Thursday, July 30, 2026
Google search engine
Home Blog Page 25

वणीत आरंभ इंटरनॅशनल प्री-स्कूल चा भव्य आरंभ”

News Today 

वणी :- शहरातील शिक्षण क्षेत्रात एक नवे आणि आधुनिक पाऊल उचलत आकार फाउंडेशन, वणी यांच्या पुढाकाराने उमेद पार्क, गणेशपूर येथे “आरंभ इंटरनॅशनल प्री-स्कूल” चे भव्य उद्घाटन लवकरच होणार आहे. ही शाळा प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनिअर केजी आणि सिनिअर केजी अशा सर्व प्राथमिक स्तरांवर शिक्षण पुरवणार आहे.

बालकांसाठी सुसज्ज आणि बालसुलभ वातावरण असलेल्या या शाळेमध्ये शिकत-शिकवत मजा करणे हा मुख्य उद्देश आहे. शिक्षणासोबतच खेळ, कला आणि भाषिक विकासावर भर देणारी ही शाळा वणीतील एकमेव बालस्नेही प्री-स्कूल ठरणार आहे.

शाळेच्या काही खास वैशिष्ट्ये:

  • सुरक्षित व आनंददायी परिसर

  • वयानुसार रचलेला नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम

  • भाषिक कौशल्ये विकसित करण्यावर भर

  • मातृभाषेला प्राधान्य देणारी शिक्षणपद्धती

  • अनुभवी, सर्जनशील आणि मुलांना समजून घेणारे शिक्षक

  • क्रियाशील आणि अनुभवाधिष्ठित शिक्षणपद्धती

  • संकल्पना स्पष्ट करणाऱ्या शिक्षण प्रणालीचा अवलंब

  • शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासावर लक्ष केंद्रित

या शाळेची आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे लहान वयातच महापुरुषांचा आदर्श निर्माण करणे व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यावर भर देणे.

शाळेचा नोंदणी क्रमांक 271414039001 असून, व्यवस्थापन मंडळामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असल्यामुळे वणी परिसरात या शाळेबद्दल विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्रवेशासाठी संपर्क:
📞 9960285027
📞 7972061442
📞 9595249003

आकार फाउंडेशन, वणी यांच्यावतीने सर्व पालकांना या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शासकीय आयटीआय यवतमाळच्या विद्यार्थ्यांना ऑन-जॉब ट्रेनिंगची संधी


  तुमसरे इलेक्ट्रिकल व संकल्प फाउंडेशनचा उपक्रम

News Today 

यवतमाळ – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) यवतमाळ येथील विजतंत्री (इलेक्ट्रिशियन) शाखेतील प्रथम वर्षातील ३५ विद्यार्थ्यांना ऑन-जॉब ट्रेनिंग अंतर्गत प्रत्यक्ष कार्यानुभव मिळणार आहे. “तुमसरे इलेक्ट्रिकल, वडगाव रोड” यांनी या विद्यार्थ्यांसाठी १५० तासांचे प्रशिक्षण उपलब्ध करून दिले आहे. हे प्रशिक्षण दिनांक ०२ जून २०२५ पासून २४ जून २०२५ पर्यंत चालणार आहे.

विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचा विकास व्हावा, यासाठी सामाजिक क्षेत्रात कार्यरत संकल्प फाउंडेशनचे शहर प्रसिद्धी प्रमुख श्री. सागर महादेवराव तुमसरे यांनी पुढाकार घेतला असून, प्रशिक्षण व्यवस्थित पार पडावे यासाठी ते विशेष प्रयत्नशील आहेत.

या उपक्रमाचे नेतृत्व आय.टी.आय.चे प्राचार्य  व्ही. जे. नागोरे व शिल्पनिदेशक जी. पी. ठोबंरे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकृत प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येणार आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सागर महादेवराव तुमसरे यांनी सांगितले की, “तुमसरे इलेक्ट्रिकलच्या पुढाकारामुळेच हे प्रशिक्षण शक्य झाले असून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा संधी सतत उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.”

