

News Today
वणी – तालुक्यातील तेजापूर गावातील ३० वर्षीय युवा शेतकरी मंगेश संजय पिंपळकर यांनी आर्थिक आणि मानसिक तणावाला कंटाळून गुरुवारी (ता. २३ ऑक्टोबर) संध्याकाळी विष प्राशन करून आपले जीवन संपवले. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मंगेश पिंपळकर यांच्या मालकीची सुमारे चार एकर शेती असून गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यावर कर्जाचा मोठा भार होता. यावर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि पिकांचे मोठे नुकसान यामुळे त्यांच्या उत्पन्नात मोठी घट येणार असल्याची शक्यता निर्माण झाली.


दरम्यान, सरकारकडून मदतीच्या विविध घोषणा झाल्या तरी प्रत्यक्षात त्या मदतीचे काहीच लाभ शेतकऱ्यांच्या हातात पोहोचले नाहीत. त्यामुळे मंगेश यांच्या मनात प्रचंड नैराश्य निर्माण झाले होते.गुरुवारी सायंकाळी सुमारे सहा वाजताच्या सुमारास, त्यांनी आपल्या घरात विषारी द्रव्य प्राशन केले.


प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तत्काळ कायर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारांसाठी त्यांना वणीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.


मात्र डॉक्टरांनी प्रयत्न करूनही त्यांना मृत घोषित केले.मंगेश यांच्या पश्चात पत्नी, एक लहान मुलगी, तसेच वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण तेजापूर गावात शोककळा पसरली आहे.


स्थानिक शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी शासनाकडे पीडित कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत आणि स्थायी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.गावातील नागरिकांचे म्हणणे आहे की, “सरकारने वेळेत आणि प्रत्यक्ष मदत न दिल्यामुळेच या तरुण शेतकऱ्याला टोकाचा निर्णय घ्यावा लागला”. या घटनेनंतर प्रशासन आणि कृषी विभागाने तत्काळ वस्तुस्थितीचा तपास करून योग्य ती मदत करणे अत्यावश्यक असल्याचे मत सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.






