News Today
वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्यावर दाखल झालेल्या खंडणी प्रकरणाने आता राजकीय वादळ उठवले आहे. या गुन्ह्यामागे सत्ताधाऱ्यांचा डाव असून, निवडणुका तोंडावर येताच मनसेच्या नेत्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा कट रचला गेला असल्याचा ठपका मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठेवला आहे.

ठोस पुराव्याचा अभाव
सदर प्रकरणात संबंधित ठेकेदाराकडे खंडणी मागणीसंबंधी कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. तरीदेखील गंभीर आरोप लावून उंबरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे या घटनेमागे राजकीय हेतू दडलेला असल्याचा आरोप होत आहे.
निवडणुकीची पार्श्वभूमी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी जवळ आल्या आहेत. ग्रामीण भागात मनसेची चळवळ वेग घेत असून, पक्षाचा प्रभाव वाढत असल्याने सत्ताधाऱ्यांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उंबरकर यांच्यावर गुन्हा दाखल होणे ही निव्वळ निवडणूकपूर्व डावपेचाचीच चाल असल्याचा सूर उमटत आहे.

गृह विभागाडूनही गुन्हा नोंदवून घेण्यासाठी दबाव असल्याची जोरदार चर्चा
या संपूर्ण प्रकरणात एक महत्त्वाचा मुद्दा पुढे येत आहे तो म्हणजे पोलिसांवर झालेला दबाव. सूत्रांच्या माहितीनुसार, गृह विभागाकडून संबंधित पोलिसांवर उंबरकर यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी तगादा लावण्यात आला होता. ठोस पुरावा नसतानाही गुन्हा दाखल करण्यामागे राजकीय दबाव होता का, असा प्रश्न आता जनतेत विचारला जात आहे. प्रशासनाच्या स्वतंत्र कामकाजात राजकीय हस्तक्षेप होत असल्याची चर्चा ग्रामीण भागात जोर धरू लागली आहे.
मनसेचा संताप
मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. “आमच्या नेत्याला बदनाम करून सत्ताधारी स्वतःचे राजकीय हितसंबंध साधण्याचा प्रयत्न करत आहेत. खंडणीसारखे आरोप ठोस पुराव्याशिवाय लावले जाणे हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे. सत्य लवकरच बाहेर येईल आणि या षडयंत्राचा पर्दाफाश होईल,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

पुढील घडामोडींकडे लक्ष
या प्रकरणाची चौकशी सुरू असून, आगामी काळात उंबरकर प्रकरणातील खरे तथ्य जनतेसमोर उघड होईल. मात्र सध्या तरी या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून सीसीटीव्ही तपासण्याची गरज
फिर्यादी मामीडवार यांनी दिनांक 18 रोजी उंबरकर यांच्या कार्यालयात भेट घेतली असता त्यांना दहा लाख रुपयांची खंडणी दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे परंतु उंबरकर यांच्या ऑफिसला लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहेत दहा लाख रुपयाची रक्कम हि फर मोठी आहे. ही रक्कम आणताना संबंधित कंत्राटदारांनी बॅकचा पिशवीचा वापर केला असावा त्याकरिता खरंच हा गुन्हा घडला आहे का हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी उंबरकर यांच्या कार्यालयातील लावलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रीकरण तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.