कार्यक्रमास या वेळी विशाल अतकरी, पंडीत बाबळे, दर्शन शेंडे, रुशिकेश येवले आदी उपस्थित होते. प्रशिक्षणास सहभागी एकूण ३५ विद्यार्थी उपस्थित होते.

“त्या पाटी, ती फळी, ते गुरू आणि आम्ही – राजूरच्या स्नेहमिलनात जुनं बालपण पुन्हा जगलं!”

ती शाळा, ते दिवस…! राजूर (काॅलरी) शाळेत ३७ वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचा भावुक स्नेहमिलन सोहळा”

शाळा बदलली, जीवनाची दिशा बदलली, पण आठवणी तशाच राहिल्या – हृदयाच्या खोल कप्प्यात घर करून

News Today

दिलीप भोयर

वणी : “ती शाळा, ते मित्र, ते गुरुजन आणि आठवणींचा खजिना” – असाच एक हृदयस्पर्शी सोहळा राजूर (काॅलरी) येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत अनुभवायला मिळाला. शैक्षणिक वर्ष १९८८ ते १९९८ या कालावधीतील माजी विद्यार्थी आणि शिक्षक तब्बल ३७ वर्षांनंतर एकत्र आले आणि जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला.”त्या पाटी, ती फळी, ते गुरू आणि आम्ही – राजूरच्या स्नेहमिलनात जुनं बालपण पुन्हा जगलं!” अशी प्रतिक्रिया उमटली.

या भावनिक स्नेहमिलन सोहळ्यात विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील भावना गाण्यांतून, मनोगतातून व्यक्त केल्या. जुन्या वर्गात पुन्हा एकदा बसून शाळेचा तोच माहोल अनुभवताना अनेकांच्या डोळ्यांत पाणी आलं. शिक्षकांनीही आपले अनुभव सांगत शाळेच्या आठवणींना अधिक भावनिक रंग दिला.

विविध क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारे २६ मित्र आणि २४ मैत्रिणी कार्यक्रमाला उपस्थित होते. बाळाभाऊ उपलेंचवार, उपलेंचवार मॅडम, सौ. रोगे मॅडम, राजेश निरे, शरद इंगळे, चौधरी सर, गारघाटे सर या शिक्षकांची खास उपस्थिती कार्यक्रमाला लाभली.

कार्यक्रमाचं संचालन गुणवंत पचारे यांनी, प्रास्ताविक करुणा पाटील यांनी आणि आभारप्रदर्शन संघदिप भगत यांनी केलं. हा स्नेहमिलन सोहळा म्हणजे शाळेच्या आठवणींना भावनिक उजाळा देणारा एक अविस्मरणीय क्षण ठरला.

औरंगजेबाच्या नादात, सरकारने खांदली उभ्या महाराष्ट्राची कबर!” महाराष्ट्र विशेष अंतर्गत सुरक्षा अधिनियम २०२४ पास – मानवी स्वातंत्र्याला गंभीर धोका

News Today २६ मे २०२५

मुंबई:- महाराष्ट्र विधिमंडळात नुकतेच “महाराष्ट्र विशेष अंतर्गत सुरक्षा अधिनियम २०२४” हे वादग्रस्त विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आले. सरकारच्या मते, राज्यातील अंतर्गत सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या शक्तींना रोखण्यासाठी हे विधेयक आवश्यक होते. मात्र या नव्या कायद्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या स्वातंत्र्यावर गदा येणार असल्याचा आरोप विरोधकांसह नागरिक हक्क संघटनांनी केला आहे.

हे विधेयक सरकारला संशयित व्यक्तींना कोणतीही न्यायप्रक्रिया न करता अटक करण्याचे, त्यांचा संपर्क आणि हालचालींवर नजर ठेवण्याचे अधिकार देते. त्यामुळे विरोधकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सरकारवर टीका करत, हा कायदा लोकशाहीविरोधी असल्याचा आरोप केला आहे.

