
News Today
चंद्रपूर, ता. ३ : राजुरा विधानसभा मतदारसंघातील बोगस मतदार नोंदणी प्रकरणाचा गूढ अधिकच गडद बनत आहे. या घोटाळ्यामागील ‘मास्टरमाईंड’ अजूनही पडद्याआड असला तरी या नोंदणीसाठी वापरलेले काही मोबाईल क्रमांक भाजपशी संबंधित व्यक्तींचे असल्याचे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. शेतकरी संघटनेच्या तपासात ही नवी माहिती उजेडात आली असून, पोलिस यंत्रणेची निष्क्रियता आणि डोळेझाक यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत या प्रकरणाचा उल्लेख करताच राजुरा मतदारसंघ देशभर चर्चेत आला. काँग्रेसचे तत्कालीन आमदार सुभाष धोटे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी १ ते १५ ऑक्टोबर या काळात ११ हजार ६६७ बोगस मतदारांची नोंदणी झाल्याची तक्रार केली होती. त्यानंतर ६ हजार ८५३ मतदारांचे नाव वगळण्यात आले. तहसीलदारांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असली तरी प्रत्यक्ष निवडणुकीत भाजपचे उमेदवार देवराव भोंगळे यांनी फक्त तीन हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला.

पोलिसांनी निवडणूक आयोगाकडे या नोंदणीसाठी वापरलेले आयपी अॅड्रेस व ओटीपीसाठी वापरलेले मोबाईल क्रमांक मागवले, मात्र आयोगाकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. वर्षभर लोटूनही या क्रमांकधारकांची चौकशी न झाल्याने पोलिस यंत्रणा दबावाखाली असल्याचा आरोप होत आहे.

दरम्यान, तहसीलदारांच्या तक्रारीत नमूद १५ वा मोबाईल क्रमांक (7820864519) हा अनिल झाडे नावाच्या व्यक्तीचा असून ते भाजप नेते निलेश ताजणे यांच्याशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच १६ वा क्रमांक (9607217143) हा भाजप कार्यकर्ता प्रतीक सदानपवार यांचा असल्याची नोंद आहे. हे दोघेही भाजप नेत्यांसोबतच्या छायाचित्रांत दिसत असून, तरीही पोलिसांनी त्यांची चौकशी केलेली नाही.

शेतकरी संघटनेचे उमेदवार आणि माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यांच्या तपासात या क्रमांकांचा भाजप कार्यकर्त्यांशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. “ही बोगस मतदार नोंदणी म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा कट आहे. पोलिस प्रशासनाने निष्क्रियता दाखवली असून जबाबदारी निवडणूक आयोगावर ढकलली आहे,” असा आरोप त्यांनी केला.

“आरोपींना तातडीने अटक करावी, मास्टरमाईंड समोर आणावा आणि चौकशीचा अहवाल सार्वजनिक करावा; अन्यथा आम्ही आंदोलन करू,”
— अँड. वामनराव चटप, माजी आमदार, राजुरा
शेतकरी संघटना युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अॅड. मुरलीधर देवाळकर, स्वभाप जिल्हाध्यक्ष नीलकंठ कोरांगे, तसेच महिला आघाडी जिल्हाध्यक्षा पूर्णिमा निरंजने यांनीही पोलिस प्रशासनाला इशारा दिला आहे की जर निष्क्रियता सुरूच राहिली, तर तीव्र आंदोलन उभारले जाईल.





