
News Today
वणी (प्रतिनिधी) – शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत आपलं हक्काचं घर उभारण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या वणी तालुक्यातील सुमारे १० हजार गरिबांवर आज वाळू टंचाईचं संकट कोसळलं आहे. पावसाळा जवळ येऊन ठेपलेला असताना, घरकुल बांधकामे वाळूअभावी रखडली असून हजारो कुटुंबं उघड्यावर राहण्यास भाग पाडली गेली आहेत.

वणी तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांनी घरकुलासाठी आवश्यक असणारी वाळू मिळवण्यासाठी प्रशासन दरवाजे झिडकारले, परंतु त्यांना आजतागायत काहीच मिळालं नाही. दुसरीकडे, घाट भागांमध्ये वाळू तस्करी मात्र खुलेआम सुरू असून, ट्रकचे ट्रक भरून वाळूची ने-आण सुरू आहे.

“आमचं घर अर्धवट बांधलंय, छप्परही नाही. पावसाळा लागला तर आम्हाला उघड्यावर रात्र काढावी लागेल,” अशी व्यथा एका महिला लाभार्थिनीने व्यक्त केली.
स्थानिक लोकांनी प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या असूनही वाळू तस्करी करणाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे ‘गरिबांना नियम, आणि माफियांना मोकळं रान’ अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

या परिस्थितीत, शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि वाळूच्या वितरणात पारदर्शकता राखणं गरजेचं असल्याचे मत स्थानिक समाजकार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आहे.
घरकुलाचे स्वप्न पाहणाऱ्यांना आता एकच सवाल सतावतो – शासनाच्या घरकुल योजनेवर वाळूचा खडा का आला? आणि या आक्रोशाची दखल कोणी घेणार?



