ती शाळा, ते दिवस…! राजूर (काॅलरी) शाळेत ३७ वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचा भावुक स्नेहमिलन सोहळा”
शाळा बदलली, जीवनाची दिशा बदलली, पण आठवणी तशाच राहिल्या – हृदयाच्या खोल कप्प्यात घर करून


News Today
दिलीप भोयर
वणी : “ती शाळा, ते मित्र, ते गुरुजन आणि आठवणींचा खजिना” – असाच एक हृदयस्पर्शी सोहळा राजूर (काॅलरी) येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत अनुभवायला मिळाला. शैक्षणिक वर्ष १९८८ ते १९९८ या कालावधीतील माजी विद्यार्थी आणि शिक्षक तब्बल ३७ वर्षांनंतर एकत्र आले आणि जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला.”त्या पाटी, ती फळी, ते गुरू आणि आम्ही – राजूरच्या स्नेहमिलनात जुनं बालपण पुन्हा जगलं!” अशी प्रतिक्रिया उमटली.
या भावनिक स्नेहमिलन सोहळ्यात विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील भावना गाण्यांतून, मनोगतातून व्यक्त केल्या. जुन्या वर्गात पुन्हा एकदा बसून शाळेचा तोच माहोल अनुभवताना अनेकांच्या डोळ्यांत पाणी आलं. शिक्षकांनीही आपले अनुभव सांगत शाळेच्या आठवणींना अधिक भावनिक रंग दिला.

विविध क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारे २६ मित्र आणि २४ मैत्रिणी कार्यक्रमाला उपस्थित होते. बाळाभाऊ उपलेंचवार, उपलेंचवार मॅडम, सौ. रोगे मॅडम, राजेश निरे, शरद इंगळे, चौधरी सर, गारघाटे सर या शिक्षकांची खास उपस्थिती कार्यक्रमाला लाभली.

कार्यक्रमाचं संचालन गुणवंत पचारे यांनी, प्रास्ताविक करुणा पाटील यांनी आणि आभारप्रदर्शन संघदिप भगत यांनी केलं. हा स्नेहमिलन सोहळा म्हणजे शाळेच्या आठवणींना भावनिक उजाळा देणारा एक अविस्मरणीय क्षण ठरला.



