठी तसेच आपुलकीच्या वागणुकीसाठी ते परिसरात विशेष प्रसिद्ध होते. व्यावसायिक क्षेत्रासोबतच ते सामाजिक व राजकीय क्षेत्रातही सक्रीय होते. एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांनी शिवसेनेच्या विविध उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला.

आपुलकीचा स्वभाव, मोकळेपणाने संवाद साधण्याची हातोटी आणि गरजूंना मदतीचा हात देण्याची वृत्ती यामुळे वणीच्या नागरिकांच्या मनात त्यांनी विशेष स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनाने वणी शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पार्थिवावर आज (10 ऑगस्ट) दुपारी वणी येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्ययात्रा दुपारी 2 वाजता शेतकरी मंदिरासमोर असलेल्या राहत्या घरातून निघणार आहे. त्यांच्या निधनाने वणी शहराने एक उदार मनाचा, समाजप्रिय आणि हसतमुख व्यक्ती गमावली असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

वणी तुडेच्या सर्व वाचकांकडून तसेच स्थानिक नागरिकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

बोरगाव (मे) येथे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर

0

News Today 

वणी :- तालुक्यातील मौजा बोरगाव (मे), येथे दिनांक ०४ ऑगस्ट २०२५ रोजी सोमवार दिनी महसूल विभाग, वणी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरास एन. व्ही. बांगडे, मंडळ अधिकारी, शिरपूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या शिबिरात शेतकरी बांधवांना ७/१२, ८-अ उतारे, तसेच शालेय विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले वितरित करण्यात आले.

कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे तालुका कृषी अधिकारी वणी, दिलीप राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली व माहितीपत्रके वाटप करण्यात आले.

एम. आर. पत्रे, सहायक कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना MREGS फळबाग लागवड योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, बांबू लागवड योजना, तुती लागवड योजना, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना अंतर्गत शेततळे, यांत्रिकीकरण, PMFME योजना यांची सविस्तर माहिती दिली व शेतकऱ्यांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, तसेच गावातील १००% शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आय.डी. तयार करून खरीप हंगामातील पिकांसाठी पिकविमा घेण्याचे आवाहन केले.

डी. आर. बरडे, सहायक कृषी अधिकारी यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे व शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच खरीप हंगामातील कापूस, तूर व सोयाबीन पिकांवरील कीड/रोग ओळख व एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन याबाबत सविस्तर माहिती दिली.

एस. एम. घुगे, सहायक कृषी अधिकारी यांनी तुती लागवड योजना, बांबू लागवड योजना व गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना यावर मार्गदर्शन केले.

सरपंच प्रियांका प्रमोद कोल्हे यांच्या हस्ते दररोज फवारणी करणाऱ्या शेतमजुरांना फवारणीसाठी सुरक्षा किटचे वितरण करण्यात आले. यावेळी एम. आर. पत्रे यांनी किटकनाशके खरेदी व वापरताना घ्यावयाची खबरदारी, विषबाधा झाल्यास प्रथमोपचार व फवारणीदरम्यान घ्यावयाच्या उपाययोजना यावर प्रात्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन केले.

या शिबिरात सरपंच प्रियांका प्रमोद कोल्हे, उपसरपंच पदमाकर देरकर, पोलीस पाटील प्रदीप बलकी, राशन दुकानदार सुधाकर तुराणकर, महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, कृषी अधिकारी, जि.प. प्राथमिक शाळेचे शिक्षकवृंद, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, तसेच गावातील शेतकरी बांधव व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन कतरे, ग्राम महसूल अधिकारी, बोरगाव (मे) यांनी केले व त्यांनी उपस्थित सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधवांचे मनःपूर्वक आभार मानले.