
News Today
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा वारसा असलेल्या भु-वैकुंठ अड्याळ टेकडीवरील मालकी हक्कासाठी अखिल भारतीय गुरुदेव सेवामंडळ, गुरुकुंज मोझरी यांच्याद्वारे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला कायदेशीर संघर्ष अखेर न्यायालयात फसला आहे. उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाने दिनांक २ मे २०२५ रोजी दिलेल्या ऐतिहासिक निकालात अड्याळ टेकडीवरील सुबोधदादा व नवलाजी मुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाचे हक्क मान्य करून, गुरुकुंज मोझरीच्या दाव्यांना पूर्णतः फेटाळले आहे.

तुकारामदादा गीताचार्य यांनी १९६७ मध्ये सुरू केलेले ग्रामगीतेचे प्रयोग, मौनसाधना, पंचगव्य चिकित्सा, ग्रामोद्योग, महिला सशक्तीकरण यांसारख्या उपक्रमांमुळे अड्याळ टेकडी हे आत्मविकासाचे भुवैकुंठ म्हणून ओळखले जाते. हे कार्य विनाअनुदान व स्थानिक जनतेच्या श्रमदानातून उभे राहिले असून, कोणतीही संस्था नोंदणीकृत नसतानाही समाजकार्याच्या बळावर टिकून आहे.

२०१० पासून मोझरी संस्थेने विविध दावे करून अड्याळ टेकडीवर आपला हक्क सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र हे सर्व दावे ब्रह्मपुरी दिवाणी न्यायालय व चंद्रपूर जिल्हा सत्र न्यायालयाने खारिज केले. तरीही १२ डिसेंबर २०२० रोजी, घरभेदी मधुकर तुंडूलवार यांनी लोकन्यायालयात गुप्तपणे मोझरी संस्थेशी मिळून अड्याळ टेकडीची संपत्ती हस्तांतरणाचा समझोता करून घेतल्याचे वृत्त समोर आले.

या बेकायदेशीर कृत्याला विरोध करत सुबोधदादा व नवलाजी मुळे यांनी ०४/२०२१ अंतर्गत न्यायालयात आवाहन केले. हा दावा स्थानिक व जिल्हा न्यायालयांनी फेटाळला असला, तरी उच्च न्यायालयात या लढ्याला यश मिळाले.
न्यायालयाने केवळ लोकन्यायालयातील समझोता रद्द केला नाही, तर मूळ ०४/२०२१ दावा पुनरुज्जीवित करण्याचे निर्देश दिले असून, यानंतर अड्याळ टेकडीच्या बाजूने कायदेशीर लढ्याला अधिक बळ मिळाले आहे. या विजयामुळे अड्याळ टेकडीवरील सेवाभावी कार्याला नवसंजीवनी मिळाली असून, गुरुकुंज मोझरीच्या मालकी दाव्याचा पूर्णतः शेवट झाला आहे.

संपूर्ण प्रकरणात अड्याळ टेकडीवरील गुरुदेवभक्तांनी एकजूट दाखवून न्याय मिळवला. आता या पवित्र कार्यासाठी पुन्हा एकदा संघटीत होऊन ‘सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं’ या उक्तीप्रमाणे अड्याळ टेकडीचे कार्य तितक्याच निष्ठेने पुढे नेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.



