
News Today
यवतमाळ प्रतिनिधी – यवतमाळ जिल्ह्यातून पाच आमदार निवडून आणण्यास मोठी भूमिका बजावलेल्या भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांना पक्षाने जिल्हाध्यक्षपदावरून हटविले आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून भाजपच्या संघटनात्मक बांधणीसाठी कार्यरत असलेल्या बोर्डेंना अचानकपणे पदावरून हटवल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी कुणबी समाजाबद्दल अभद्र टिपणी करणाऱ्या कार्यकर्त्याला अद्दल घडविल्याने एका माजी आमदाराने आपल्या विधानसभा पराभवाचे खापर थेट बोर्डेंच्या माथी फोडले होते. याच पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. मात्र, या निर्णयामुळे भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी अधिकच तीव्र झाली असून, त्याचे पडसाद आगामी स्वराज्य संस्थेतील जिल्हा परिषद, पंचायत समिती, व नगर पालिकेतील राजकीय घडामोडींमध्ये उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विशेष म्हणजे, तारेंद्र बोर्डे हे युवा व धडाळीचे नेते असून कुणबी ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. तसेच त्यांचे वडील देखील कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष कार्य पार पडले आहे. विदर्भात प्राबल्य असलेल्या आणि संख्येने मोठ्या असलेल्या या समाजाने भाजपला सातत्याने पाठिंबा दिला आहे. मात्र, आता समाजात असंतोषाचे वातावरण पसरले असून, या निर्णयामुळे भाजपपासून दूर जाण्याचा सूर दिसून येत आहे.

भाजपने आपल्या सक्रिय आणि कार्यक्षम पदाधिकाऱ्याला अचानकपणे पदावरून दूर केल्याने स्थानिक पातळीवर नाराजी असून, पक्षासाठी हा निर्णय राजकीयदृष्ट्या महागात पडू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.

पुढील काही दिवसांत कुणबी समाज आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा प्रतिसाद भाजपच्या आगामी धोरणांवर मोठा परिणाम घडवून आणू शकतो अशी चर्चा रंगू लागली आहे. तसेच भाजपतील अंतर्गत वाद आणखी चव्हाट्यावर येण्याची दाट शक्यता आहे. याबाबत तारेंद्र बोर्डे यांना संपर्क केला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.



