News Today
वणी तालुक्यातील डोंगरगाव (विरकुंड) येथे क्रांतिवीर श्यामादादा कोलाम, भगवान बिरसा मुंडा, क्रांतिवीर राणी दुर्गावती, क्रांतिकारी बाबुराव शेडमाके, तंट्या भिल्ल, राघोजी भांगरे यांच्या संयुक्त जयंती तसेच संविधान दिनानिमित्त भव्य समाज प्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदिवासी समाज भूषण पैकुजी आत्राम यांनी भूषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून तुळशीरामजी पेंदोर, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल देरकर, श्रीगुरुदेव सेनेचे अध्यक्ष दिलीप भोयर, लढा संघटनेचे अध्यक्ष प्रवीण खानझोडे आदी मान्यवर उपस्थित होते. विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्त्यांची उपस्थिती कार्यक्रमाला विशेष उठाव देणारी ठरली.

प्रमुख प्रबोधनपर भाषणात दिलीप भोयर यांनी समाजातील अनिष्ट रूढी–परंपरा आणि अंधश्रद्धांवर सोप्या, प्रभावी आणि थेट भाषेत प्रहार करत गावकऱ्यांना जागृती, शिक्षण आणि प्रगतीकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले. संत-महापुरुषांच्या विचारांची आजच्या काळात किती नितांत गरज आहे, यावरही त्यांनी ऐतिहासिक पुरावे आणि उदाहरणांसह प्रकाश टाकला. त्यांच्या प्रभावी भाषणादरम्यान उपस्थित ग्रामस्थ मंत्रमुग्ध झाल्याचे दिसून आले.
कार्यक्रमाचे सुयोग्य सूत्रसंचालन पार्वती सोयाम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रामकिशन मेश्राम, महादेव मडावी, नितेश सुरपाम, रुपेश टेकाम यांच्यासह अनेक तरुण मंडळींनी परिश्रम घेतले. यावेळी गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला.
समाजजागृती, सांस्कृतिक मूल्यांचा सन्मान आणि आदिवासी क्रांतिकारकांच्या स्मरणातून एकतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम ग्रामस्थांच्या मनात चिरंतन ठसा उमटवून गेला.