राज्यात गेल्या काही महिन्यांत औरंगजेबाच्या कबरीवरून पेटलेली राजकारणाची धग, धर्मीय तणाव, आणि त्यानंतर आलेले कायद्याचे हे “दमनकारी” रूप, यामुळे महाराष्ट्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक नागरिकांनी याला “लोकशाहीची कबर” असे संबोधून सोशल मिडियावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात कोणतेही स्पष्ट मार्गदर्शक तत्व नसल्याने प्रशासनाच्या मनमानीची भीतीही व्यक्त होत आहे. जनतेचा दबाव वाढत असल्याने, विरोधी पक्षांनी या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

सरकारने कायद्यासंबंधी खुलासा देताना सांगितले की, “हे विधेयक केवळ देशविघातक कारवायांना रोखण्यासाठी असून, सामान्य नागरिकांच्या हक्कांवर गदा येणार नाही.” मात्र, हे आश्वासन जनतेच्या मनातील भीती दूर करण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे.

हुकुमशाहीचा ब्रिटिश कालीन “रोलट अ‍ॅक्टची” आठवण करून देणारा नवा कायदा? महाराष्ट्राच्या अंतर्गत सुरक्षा अधिनियमावर जनतेत चिंता”

एकीकडे लोकशाहीआणि दुसरीकडे हुकूमशाहीलाआमंत्रण देणारा कायदा महाराष्ट्र सरकार का आणू पहात आहे ?

मुंबई, २४ मे २०२५ –
ब्रिटिश सत्तेच्या काळात १९१९ साली लागू झालेल्या रोलट अ‍ॅक्ट या बदनाम कायद्याच्या छायेत पुन्हा एकदा लोकशाही मूल्यांवर गदा येते आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण, नुकताच महाराष्ट्र सरकारने लागू केलेला विशेष अंतर्गत सुरक्षा अधिनियम, २०२४ हा कायदा अनेकांना ब्रिटिशकालीन दडपशाहीची आठवण करून देतो आहे.

या नव्या कायद्यानुसार, राज्य सरकारला अशा व्यक्तींना अटक करण्याचा अधिकार आहे ज्यांच्यावर अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण होण्याचा संशय आहे – तेही न्यायालयीन सुनावणीशिवाय. हा मुद्दा नेमकाच रोलट अ‍ॅक्टशी मिळता-जुळता आहे, ज्यात नागरिकांना कोणत्याही खटल्याशिवाय अटक करता येत होती.

मानवी हक्क कार्यकर्त्यांनी आणि विविध नागरी संघटनांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांचा आरोप आहे की, हा कायदा नागरिक स्वातंत्र्यावर गदा आणणारा, आणि लोकशाही विरोधी मानसिकतेचा आहे.

इतिहासातून धडा घ्या! १९१९ मध्ये जेव्हा रोलट अ‍ॅक्ट लागू झाला होता, तेव्हा देशभर असंतोष उसळला होता. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली जनतेने सत्याग्रह केला होता, आणि याच पार्श्वभूमीवर

जलियनवाला बागसारखी अमानुष घटना घडली होती.
आज, १०० वर्षांनंतर, लोकशाहीत असताना असाच एखादा कायदा पुन्हा नव्याने जन्म घेतोय का? ही एक गंभीर चिंतेची बाब आहे.

सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांचा आग्रह आहे –
“राज्य सरकारने हा कायदा लोकसमूह, वकिल संघटना आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर पुन्हा तपासावा. कारण स्वातंत्र्याचा गळा घोटणारे कायदे लोकशाहीस अपायकारक ठरतात.”

