
News today
वणी :- सन् १९८७–८८ मध्ये एस.पी.एम. हायस्कूल, वणी येथून इयत्ता १० वी ‘अ’ वर्गातून शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा दिनांक २५ मे २०२५ रोजी वणी येथे उत्साहात पार पडला. ३७ वर्षांनंतर एकमेकांना भेटण्याचा आनंद या माजी विद्यार्थ्यांनी “स्नेहमेळाव्या”च्या निमित्ताने अनुभवला. या उपक्रमाची संकल्पना किरण तेलतुंबडे यांनी मांडली होती.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी मुरलीधर मुळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून एस.पी.एम. हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक वाळके सर, गायवळकर सर, उपरे सर आणि पुखरे सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर उपस्थित माजी शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी राजू तायडे, प्रकाश पडोळे, मेघा अमळकर यांनी विशेष भावना व्यक्त केल्या.

कार्यक्रमात मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. तसेच माजी वर्गमित्रांनी एकत्र येत आनंदाचे क्षण साजरे केले. ‘स्नेहमेळाव्या’त विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गीत-संगीत सादरीकरण व हास्य विनोदांनी उपस्थितांचे भरभरून मनोरंजन झाले. विविध स्पर्धांमध्ये विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
या सोहळ्याचे उत्कृष्ट सूत्रसंचालन शिवाजी विद्यालय, कोल्हापूर येथील प्रा. डॉ. वर्षा राठोड यांनी केले. प्रमुख पाहुण्यांमध्ये डॉ. अनीता आरखे, डॉ. केशव देशपांडे, डॉ. देवरकर यांचा समावेश होता.

कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रमुख माजी विद्यार्थ्यांमध्ये किशोर सोम्याल, शिल्पा लोणारे, विलास बैद्य, छाया मोरे, मंजुषा देशपांडे, अर्पण समशेरपुरे, ज्योती तामगाडगे, नीता बुरांडे, यशवंत देवरकर, अनंता झाडे, रंजन भट, रश्मी सवर्तकर, विजय जयपुरकर, रजनी वाळके, किरण तेलतुंबडे आदींचा समावेश होता.
हा स्नेहमेळावा केवळ आठवणींचा नव्हे, तर पुन्हा एकदा जुने ऋणानुबंध दृढ करण्याचा एक सुंदर योग ठरला.



