News Today
वणी :- महसूल विभागाचा कणा मानल्या जाणाऱ्या महसूल सेवकांना चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, अन्यथा येत्या 12 सप्टेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा ठाम इशारा महसूल सेवकांनी तहसीलदार वणी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

राज्यातील महसूल विभागावर शासनाच्या असंख्य योजना आणि उपाययोजना अंतिम घटकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी असते. जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते गावपातळीवरील महसूल सेवकापर्यंत ही यंत्रणा कार्यरत आहे. शेतकरी, शेतमजूर, तसेच सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी महसूल सेवक दिवस-रात्र कार्यरत असतात. तरीदेखील शासनाने त्यांना अद्याप चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा दिलेला नाही, यामुळे अन्याय होत असल्याचे महसूल सेवकांचे म्हणणे आहे.
महसूल सेवकांचे कामाचे स्वरूप व्यापक असून त्यात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, रात्रीच्या पाळ्या, गावातील स्वच्छता, शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवणे, ई-पिक पाहणी, पीक नुकसान पंचनामे, पोलिस ठाण्यात शासकीय पंच म्हणून जबाबदारी, महसूल वसुली, फेरफार नोटीस बजावणे, दवंडी देणे, राष्ट्रीय सणांचे कार्यक्रम, तसेच शिपाई संवर्गातील रिक्त पदांची कामे यांचा समावेश होतो. म्हणजेच, महसूल सेवकांना शिपाईपासून ते अधिकार्यांपर्यंत अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.

“24 तास शासकीय सेवेत कार्यरत राहूनही आम्हाला शासनाकडून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि त्यासोबतच्या सेवा सुविधा मिळालेल्या नाहीत. शासनाने आमच्या मागणीला तातडीने मान्यता द्यावी, अन्यथा आम्ही 12 सप्टेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन करणार,” असा इशारा महसूल सेवकांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद केला आहे.
निवेदन प्रसंगी तालुका अध्यक्ष प्रफुल लोडे, उपाध्यक्ष संजय कुचनकर, सचिव राकेश संकिलावर, तसेच पवन पचारे, विकास चिडे, अंगुल फुसाटे, महादेव गाते, पूजा मेश्राम आदी महसूल सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



