News Today
अमरावती :- पूर्वी गावांमध्ये जुगार खेळला जायचा. यावर कायदेशीर बंदी होती. जुगार खेळणाऱ्यांना पकडलं जायचं आणि त्यांना समज देण्यात यायची कारण ही सवय किती घातक असते हे त्यांना कळावं. एक-दोनदा माणूस जिंकतो, पण नंतर दहा वेळा हरतो. अनेक कुटुंबं जुगारामुळे उद्ध्वस्त झाली आहेत. घर चालवणाऱ्या मातांना मुलांचं पालनपोषण कसं करायचं, हा प्रश्न उभा राहायचा. म्हणूनच जुगारावर कायदेशीर कारवाई व्हायची.

आज हाच जुगार, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मोबाईल गेमिंगच्या स्वरूपात आपल्या समाजात पसरतो आहे. मग या ऑनलाईन जुगारावर बंदी का नाही? लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणाऱ्या नेत्यांना या समस्येची जाणीव नाही का? या नेत्यांनी आणि अभिनेत्यांनी सामाजिक बांधिलकी विसरली की काय असा निर्वाणीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

आज काही अभिनेते “जंगली रमी”सारख्या अॅप्सचं जाहिरातीतून प्रमोशन करताना ‘आवना महाराज’सारखे मनोरंजक शब्द वापरून लोकांना आकर्षित करत आहेत. हे सरळसरळ समाजात ऑनलाईन जुगाराची व्यसनाधीनता वाढवत आहे.

चित्रपट सृष्टीतील अनेक अभिनेते समाजाला चांगला संदेश देतात, त्यामुळे तरुण त्यांना आपला आदर्श मानतात. अभिनेते जसे कपडे घालतात तसेच कपडे तरुण घालतात, त्यांची हेअरस्टाईल नक्कल करतात. मग या अभिनेत्यांनी विचार करायला नको का, की आपण समाजासमोर कसा आदर्श ठेवतोय?
फक्त पैशासाठी अशी जाहिरात करणे योग्य आहे का, ज्या अॅप्समुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत? काही लोकांनी तर आपली संपूर्ण संपत्ती गमावून आत्महत्या केली आहे. आज विधानसभांमध्येही या विषयावर चर्चा सुरू झाली आहे.

ज्या अभिनेत्यांनी या ऑनलाईन जुगाराचा प्रचार केला आहे, त्यांनी आपलं सामाजिक दायित्व विसरलंय का? हा प्रश्न केवळ मला नाही, तर प्रत्येक त्या व्यक्तीला सतावत आहे जो आजच्या तरुण पिढीचं भलं इच्छितो.

✍️ रवी मानव
व्याख्याते व ग्रामगीता प्रचारक
९७६७३९९३१७



