News Today
वणी (प्रतिनिधी) – वणी शहरासाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखड्याला (डी.पी. प्लॅन) स्थानिक नागरिकांकडून तीव्र विरोध होत असून, या आराखड्याची अंमलबजावणी तात्काळ स्थगित करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे यांचेकडे करण्यात आली आहे.
या संदर्भात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय पांडुरंग धोबे यांनी दिनांक २९ जुलै २०२५ रोजी वणी नगर परिषदेकडे सविस्तर निवेदन सादर केले. सदर निवेदनात नागरिकांच्या वतीने काही गंभीर मुद्द्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.
लोकप्रतिनिधींचा अभाव, नागरी सहभागाचा अभाव
सध्या वणी नगर परिषदेमध्ये कोणतेही निवडून आलेले लोकप्रतिनिधी नसल्यामुळे अशा गंभीर आराखड्याची अंमलबजावणी लोकशाही मूल्यांना धरून होऊ शकत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच, डी.पी. आराखड्याबाबत शहरातील सामान्य नागरिक, व्यापारी, शेतकरी, गृहनिर्माण संस्था यांना कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.
टी.पी. स्कीमवर संताप
Town Planning (टी.पी.) स्कीम अंतर्गत वैयक्तिक मालमत्तांवर आणि शेतीच्या जमिनींवर करण्यात आलेल्या हस्तक्षेपांबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. याबाबत प्रशासनाने कोणतीही खुली चर्चा अथवा स्पष्टीकरण दिलेले नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
प्रमुख मागण्या पुढे
निवेदनात डी.पी. आराखडा तात्काळ स्थगित ठेवावा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होईपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये, तसेच नागरिकांच्या उपस्थितीत खुली जनसुनावणी आयोजित करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय, आराखड्याविरोधात आलेल्या सर्व हरकती व सूचनांचा विधिवत विचार करून लेखी प्रतिसाद द्यावा, अशीही मागणी आहे.
या निवेदनामुळे वणी शहरात विकास आराखड्याबाबत नवा जनआंदोलनीय सूर उमटू लागला आहे. आता प्रशासन या मागण्यांकडे कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



