News Today
यवतमाळ (प्रतिनिधी) :
स्वातंत्र्य दिनाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त यवतमाळ शहरात सामाजिक कार्यकर्ता शैलेश भाऊ करिहार यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला युवक-युवतींसह महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक वर्षांपासून १५ ऑगस्ट या दिवशी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्याची परंपरा शैलेश भाऊ करिहार यांनी जपली असून, यावर्षी देखील हा उपक्रम सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारा ठरला.

रक्तदान शिबिरामध्ये शहरातील अनेक युवक-युवतींसह महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. विशेष म्हणजे महिला वर्गानेही मोठ्या संख्येने रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी बजावली.
कार्यक्रमास नंददीप फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप भाऊ शिंदे, निस्वार्थ सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत लांबट, महिला जिल्हा अध्यक्ष चेतनाताई राऊत, यवतमाळ येथील नामांकित स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अंजली गवारले, तसेच अनेक ज्येष्ठ समाजसेवक, समाजसेविका व रुग्णसेवकांची उपस्थिती होती.

या शिबिरात मोठ्या प्रमाणावर रक्तसाठा उपलब्ध झाल्याने अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत होणार आहे. शैलेश भाऊ करिहार यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “स्वातंत्र्य दिन हा फक्त ध्वजारोहण करून साजरा करण्याचा दिवस नाही, तर समाजासाठी काहीतरी करण्याची संधी आहे. रक्तदान केल्याने एखाद्याला नवजीवन मिळतं, त्याहून मोठं राष्ट्रसेवा दुसरी नाही.”
या उपक्रमामुळे युवकांमध्ये समाजकारणाची नवी जाणीव निर्माण झाली असून, दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील या रक्तदान शिबिराने यवतमाळमध्ये आदर्श निर्माण केला आहे.




