Ticker

6/recent/ticker-posts

शेतपिकाचे नुकसान करणाऱ्या रोही व रानडुकराला मारण्यासाठी आता २४ तासात परवानगी

 

              शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

News Today 

दिलीप भोयर

वणी  :  शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान करणाऱ्या रोही व रान डुकरांना मारण्यासाठी आता वनविभागाकडून २४ तासात परवानगी मिळणार आहे. या अगोदर शेतपिकांचे नुकसान केल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जात होती. परंतु रोही व रानडुकराचा कायमचा बंदोबस्त करता येत नव्हता. तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना प्राण्यांना मारण्याचे अधिकार नव्हते. परंतु राज्याच्या महसूल वनविभागाकडून रोही रानडुकरांकडून शेतमालाचे नुकसान झाल्यास व शेतकऱ्यांनी अर्ज केल्यास त्यांना ठार मारण्याकरिता २४ तासांच्या आत परवानगी दिली जाणार आहे. शेवटी शेतकऱ्यांच्या मागणीला यश आले आहे. 

यापूर्वी बंदुकीद्वारे शिकार करण्याकरिता अनुभवी व्यक्ती मिळत नव्हती. रोही व रानडुक्कर ठार झाल्यानंतर त्याची विल्हेवाटला वण्याचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागत होता. वनपरिक्षेत्र अधिकारी यांना वन्यप्राणी विल्हेवाट करण्याबाबत अधिकार नव्हते. त्यामुळे ठार करण्याची सदर कार्यपद्धती व्यवहारी ठरत नसल्याचे वनविभागाच्या लक्षात आले. त्यामुळे त्यात नुकतीच सुधारणा करण्ययात आली आहे. 

रानडुक्कर किंवा रोही या वन्यप्राण्याने शेतातील पिकांचे नुकसान केले. याबाबत शेतकऱ्याने संबंधित वनक्षेत्रपालांकडे लेखी स्वरूपात अर्ज देऊन त्याची पोचपावती घ्यावी लागणार आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित वनक्षेत्रपाल शहानिशा करत शेतमालाचे नुकसान करणाऱ्या रोही वा रानडुकराला मारण्याकरिता २४ तासांच्या आत परवानगी देणार आहे- जर २४ तासांच्या आत परवानगी दिली नाही किंवा नाकारली नाही तर अर्जदाराला परवाना दिला, असे गृहीता धरले जाणार आहे.


             संरक्षित जंगलात मात्र परवानगी नाही

राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प, संबंधित राखीव क्षेत्रात मात्र कोणत्याही वन्यप्राण्यांना मारण्याची परवानगी दिली जाणार नाही. अभयारण्य राष्ट्रीय उद्यान सीमेपासून पाच किलोमीटर सभोवतालच्या क्षेत्रात या तरतुदीचा वापर करताना अधिक काळजी घेतली जाणार आहे. ठार करण्याच्या परवानगीसाठी लागणारा व्यावहारिक कालावधी व क्षेत्र याचा तपशील नमूद करण्यात येईल. परवानाधारकाने त्याचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. प्रत्येक महिन्यात देण्यात आलेले परवाने, त्यानुसार ठार करण्यात आलेले रोही व रानडुक्कर यांच्या संख्येबाबत विल्हेवाट तपशील, मासिक अहवाल वनक्षेत्रपाल संबंधित उपवन संरक्षकाकडे देणार आहेत. यामुळे वन्यप्राण्यांकडून शेतातील पिकांची नासाडी होणार नाही, असे मानले जात आहे.