News Today
चिखलगाव, ता. वणी (प्रतिनिधी)
यावर्षीच्या अतीवृष्टी व महापुरामुळे राज्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतातील पिके, जनावरे तसेच घरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. या संकटग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी वणी तालुक्यातील चिखलगाव येथील आदर्श ज्येष्ठ नागरिक मंडळ, साई दर्पण ग्रुप व जगन्नाथ बाबा योग ग्रुप यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत मदतफेरीचे आयोजन करण्यात आले.
या मदतफेरीदरम्यान मंडळातील कार्यकर्त्यांनी चिखलगाव परिसरातील साधनकरवाडी, ओमनगर, मंगलम पार्क या भागात घरोघरी जाऊन नागरिकांना मदतीसाठी आवाहन केले. नागरिकांनी या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अठ्ठावन्न हजार सातशे रुपयांचा निधी सढळ हाताने दिला. गोळा झालेला हा निधी थेट मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाठविण्यात आला, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली.
या उपक्रमासाठी आदर्श ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष सुधाकरराव गारघाटे तसेच सदस्य रमेशभाऊ सुंकुरवार, लक्ष्मणराव ईद्दे, दिगंबर गोहोकार, अरुण झाडे, जयप्रकाश राजुरकर, वसंतराव उपरे, नेताजी मोरे, परशराम ढुमणे, संजय पोटदुखे, सुधीर ठेंगणे, दिगंबर मुजोरिया, नरेंद्र धोबे, दिनेशकुमार श्रीवास्तव, विठ्ठलराव वैद्य, सुरेश रायपूरे, विठ्ठलराव होले, विजय गौरकार व देशमुख साहेब यांनी मोलाचे सहकार्य केले.
या मदतफेरीच्या यशस्वी आयोजनामुळे चिखलगाव व परिसरातील नागरिकांमध्ये सामाजिक एकतेचा आणि संवेदनशीलतेचा सुंदर संदेश गेला आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी सहानुभूतीची भावना जागवून मदतीचा हात पुढे करणाऱ्या या मंडळाचे वणी परिसरातून मोठ्या प्रमाणावर कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
—✍️ विशेष प्रतिनिधी, चिखलगाव


