Thursday, April 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedनगरपरिषदेची ट्यूबवेल बंद पाडून खासगी बोअरवेलचा घाट; जनतेच्या पाण्यावर गदा, वणीत संतापाचा...

नगरपरिषदेची ट्यूबवेल बंद पाडून खासगी बोअरवेलचा घाट; जनतेच्या पाण्यावर गदा, वणीत संतापाचा उद्रेक कमळाबाईच्या माजी नगरसेवकाचा महाप्रताप ; माजी आमदारांच्या ‘आशीर्वादाने’ नगरपरिषदेवर दबाव टाकल्याचा नागरिकांचा दावा “मामा मेहेरबान तो नगरसेवक पैलवान” अशी ओरड होत आहे


News Today 

वणी : वणी शहरातील टांगोर चौक परिसरात नगरपरिषदेची तब्बल १५ ते १७ वर्षे सुरू असलेली सार्वजनिक ट्यूबवेल बेकायदेशीरपणे बंद पाडून त्या ठिकाणी खासगी बोअरवेल खणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे गणेशपूर रोड, उतारी भाग, रंगारीपुरा, सर्वोदय चौक, भोईपुरा, गांधी चौक व सती घाट परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून जनतेत तीव्र संताप उसळला आहे.

“मामा मेहेरबान तो नगरसेवक पैलवान अशी म्हण आता शहरात रंगताना दिसून येत आहे. भाजपच्या या माजी नगरसेवकाने प्रचंड मोठा महाप्रताप घडविल्याने जनमानसात मोठा रोष निर्माण होत आहे.

या प्रकरणातील संबंधित व्यापारी हा टांगोर चौकातील एका नामांकित मिठाई भंडाराचा संचालक असून तो भारतीय जनता पार्टीकडून नगरपालिकेत मागील काळात स्वीकृत नगरसेवक असल्याची माहिती आहे. या नगरसेवकाचे माजी आमदार ‘मामा’ यांच्याशी जवळचे संबंध असल्याने त्यांच्या माध्यमातून नगरपरिषदेवर राजकीय दबाव आणल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

माहितीनुसार, सदर ट्यूबवेल २०१०-११ च्या भीषण दुष्काळी परिस्थितीत नगरपरिषदेकडून खोदण्यात आली होती. या ट्यूबवेलवरून वणी शहरातील मोठ्या भागाला पाणीपुरवठा केला जात होता. या प्रकल्पासाठी लोखंडी व महागडी पाइपलाइन टाकण्यात आली असून आंबेडकर चौक, सर्वोदय चौक, मुख्य बाजारपेठ व वॉटर सप्लाय विभागापर्यंत ती जोडलेली आहे. या संपूर्ण यंत्रणेवर आजपर्यंत अंदाजे ५० ते ६० लाख रुपयांचा खर्च झाल्याची माहिती आहे.

नागरिकांच्या आरोपानुसार, संबंधित व्यापाऱ्याच्या प्रतिष्ठानसमोर ही ट्यूबवेल व टँकर भरण्याची सुविधा ‘अडथळा’ ठरत होती. त्यामुळे या सार्वजनिक ट्यूबवेलचा कायमस्वरूपी विल्हेवाट लावण्यासाठी दोन-तीन दिवसांपूर्वी ती मुद्दाम बंद ठेवण्यात आली. त्यानंतर ट्यूबवेलमधील मोटार काढून त्यामध्ये दगड व गोटे टाकून ती पूर्णपणे जाम करण्यात आली. त्याच ठिकाणी खासगी पाण्यासाठी बोअरवेल खणल्याचा आरोप परिसरातील नागरिक करत आहेत.

या गंभीर प्रकारामुळे वणी शहरात पाण्याचा प्रश्न अधिकच तीव्र झाला असून नागरिकांत भाजपाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून खासगी स्वार्थ साधल्याचा हा प्रकार असल्याने दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी शिंदे सेनेचे नेते विजयबाबू चोरडिया यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना कळविले असून जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याशीही संपर्क साधून तातडीने चौकशी व कारवाईची मागणी केली आहे.

सार्वजनिक पाण्यावर गदा आणणाऱ्या या प्रकरणाकडे प्रशासन गंभीरपणे पाहणार का, की राजकीय दबावापुढे पुन्हा एकदा जनतेच्या हक्काचे पाणी मुरणार, असा सवाल आता वणीकर विचारत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter