News Today
झरी-जामणी : मुकूटबन येथील बी.एस. इस्पात कोळसा कंपनीतील कामगारांच्या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने मध्यस्थी करीत अवघ्या एका तासात तोडगा काढला.

वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर व प्रदेश कामगार सेलचे प्रदेश उपाध्यक्ष आबिद हुसेन यांच्या पुढाकाराने झालेल्या चर्चेनंतर कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या मागण्यांवर लिखित आश्वासन दिल्याने उपोषणकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
कामगारांनी प्रकल्पग्रस्त आणि जुन्या कर्मचाऱ्यांना डावलून बाहेरील मजुरांची भरती करण्यात येत असल्याच्या विरोधात सोमवार, १० नोव्हेंबर रोजी सकाळपासून उपोषणाला बसत आपल्या मागण्यांचा पाठपुरावा केला होता. पंधरा दिवसांपूर्वी दिलेल्या निवेदनानंतरही व्यवस्थापनाने प्रतिसाद न दिल्याने कामगार संघटनेने हा कठोर पवित्रा घेतला.दुपारी १ वाजता दिलीप भोयर आणि आबिद हुसेन यांनी उपोषण स्थळी भेट देऊन कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली.

चर्चेअंती निवेदनात नमूद केलेल्या जुन्या कामगारांची पुनर्नियुक्ती केली जाईल आणि प्रलंबित सीआरपीएफ फंड जमा केला जाईल, असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या दोन्ही मागण्या एका महिन्याच्या आत पूर्ण केल्या जातील, असे कंपनीने लिखित आश्वासन दिले.
या चर्चेच्या आणि निर्णयाच्या वेळी बी.एस. इस्पात कंपनीचे अधिकारी सुहास दास, सुकांता, कामगार नेते दिलीप भोयर, आबिद हुसेन, राजू वांढरे, मनोज नवले, किशोर गोनलावार, विनोद ठेंगणे, तसेच मुकूटबन पोलिस ठाण्याचे ठाणेदार विलास कुलकर्णी, टाऊन बीट अधिकारी दिपक ताठे, जमादार दिलीप जाधव आणि पत्रकार रफीक कनोजे उपस्थित होते. या समितीच्या उपस्थितीत आश्वासनपत्र देऊन आंदोलनाचा तोडगा लागला.
कामगारांचा इशारा : मागण्या न मानल्यास रास्ता रोको
कामगार नेत्यांनी स्पष्ट चेतावणी दिली की, कंपनीने जर १० डिसेंबरपर्यंत मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर ११ डिसेंबरपासून कंपनीच्या मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. त्या काळात एकही ट्रक रस्त्यावरून बाहेर जाऊ देण्यात येणार नाही, असा इशारा दिलीप भोयर यांनी दिला.
बी.एस. इस्पात कंपनीच्या कामगारांच्या हक्कांसाठी झालेल्या या निर्णायक मध्यस्थीमुळे सध्या औद्योगिक परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बी. एस. इस्पात कंपनीकडून मिळालेले लिखित आश्वासनाचे पत्र