संपादकीय भूमिका: आज आपल्याकडे मतदानाचा अधिकार आहे, मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, असे कायदे हे हक्क हळूहळू हिरावून घेतात. रोलट अ‍ॅक्टमधून जे शिकायला हवे होते, ते विसरून चालणार नाही. अन्यथा इतिहास पुन्हा स्वतःला दु:खद रीतीने पुन्हा लिहील

मुकुटबन येथील सिमेंट कंपनीत भल्यामोठ्या वाघाचा वावर, कामगारांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न

News Today 

झरी-जामणी (प्रतिनिधी): मुकुटबन येथील एम. पी. बिर्ला सिमेंट कंपनीत वाघाचे वास्तव समोर आले असून, त्यामुळे कामगारांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण आहे. स्थानिक गावांतील शेकडो कामगार येथे २४ तास काम करतात. मात्र, वन्य प्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे त्यांच्यावर जीवितधोका निर्माण झाला आहे.

वाघाचा वावर दिवसेंदिवस वाढतोय

संपूर्ण परिसर जंगलालगत असल्याने वन्य प्राण्यांचा वावर नवीन नाही. मात्र, गेल्या काही दिवसांत वाघाचे दर्शन वारंवार झाल्याने चिंता वाढली आहे. कंपनीच्या आवारात वाघ फिरताना सीसीटीव्हीत कैद झाला असून, काही कामगार व सुरक्षारक्षकांनी प्रत्यक्ष अनुभव सांगितले आहेत. रात्रीच्या वेळी काम करणाऱ्या कामगारांना मोठा धोका निर्माण झाला आहे.

कामगारांच्या सुरक्षेची अत्यंत दयनीय अवस्था

कामगार सांगतात की, कंपनीकडून सुरक्षा भिंती, प्रकाशयोजना किंवा वन्यप्राण्यांपासून संरक्षणात्मक उपाय यावर अजूनही काहीच ठोस पावले उचललेली नाहीत. यामुळे कामगारांमध्ये प्रचंड नाराजी असून, अनेकांनी नाईलाजास्तव ड्युटी टाळण्यास सुरुवात केली आहे.

कामगार संघटनांची मागणी

कामगार संघटनांनी तातडीने खालील मागण्या केल्या आहेत:

परिसरात वाघाच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा.

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भिंती उभारणे, उच्च क्षमतेची लाईट्स बसवणे, सीसीटीव्ही अधिक सक्षम करणे.

रात्रीच्या शिफ्टसाठी अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करावेत.

कंपनी प्रशासन  काय म्हणते.

मागील काही दिवसांपासून वाघ निदर्शनात येत आहे. त्यांचे बंदोबस्त वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी कंपनीत डेरा टाकून बसले असल्याची माहिती कंपनीचे मुख्य अधिकारी ब्रीज मोहन वर्मा यांनी सांगितले आहे. 

कामगारांमध्ये संताप – आंदोलनाची शक्यता

कामगारांमध्ये असंतोषाचा कडेलोट होत असून, लवकर उपाययोजना न झाल्यास कंपनीसमोर आंदोलन छेडण्याचा इशारा काही संघटनांनी दिला आहे.

स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण वाघाचा वावर फक्त कंपनीपुरता मर्यादित न राहता, आसपासच्या वसाहतींमध्येही पसरत असल्याची माहिती आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकही असुरक्षिततेची भावना व्यक्त करत आहेत.

शालेय विद्यार्थ्यांवरही धोका कंपनी परिसरातील शाळकरी मुले वाघाच्या भीतीमुळे शाळेत जाण्यास कचरत आहेत. काही पालकांनी मुलांना शाळेत पाठवणं बंद केलं आहे.

आधीच्या घटना दडपल्या गेल्या? काही स्थानिकांनी सांगितले की, यापूर्वीही अशा घटना घडल्या होत्या, परंतु त्या वेळेस कंपनीने व प्रशासनाने याची माहिती दडपून ठेवली.

