
News Today
वणी :- शहरात निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले असतानाच प्रचाराला गती मिळण्याआधीच अनेक अडथळे उभे राहू लागले आहेत. शहरातील प्रस्थापित उमेदवारांचा प्रचार जवळपास अर्धा मार्ग सरला असला, तरी अपक्ष उमेदवारांना मात्र दुहेरी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

एकीकडे अजून निवडणूक चिन्ह मिळालेले नसल्याने त्यांच्या प्रचाराची अधिकृत सुरुवातही झालेली नाही, तर दुसरीकडे शहरातील रस्ते अचानक बंद झाल्याने गाड्या आणि कार्यकर्त्यांची हालचाल पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

निवडणुकीच्या अगोदर शहरातील कोणत्याही रस्त्याचे काम सुरू नव्हते. मात्र मतदानाची तारीख जाहीर होताच शहरात वेगवेगळ्या भागांमध्ये बांधकामांचे ‘महाजनसंपर्क’ सुरू झाल्यासारखे दिसू लागले.

काँक्रीटीकरण आणि दुरुस्तीच्या नावाखाली अनेक मुख्य रस्त्यांसह उपरस्तेही बंद करण्यात आले आहेत. परिणामी, केवळ चार दिवसांच्या प्रचारकाळात अर्धा वेळ रस्ते अडथळ्यांतच जात असल्याने उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे.

अडथळ्यांमुळे काही प्रभागांत तर पायी फिरणेही कठीण झाले असून कार्यकर्त्यांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठा वेळ लागत आहे. त्यामुळे “हे रस्ते अचानक का?”, “यावेळीच का?” यावरून शहरात चर्चा रंगत आहे.

सत्ताधाऱ्यांकडून जाणूनबुजून असा डाव रचला गेला का, असा प्रश्न जनतेतूनही मोठ्या प्रमाणात विचारला जात आहे.

शेवटची चार दिवसांची धावपळ अतिशय महत्त्वाची असतानाच रस्ते बंदी आणि चिन्हअभावी अपक्ष उमेदवार अक्षरशः हवालदिल झाले आहेत. आगामी काही दिवसांत परिस्थिती सुधारते की आणखी गुंतागुंती वाढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