आरोग्य व मानसिक तणावाचा मुद्दा सततच्या भीतीमुळे कामगारांमध्ये मानसिक तणाव वाढला आहे. काहींना रात्रीची झोप लागत नाही, तर काहींना कामावर येण्याची इच्छा राहिलेली नाही

संपादकीय टिपण्णी

“मुलभूत सुरक्षा हक्क नाकारला गेला, तर विकास कितीही मोठा असला तरी तो अपूर्ण ठरतो. मुकुटबनमधील कामगार व नागरिकांनी मागणं ही केवळ संरक्षणाची नाही, तर माणूस म्हणून जगण्याच्या अधिकाराची आहे. उद्योग, वन्यजीव व मानव यांच्यात संतुलन राखण्याची जबाबदारी प्रशासनासह प्रत्येक यंत्रणेनं स्वीकारली पाहिजे.”

 

महाराष्ट्र विशेष अंतर्गत सुरक्षा अधिनियम, २०२४’ म्हणजे अघोषित हुकूमशाही: कायद्याच्या नावाखाली मानवी हक्कांचा संकोच

News Today २४ मे २०२५

मुंबई – महाराष्ट्र शासनाने नुकताच पारित केलेला ‘महाराष्ट्र विशेष अंतर्गत सुरक्षा अधिनियम, २०२४’ (MSSA 2024) हा कायदा सध्या व्यापक चर्चेचा आणि टीकेचा विषय बनला आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते, विधिज्ञ, आणि मानवी हक्क संघटना यावर तीव्र आक्षेप घेत आहेत. त्यांचा ठाम आरोप आहे की, हा कायदा लोकशाही मूल्यांना धक्का देणारा असून, तो राज्यात अघोषित हुकूमशाही लागू करण्याचा प्रकार आहे.

या कायद्याअंतर्गत राज्य सरकारला आणि पोलीस यंत्रणेला वाढीव अधिकार देण्यात आले असून, कोणतीही व्यक्ती ‘शक्य तितकी धोका निर्माण करणारी’ आहे असा संशय आल्यास तिला पूर्वसूचना न देता अटक, नजरकैद, किंवा घरातूनच तपासासाठी ताब्यात घेता येऊ शकते. तसेच, ‘राज्य सुरक्षेसाठी आवश्यक’ असे कोणतेही साहित्य, संपर्क साधन किंवा आर्थिक व्यवहार सरळ जब्त करता येतील.

मानवी हक्क कार्यकर्ते सांगतात की, या कायद्यामुळे विरोधी आवाज दडपले जातील, आणि सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल. “आज जर आपण या कायद्याच्या विरोधात बोललो नाही, तर उद्या आपलेच मूलभूत अधिकार हिरावले जातील,” असे मत मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा देशमुख यांनी व्यक्त केले.

मूलभूत प्रश्न:

कायद्याच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि न्यायप्रक्रियेचा अभाव

तटस्थ पत्रकारिता, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय विरोधक यांच्यावर संभाव्य दबाव

व्यक्तिस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच

या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष, विविध संघटना आणि नागरिकांनी या कायद्याचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. काही संघटनांनी उच्च न्यायालयात यासंदर्भात जनहित याचिका दाखल करण्याचाही विचार सुरू केला आहे.

राज्य शासनाचा दावा:

राज्य सरकारचे म्हणणे आहे की, MSSA 2024 हे राज्याच्या अंतर्गत सुरक्षेसाठी अनिवार्य पाऊल आहे आणि याचा वापर फक्त दहशतवाद, देशविघातक कारवाया आणि गंभीर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी केला जाणार आहे. मात्र, विधानसभेत या कायद्यावर फारशी चर्चा न होणे आणि विरोधकांचा आवाज दडपला जाणे यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

निष्कर्ष: ‘

महाराष्ट्र विशेष अंतर्गत सुरक्षा अधिनियम, २०२४’ हा कायदा राज्यात न्याय, स्वातंत्र्य आणि समानतेच्या तत्वांना आव्हान देणारा ठरू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. लोकशाही व्यवस्था जिवंत ठेवण्यासाठी सजग नागरिकांचा जागरूक प्रतिसाद अत्यावश्यक आहे.

अभिव्यक्ती स्वतंत्र संपुष्टात , महाराष्ट्र सरकारचा ‘विशेष अंतर्गत सुरक्षा अधिनियम, २०२४’ : मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा धोका?

News Today

मुंबई | २३ मे २०२५

महाराष्ट्र सरकारने विधीमंडळात मांडलेले ‘विशेष अंतर्गत सुरक्षा अधिनियम, २०२४’ (Maharashtra Special Internal Security Act – MSISA) हे विधेयक राज्याच्या अंतर्गत सुरक्षेसाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. तथापि, या विधेयकामुळे मानवी हक्कांचे उल्लंघन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काय आहे विधेयकाचा मूळ उद्देश?

या कायद्याद्वारे बेकायदेशीर क्रियाकलाप करणाऱ्या व्यक्ती किंवा संघटनांवर प्रतिबंध, गंभीर चौकशी, व कडक कारवाई करता यावी, अशी व्यवस्था केली जात आहे. यात व्यक्तीला किंवा संघटनेला ‘अनधिकृत’ घोषित करून त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर आणि वैयक्तिक स्वातंत्र्यावर नियंत्रण ठेवण्याची तरतूद आहे.

मानवी हक्क संघटनांची चिंता काय आहे?

१. न्यायिक प्रक्रिया डावलण्याचा धोका: या कायद्यानुसार, व्यक्तीला कोणतेही ठोस पुरावे नसतानाही ‘देशविघातक’ घोषित करता येते. न्यायालयीन संमती न घेता अटक, संपत्ती जप्ती व चौकशीसारख्या पावले उचलता येतात, यामुळे न्यायालयीन प्रक्रिया बळकट होण्याऐवजी कमकुवत होऊ शकते.

२. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला गालबोट: या कायद्याचा उपयोग करून सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, सरकारविरोधी विचार मांडणारे नागरिक यांना दडपण्याचा धोका आहे. कोणताही मतप्रदर्शनाचा प्रकार ‘बेकायदेशीर विचारसरणी’ म्हणून घोषित केला जाऊ शकतो.

३. राजकीय दुरुपयोगाची शक्यता: हा कायदा सत्ताधाऱ्यांच्या हातात राजकीय शस्त्र होऊ शकतो, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. याचा उपयोग विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यासाठी होण्याची शक्यता आहे.

४. तपास यंत्रणांना अतीरिक्त अधिकार: पोलिसांना आणि तपास यंत्रणांना वॉरंटशिवाय छापे, मोबाईल व संगणक तपासणी, व चौकशीसाठी दीर्घ काळ कोठडी यासारखी मुभा देण्यात आली आहे, जी नागरिकांच्या गोपनीयतेच्या अधिकारावर आघात करू शकते.

मानवी हक्क आयोगाची भुमिका:

राष्ट्रीय आणि राज्य मानवी हक्क आयोगांनी अशा प्रकारच्या कायद्यांबाबत पूर्वीही चिंता व्यक्त केलेल्या आहेत. आयोगाचे म्हणणे आहे की, सुरक्षा आणि स्वातंत्र्य यामध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे. एकतर्फी कायद्यांमुळे लोकांचा सरकारवरील विश्वास डळमळीत होऊ शकतो.

सरकारची भूमिका

सरकारच्या मते, या कायद्याची गरज आहे कारण:

राज्यात दहशतवादी संपर्क वाढत आहेत.

सोशल मीडियाचा वापर करून द्वेषपूर्ण प्रचार व कट कारस्थाने चालतात.

केंद्राचा UAPA कायदा पुरेसा नसल्याने राज्य पातळीवर स्वतंत्र पावले उचलणे गरजेचे आहे.

निष्कर्ष:

महाराष्ट्र सरकारचा विशेष अंतर्गत सुरक्षा अधिनियम, २०२४ हा कायदा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक वाटू शकतो. मात्र, यातील काही तरतुदी लोकशाही मूल्यांना आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांना बाधा आणू शकतात. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करताना न्यायालयीन देखरेख, पारदर्शक तपास व सार्वजनिक संवाद अत्यंत आवश्यक आहेत.

झरि जामनी तालुक्यातील तरुण शेतकऱ्याने घेतला गळफास : गावात हळहळ

0

News Today 

झरिजामनी (प्रतिनिधी) – झमकोला गावातील एक तरुण शेतकरी सुरज विनायक मेश्राम (वय २४) याने आज ता. २१ मे रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास आपल्या शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सुरज यांच्याकडे सुमारे ३ एकर शेती होती. त्यामध्ये ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र अलीकडच्या काळात शेतीतून उत्पन्न कमी होत असल्यामुळे ते मानसिक तणावात होते, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.

आज दुपारी शेतात गेलेल्या सुरज यांनी झाडाला दोरीने गळफास लावून आपले प्राण गमावले. ही घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी आरडाओरडा केला आणि ग्रामस्थ घटनास्थळी धावले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

सुरजच्या आत्महत्येचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नसले तरी आर्थिक अडचणी, नापिकी व कर्जबाजारीपणाचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास स्थानिक पोलीस करत आहेत.

सध्या संपूर्ण झमकोला गावात शोककळा पसरली आहे. तरुण शेतकऱ्याच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत असून शासनाने अशा शेतकऱ्यांच्या समस्या गांभीर्याने घ्याव्यात, अशी मागणी होत आहे.

भाजपकडून तारेंद्र बोर्डे यांना जिल्हाध्यक्षपदावरून हटविल्याने ; कुणबी समाजात नाराजीचे वातावरण

0

News Today 

यवतमाळ प्रतिनिधी – यवतमाळ जिल्ह्यातून पाच आमदार निवडून आणण्यास मोठी भूमिका बजावलेल्या भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांना पक्षाने जिल्हाध्यक्षपदावरून हटविले आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून भाजपच्या संघटनात्मक बांधणीसाठी कार्यरत असलेल्या बोर्डेंना अचानकपणे पदावरून हटवल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी कुणबी समाजाबद्दल अभद्र टिपणी करणाऱ्या कार्यकर्त्याला अद्दल घडविल्याने एका माजी आमदाराने आपल्या विधानसभा पराभवाचे खापर थेट बोर्डेंच्या माथी फोडले होते. याच पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. मात्र, या निर्णयामुळे भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी अधिकच तीव्र झाली असून, त्याचे पडसाद आगामी स्वराज्य संस्थेतील जिल्हा परिषद, पंचायत समिती, व नगर पालिकेतील राजकीय घडामोडींमध्ये उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विशेष म्हणजे, तारेंद्र बोर्डे हे युवा व धडाळीचे नेते असून कुणबी ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. तसेच त्यांचे वडील देखील कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष कार्य पार पडले आहे. विदर्भात प्राबल्य असलेल्या आणि संख्येने मोठ्या असलेल्या या समाजाने भाजपला सातत्याने पाठिंबा दिला आहे. मात्र, आता समाजात असंतोषाचे वातावरण पसरले असून, या निर्णयामुळे भाजपपासून दूर जाण्याचा सूर दिसून येत आहे.

भाजपने आपल्या सक्रिय आणि कार्यक्षम पदाधिकाऱ्याला अचानकपणे पदावरून दूर केल्याने स्थानिक पातळीवर नाराजी असून, पक्षासाठी हा निर्णय राजकीयदृष्ट्या महागात पडू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.

पुढील काही दिवसांत कुणबी समाज आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा प्रतिसाद भाजपच्या आगामी धोरणांवर मोठा परिणाम घडवून आणू शकतो अशी चर्चा रंगू लागली आहे. तसेच भाजपतील अंतर्गत वाद आणखी चव्हाट्यावर येण्याची दाट शक्यता आहे. याबाबत तारेंद्र बोर्डे यांना संपर्क केला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.